नानीची टांग

नोकरदार माणसाची सकाळची घाई म्हणजे तारेवरची कसरत असते. मुंबईच्या उपनगरातील आणि त्यातही डोंबिवलीतील माझ्यासारख्या चाकरमानी माणसाची घाई म्हणजे बघायलाच नको. ….तारे खालची कसरत….(वरच्या तारेला चिकटून लोकल धावत असते ना म्हणून तारे खालची). घर ते रेल्वे स्टेशन हा प्रवास तर कसरत, सर्कस, कबड्डी/खो खो असे मैदानी खेळ, झालच तर लांब उडी, उंच उडी या आणि अश्या अनेक मैदानी खेळांची अनुभूती देऊन जातो. त्याची सुरुवात अगदी घराखालूनच होते. सकाळी सकाळी कचऱ्याच्या डब्यांवर ताव मारत असलेल्या किंवा काहीच काम नसल्याने आळसावून पसरलेल्या कुत्र्यांना चुकवायचे असेल तर लांब उडी उंच उडी याच बरोबर १०० मी. धावणे असे प्रकार करावे लागतात. तीच गत रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या रिक्षा आणि इतर वाहनांबरोबर होते. तिथे तर इतर खेळांच्या प्रकारांच्या साथीला कबड्डी आणि खो खो पण खेळावे लागतात. त्यात सुध्दा जर कोणी कुणाला भोज्जा दिला तर बघायला नको.

बरं स्टेशन पर्यंत पोचताना आडव्या उभ्या लावलेल्या रिक्शा, फेरीवाले, आपल्या पेक्षा मंद गतीने चालणारे सहपांथस्त यांच्या मधून वाट काढणे लपाछपी आणि पकडा पकडी मध्ये जबरदस्त स्कील असावं लागतं…. नाहीतर इच्छित गाडी मिळणे निव्वळ अशक्य. डोंबिवली स्टेशनात अजून एक अडथळा असतो तो म्हणजे बिगारी कामगारांचा. अड्डा जमलेला असतो. गप्पा, चहा आणि सोबतीला पान तंबाखू च्या पिचकार्या. त्यांच्या तुन अगदी सावधगिरी ने मार्ग काढावा लागतो. नाहीतर ४-५ जणांशी कुस्ती खेळण्याची तयारी ठेवावी.

असाच एका रम्य सकाळी सगळ्यांचा ससेमिरा चुकवुन रेलवेच्या जीन्या जवळ पोचलो. समोर गाडी येणार असल्याची उद्घोषणा चालु होती. आज आपल्याला इच्छित गाडी मिळणार या कल्पनेनेच मन उचंबळून आलं होतं. अस्सल डोंबिवलीकराचे मन अश्याच माफक गोष्टींनी फुलून येतं. वेळेवर रिक्षा मिळणे, इच्छित गाडीच्या वेळी आपण फलाटावर असणे मग गर्दी मुळे चढायला नाही मिळाले तरी हरकत नाही. पण गर्दी मुळे जर नेहेमीची गाडी चुकली तर त्याच्या पुढची गाडी पकडायला डोंबिवलीकर सरसावून उभा असतो. तसाच मी त्या फलाटावरील जनसागरात मिसळून जाण्यास आतुर झालो होतो. आता जीना आणि मी या मध्ये फक्त रस्ता ओलांडायचा अवकाश होता. दोन्ही बाजूंनी कुठल्याही प्रकारचे वाहन येत नाहीये असे बघून रस्ता ओलांडायला सुरुवात केली आणि अर्ध्यावर पोचलो देखील. आणि इतक्यात एक दुचाकी वायू वेगाने माझ्या समोरून बरोब्बर जिन्याच्या पायरी समोर उभी राहिली. क्षणभर मी जागीच थबकलो. कारण निव्वळ काही इंचांनी माझा पाय किंवा माझ्या झोळीचा पट्टा वाचला होता.

दरवाजा ते दरवाजा घरपोच गाडी असून सुद्धा इतकी घाई कुणाला झाली आहे म्हणून जरा त्या दुचाकी कडे, तिच्या चालका कडे आणि मागे बसलेल्या वाहिके कडे कटाक्ष टाकला. ३/४ विजार घातलेला विस्कटलेल्या केसांचा तो आणि ऑफिसला जाण्यासाठी नटून थाटून तयार झालेली ती. नवपरिणीत जोडपं वाटत होतं …. त्यामुळे सकाळी उशीर, ओढाताण होणार आणि नंतर घाई होणार हे लगेच कळून आलं. पण तरी देखिल त्यांनी एखाद्या मांजरी प्रमाणे आडवे जाणे मला काही रुचले नाही. थोड्याशा त्रासीक मुद्रेने मी त्यांच्या कडे बघितले. ति अजूनही दुचाकी वर बसुन होती आणि त्याच्या कानात काहीतरी गुंजन चालू होते. गुदगुल्या होऊन तो माशी प्रमाणे मानेला झटका देत होता. उगाच कबुतरांच्या जोडीला कशाला व्यत्यय आणायचा असा विचार करून मी पुढे झालो. इतक्यात त्या वाहिकेने आपला पवित्रा बदलला …. एक पाय जमिनीवर टेकला आणि दुसरा पाय कागदावर कर्कटक फिरवावे अश्या रीतीने फिरवला. आणि तो पाय …त्या पायात अडकवलेल्या उंच टाचांच्या चपले सकट जमिनीवर टेकायच्या आधी माझ्या हातावर आदळला. आपला पाय जमिनीवर येण्याच्या वाटेत कुठेतरी अडखळला आहे …. कुणा एका मर्त्य माणसाला तिने अजाणते पणे लाथ मारली आहे हे तिच्या ध्यानातही आले नाही. ती परत गुटर्गुम करायला नवऱ्या जवळ चिकटली.

आता मात्र हद्द झाली….. मला वाट अडवून गेलेली ती स्वारी सकाळी सकाळी मला असा प्रसाद देईल असे स्वप्नात सुद्धा नव्हते. आणि वर साधं सॉरी देखील नाही. हे म्हणजे अतीच झालं ना…. इंग्रजांनी लज्जेखातर दिलेले दोन शब्द सारखे फेकत असतात मग खरंच जर चूक झाली असेल तर निदान माफी तरी मागावी. मी एक पायरी चढलेला तसाच थांबलो आणि मागे वळून पहिले तर अजून त्यांचे गुंजन चालूच होते. त्यांच्या जवळ गेलो …..तेंव्हा त्या चालकाला उपरती झाली अतिशय आदबीने तो म्हणाला “सॉरी सॉरी …. तुम्हांला पाय लागला ना?” मी ही तितक्याच आदबीने म्हणालो “नाही … तुमचा पाय लागला नाही …. पण तुमच्या मागे बसलेल्या होत्या त्यांची लाथ लागली ….. सॉरी खरं तर त्यांनी म्हणायला हवे …. नाही का?” आणि शेवटी तिने कसं बसं सॉरी म्हटले ….आणि जीव (माझा आणि त्याचा) भांड्यात पडला. काही स्त्रियांना त्यांची चुकी असताना देखील सॉरी म्हणायला खूप कष्ट पडतात हो. एखादी असती तर उतरल्या उतरल्या माफी मागितली असती. पण ही बहुतेक त्या “काही” स्त्रियांच्या वर्गवारीतील असावी.

मी तिला म्हटले “आत्ता जर माझा पाय तुम्हांला लागला असता तर अख्ख स्टेशन जमा केलं असतं तुम्ही इथे. दुचाकी वरून उतरण्याची देखील एक पद्धत असते. घोडा नाहीये तो पाय पसरून उतरायला.” त्या दोघांच्या चेहेऱ्या वरचा रंग पार उतरला होता. आवाजाची कुठल्याही मर्यादेचे उल्लंघन न करता मी इतक्या शांतपणे कसं काय बोलत होतो कोण जाणे. बहुतेक तिला त्या मुळेच तिला काही समजले नसावे असे गृहीत धरून तिला परत विचारले “गाडी वरून उतरायचे प्रात्यक्षिक देऊ का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही उतरत असणार त्याच पद्धतीने बसत देखील असणार … म्हणजे दोन्ही वेळेस आजूबाजूच्यांना धोका आहेच…. थांबा मी तुम्हांला प्रात्यक्षिकच देतो. आज काल डेमो दिल्याशिवाय बरेच जणांना कळत नाही.” तरुणीच्या चेहेऱ्या वरचे भाव बघण्यासारखे झाले होते आणि तो तरुण मात्र हलकेच घेत होता. तिने घाई घाईने त्याला टाटा केलं आणि जिन्याकडे धूम ठोकली. तो तरुण सुसाट निघून गेला आणि मी देखील हात झटकत जीना चढू लागलो …. इच्छित गाडी त्या “नानीच्या टांगे”मुळे चुकलेली होती हे वेगळे सांगायची गरज नाही.

पण बरीच माणसे आपण ज्याच्या वर बसणार आहोत तो एक घोडा नसून दुचाकी आहे हे कसं विसरतात? घोड्यावर बसण्याच्या अविर्भावात दुचाकीवर का बसतात किंवा उतरतात हा प्रश्न मला नेहेमी सतावत असतो.

श्रावण बाळ

तो बसला होता …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….Anuvina-ShravanBal
मांड्यांच्या बेचकीत डोकं आणि डोक्यावर स्वतःच्याच हातांचा आधार ….
त्याचे अर्धोन्मीलित डोळे आणि पापण्यांच्या ओल्या कडा ….
पाठीवर पडलेल्या मायेच्या प्रत्येक स्पर्शागणिक निघालेला हुंदका ….
सांत्वनाचे शब्द ऐकत फुटलेले आसवांचे बांध ….
एकाच रेषेत घरंगळत विसावणारे अश्रू ….
जमिनीवर पडून हळूहळू नाहीसे होत होते ….
पण दुःख असं हवेत विरतं का?
ओठ  विलग झाले तर क्वचितच निघणारे अस्फुट शब्द ….
अर्थहीन …..
त्याला तर सगळंच निरर्थक …
येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अगम्य शब्दां सारखे…

बनियान ला पडलेली भोकं मोजत थकलेलं शरीर ….
अन् नियतीच्या आघातांनी खचलेलं मन….
पण या धक्क्याने सगळंच खचलं … घरातलं वार्धक्य आणि तारुण्य ….
कोपऱ्यात बसलेल्या मुलासाठी सगळंच थोपवून धरलेलं ….
राग, शोक, दुःख यांच्या आहुत्या दिल्या त्या सरणावर ….
पण चेहेऱ्यावरचे भाव मात्र राहिले तसेच ….
कायमचा व्रण असल्या सारखे ….
रिकाम्या घरात रमलेला भूतकाळ ….
मिणमिणत्या पणतीच्या अंधारात बुडालेलं वर्तमान ….
आणि कोपऱ्यात मान खाली घालून बसलेलं भविष्य ….

“ती” त्याचं विश्व ….
“तो” तिचा श्रावण बाळ ….
इतके वर्ष श्रावण बाळाची कावड त्याने प्रेमाने सांभाळली ….
आज मात्र एक पारडं रिक्त झालं ….
तो बसला आहे …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….

रंगांची उधळण

holi

वर्षभर हिंदू संस्कृती प्रमाणे आपले सणवार चालू असतात. आणि प्रत्येक सण आपण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. दिवाळी, दसरा, गणपती, पाडवा, होळी, धुळवड, गोपाळकाला असे आणि बरेच सण आपल्या उत्साहात भर घालत असतात. सगळे आपापल्या परीने हे उत्सव साजरे करतात, गरीब, श्रीमंत कुणीही असला तरी उत्साह तोच. आनंद तोच.

असाच एक सण येतोय, सगळ्यांना सामावून घेणारा, विविध रंगात नटणारा. फाल्गुन शुक्ल पौर्णिमा अर्थात होळी आणि त्या नंतर रंगांची उधळण घेऊन येणारी धुळवड आणि रंगपंचमी. सगळ्या लहान थोरांना आपल्याच रंगात रंगायला लावणारी धुळवड. बालपणी ची मज्जा असलेली धुळवड, तरुणाईची मस्ती असलेली धुळवड, भांगेच्या थंडाई मध्ये मिसळलेली धुळवड, वरिष्ठांच्या आनंदात सामावलेली धुळवड. अशीच धुळवड आपण बुधवारी साजरी करणार आहोत. अगदी नेहेमीच्याच उत्साहात रंगांची उधळण करत. पण जरा सांभाळून. उत्साह तोच असला तरी रंगांचे स्वरूप बदललंय. जास्त गडद पणा आणि टिकाऊपणा यावा म्हणून या रंगांमध्ये घातक रसायने मिसळली जात आहेत. त्याने पर्यावरणाची हानी होतेच पण ते आपल्या जीवाला देखील अपायकारक असू शकतात. त्या मुळे शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करा. सध्या बाजारात असे नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत.

drought01पाणी ….. खरंच या वर्षी खुपच टंचाई निर्माण झाली आहे पाण्याची. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर दुष्काळ पसरला आहे. गावंच्या गावं पाण्यावाचून स्थलांतरित झाली आहेत. रोजच्या पिण्याच्या, वापरण्याच्या पाण्याची वानवा आहे. तळी आटली आहेत, विहिरींचा तळ लागला आहे, नद्या कोरड्या पडल्या आहेत. रोज टँकरद्वारा पाणी पुरवठा करून जीवनावश्यक गरज भागवली जात आहे. आत्ताशी मार्च महिना सरत आहे अजून वैशाख वणव्याची झळ बसायची आहे. असे सगळ्या महाराष्ट्राचे चित्र असताना आपण धुळवडीच्या दिवशी जी पाण्याची नासाडी करणार आहोत ती जरा विचार पूर्वक करा. इतके वर्ष अगदी रस्त्यात पाण्याची पिंप भरून सगळ्यांना बुचकळून काढलंय. नळाला पाईप लावून सगळ्यांवर फवारे सोडलेत. एक वर्ष हे सगळं “लिमिटेड एडिशन” मध्ये केलं तर नाही चालणार? आता तुम्ही म्हणाल की आपल्या कडे कुठे दुष्काळ आहे. रोज तर पाणी मिळतंय. मग कशाला कमी वापरायचं? हो पण मिळणारे पाणी कमी कमी होत जाणार आहे. मुंबईच्या आजूबाजूला बरेच ठिकाणी कमी दाबाने पाणी यायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांची पाण्याची तहान (आणि नासाडी) पुरवताना त्याच्या आजूबाजूचे जिल्हे आणि धरण कोरडी पडणार आहेत. कारण शेवटी कमी पाण्याची आणि वैशाख वणव्याची झळ आपल्याला पण सोसावी लागणार आहे. त्या साठी आत्ता पासूनच कंबर कसायला हवी. पाण्याची काटकसर करण्यासाठी धुळवडी पेक्षा चांगला मुहूर्त कुठला असू शकतो?

सगळ्यांना होळी आणि धुळवडीच्या (बिनपाण्याने) शुभेच्छा.

(सर्व फोटो आंतरजालावरून साभार)