खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉
(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)
(निवडणुकीचा थरार – भाग २ इथे वाचा)
—————————————————————————————————————————————————————–
मोजणी आणि सत्ता संघर्ष
आपले भविष्य टांगणीला लागलेले आहे या जाणिवेनेच उमेदवारांना झोप पण येत नसावी. आणि आपल्या “पातेल्याचे” काय होईल या चिंतेने “चमचे” देखील जागे असतात. सकाळ पासून मतपेट्या लपवून ठेवलेले अंतरंग दाखवायला सुरुवात करतात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे रंग पसरू लागतात. आश्चर्य म्हणजे निवडणुकीला उभ्या असलेल्या यच्चयावत उमेदवारांना आपणच जिंकणार याची खात्री असते. त्यात फक्त एक विजयी उमेदवार सोडून बाकी सगळ्यांचा भ्रमनिरास योग्य वेळ आली की होतो हा भाग अलाहिदा. मिडीयाने इतके दिवस चालवलेला खरा होता का नुसताच फुसका बार हे याच दिवशी उमगते. मत मोजणी चालू झाली की सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोचलेल्या असतात. पहिल्या अर्ध्यातासातच खरा सामना कुणा मध्ये रंगणार हे निश्चित होते. क्षण क्षणाला झुलणारी दोलायमान परिस्थिती अनुभवण्या साठी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी उपस्थित असाल तरच त्याचा खरा थरार तुम्हाला अनुभवता येईल. मोजणीच्या वेळी आघाडी मिळालेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अंगावर रोमांच निर्माण करतो. त्यांच्या घोषणा, नारेबाजी सगळंच थरारक. शेवटी मोजणी पूर्ण होते आणि विजेत्याच्या नावाची घोषणा होते. विजयी उमेदवार किती मताधिक्याने निवडून आला आहे हे पण सांगण्यात येते. विजेत्या उमेदवाराच्या गोटामध्ये जल्लोष आणि उत्सवाचे वातावरण तर पराजित पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्मशान शांतता ….. अश्या दोन विरुद्ध टोकाच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया फारच कमी ठिकाणी पहायला मिळतात. एका बाजूला कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अविश्रांत मेहेनतीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे योग्य निकाल लागल्याचा आनंद तर दुसरीकडे जमीन आसमान एक करून सुध्दा पदरी पडलेला पराभव. किती हा विरोधाभास? काही निकाल अपेक्षित तर काही आश्चर्यकारक असणारच ना?
कार्यकर्त्यांच्या जल्लोषा बरोबरच विजयी उमेदवाराचे हात गगनाला भिडतात. वाजत गाजत मिरवणूक निघते. जनतेचे आभार प्रदर्शन, अभिष्टचिंतन, औक्षण या सगळ्या औपचारिक गोष्टी पण पूर्ण होतात. एखादी लढाई जिंकून आल्यावर योद्ध्याच्या चेहेर्यावरील हावभाव आणि या उमेदवाराच्या हावभावामध्ये विशेष फरक नसावा. आणि मनात मात्र “कसा पाडला लेकाला …. माझ्यासमोर उगाच गमजा करत होता” वगैरे वगैरे. मग परत एकदा स्वारी मिडीयाला “बाईट” द्यायला तयार होते. कितीही काहीही दर्शवले तरी शेवटी मीच कसा योग्य आहे हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच रात्री कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार आणि विरंगुळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि सगळे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे आभार मानून विजयाच्या धुंदीत “झुलत” असतात. बरेच दिवसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला शांत झोप लागलेली असते …. उराशी एकाच स्वप्न घेऊन … कधी तरी माझीपण अशीच विजययात्रा निघेल …
पक्षाचे विजयी उमेदवार मग पक्षश्रेष्ठींची भेट घेतात. पक्षाला मिळालेल्या सर्वांगीण विजयावर पक्षाचे पुढचे पाऊल काय असेल हे निश्चित होते. सत्ता स्थापन करण्यासाठी काय अजेंडा असावा हे ठरवले जाते. बहुमत मिळाले असेल तर प्रश्नच येत नाही …. पण बहुमत नसेल तर आघाडी, युती, महायुती असे काहीतरी प्रयत्न करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला जातो. यात अपक्ष म्हणून जे निवडून येतात त्यांची चंगळ असते. गुप्त चर्चा, खलबतं यांना ऊत येतो. जिथे फायदा अधिक तिथे हे अपक्ष धावत असतात. काही अपक्ष उमेदवार अचानक गायब होतात …. कुणी तरी पोलिसात तक्रार करतं …. अमुक अमुक उमेदवारास अमुक अमुक पक्षाच्या नेत्याने पळवून नेले आहे. एकदम पोलिसांची सूत्र फिरू लागतात. मिडीयाला TRP वाढवण्यासाठी अजून एक खाद्य मिळते. जसा तो उमेदवार एकाएकी गायब होतो तसाच तो कुणातरी बड्या नेत्या बरोबर पोलीस स्टेशन ला स्वतःहून हजर होतो. याचाच अर्थ या दोघांमधली अर्थपूर्ण बोलणी सुफळ संपूर्ण झालेली असतात. असेच काही उमेदवार ज्यांना तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात उभे राहतात आणि नाकावर टिच्चून जिंकून येतात त्यांना पण परतीचे दरवाजे उघडे होतात …. अर्थात हे सगळे सत्ता स्थापन करण्याच्या अभिलाषेनेच. अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने फिरवण्यासाठी रस्सीखेच चालू असते …… जो हा घोडेबाजार जिंकतो तोच पुढे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रबळ दावेदार असतो.
“जिसकी लाठी उसकी भैंस” या उक्ती प्रमाणे ज्याच्याकडे साम, दाम, दंड, भेद या चारही नीती ज्याला अवगत आहेत तोच या राजकारणात आपला घोडा दामटवू शकतो ….. किमान ५ वर्षे तरी. दर ५ वर्षांनी हे थरारक नाट्य असंच चालू राहतं. नेते बदलत जातात, पार्ट्या बदलतात, कार्यकर्ते बदलतात पण निवडणूक आणि तिच्या अवती भवती घडणाऱ्या घटना नेहेमी प्रमाणेच रोमांचक … आणि थरारक.
(समाप्त)