मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली असणार हे निश्चित. आमचे कपडे, विविध खायच्या वस्तू, चकणा आयटम्स, निरनिराळी पीठे, आम्ही नसताना घरात फुकट जातील म्हणून उरलेल्या भाज्या, कांदे बटाटे अश्या अनेक गोष्टीनी डिकी सजली होती. डीकीचा दरवाजा लावताना आत काहीतरी तुटल्याचा आवाज आला पण आतले रचून ठेवलेले समान पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल म्हणून उगीच रिस्क नाही घेतली. जाता जाता वाटेमध्येच उसनी आणलेली कर्नाळ्यातील कांदे भज्यांची भूक आणि पळीच्या सोड्याची तहान भागवली. डोंबिवली पासून नागाव मात्र १०० की.मी. असल्याने ३ तासातच इच्छित स्थळी पोचलो. हेमंतानेआधीच सगळी साफसफाई करून ठेवली असल्याने समान लगेच जागच्या जागी लावण्यासाठी शि.प्रि. नी कंबर कसली. दिवसभरात हळू हळू पाव्हणेरावणे जमू लागले. पुण्याहून माधुरी, अभिजीत आणि ओम आले. बोरिवली वरून ताई, मिलिंद आणि कलश आले आणि कोरम पूर्ण झाला. घर कसं फुलून गेलं आणि रात्री गप्पांना ऊत आला. सकाळी सकाळी माझ्या भाच्यांनी आणि मुलीने मला झोपेतून उठवण्याचा चंग बांधला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने खोड्या काढत मला उठवत होता. आणि जसा मी उठलो तसा “आजचा मेनू” अश्या अविर्भावात येत्या ५ दिवसात काय काय धम्माल या बच्चे कंपनीला करायची होती त्याचा पाढाच वाचून दाखवला. अगदी आंबे चिंचा गोळा करणे, बर्फाचा गोळा खाणे, शहाळी पडणे, हौदात डुंबणे, समुद्रावर फिरायला जाणे इथ पासून ते बैलगाडीत बसणे इथपर्यंत. त्यात बर्फाचा गोळा, हौद आणि समुद्र एकदम “अती महत्वाचे आणि अत्यावश्यक” या सदरातील. हे सगळे आणि अजून काही सुचेल ते आपण या सुट्टीत करायचे असे म्हटल्यावर एकच गलका झाला. आता इथे मामाच “राजी” म्हटल्यावर घरातला कुठलाही “काजी” काय बोलणार? तसंही घरातील समस्त महिला वर्गाने ढील दिली असल्याने सगळ्या बालक वर्गाचे पतंग हवेत मस्त बदत होते … आणि मी बदवत होतो.
हौद आधीच साफ करून ठेवला होता आणि पंप लावून हौद भरून घेत होतो. तर ही वानरसेना बोलावण्या अगोदर तयार. माझी मुलगी तर चक्क बिकिनी घालून “मुलांनो मारा उड्या” या आज्ञेची वाट बघत होती. तिघांनी हौदात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १२ वर्षाचा कलश त्याच्या पेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या ७ वर्षाची आर्या आणि ४ वर्षाच्या ओम ची छान काळजी घेत होता. त्यांचा खोडकरपणा बाहेर उभं राहून बघणं जीवावर आलं होतं आणि त्यातच या तिघांनी मला पुरता भिजवला असल्याने मी पण हौदात उतरलो. सकाळी ९ वाजता चालू झालेले हे रासन्हाण १२ वाजता या सगळ्यांची आजी अर्थात माझ्या मातोश्री हातात शिपटी घेउन आली तेंव्हा संपलं. संध्याकाळी समुद्रावर जाऊन धमाल केली. शंख शिंपले जमवले. वाळूचा किल्ला केला, नक्षी काढली, समुद्राच्या लाटांमध्ये सैरावैरा धावलो. समुद्रावरचा गोळेवाला आमच्या गल्लीतूनच जात असल्याने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले आणि बच्चे कंपनीने परत एकदा कल्ला केला “उद्या गोळा खायचा … उद्या गोळा खायचा”. समुद्रावरच इतकं खेळल्यावर अर्थात क्षुधाशमनार्थ भेळ आणि तृषाशमनार्थ थंडगार उसाचा रस ही मागणी देखील पूर्ण केली. दमून भागून माझी तिन्ही पाखरं गाढ झोपी गेली. सगळे इतके दामले असून देखील त्यांच्या चेहेऱ्यावर एक तजेला होता … स्थळ काळाचा परिणाम असेल कदाचित.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोळेवाला घंटानाद करत दरवाज्यात हजर झाला तसा पोरांनी “गोळा गोळा” म्हणत एकच गजर केला. थोरा मोठ्यांनी बर्फ आणि त्यात मिसळलेला गोड रस चुपून चुपून गोळा खाल्ला … इतकंच नव्हे तर सगळ्यांनी वरून रस मागून घेतला. मुलांसाठी चवीपेक्षा रंगाचे आकर्षण अधिक. कुणाला हिरवा, कुणाला गुलाबी लाल, कुणाला कालाखट्टा तर कुणाला मिक्स – अशी रंग आणि चवीची रेलचेल होती. मुलांनी अर्धे खाल्ले आणि अर्धे सांडवले आणि अंगणात सप्तरंगी बर्फाचा सडा पडला. बालगोपाळांचीच काय तर मोठ्यांच्या देखील काही ना काही मागण्या रोज पूर्ण करत होतो…नेम धरून आंबे चिंचा पडणं, शहाळी पिणं, अगदी बैलगाडीची रपेट पण मारून झाली. क्रिकेट, पत्ते याच बरोबर लंगडी, आबादुबी पण खेळलो. डुक्करमुसुंडी, विषामृत, डब्बा ऐसपैस, खांब खांब खांबोळी असे जागे अभावी लोप पावत चाललेले खेळ देखील शिकवले. खेळता खेळता मुलं पडायची धडपडायची पण उठून परत खेळायला सुरुवात…तिथल्या मातीचाच गुणधर्म असावा कदाचित. एक दिवस आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणले. नागावच्या आजूबाजूला बघण्या सारखी बरीच ठिकाणे असल्याने कुठे जायचे हा प्रश्नच नव्हता. सुंदर सुंदर देवालयं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग समुद्राच्या वाळूला खेटून उभी असलेली सुरुची बनं, जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. करमरकर याचं कलादालन, कोर्लईचा किल्ला आणि दीपस्तंभ, शितलादेवी, नांदगावचा सिद्धिविनायक, हे सगळं करता करता चौलचा दत्त, कनकेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, सागरगड, वंदरलिंगी, रामधरणेश्वर अशी जरा उंचावर असलेली ठिकाणे मात्र राहून गेली. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ही सगळी मुलं शहरात असताना पायात चप्पल नसेल तर घरच्या बाहेर पडणार नाहीत पण इथे माझ्या बरोबर रानावनात, शेतावर अनवाणी यायला देखील एका पायावर तयार होती. मला मिळालेल्या ४-५ दिवसांमध्ये मी त्यांच्यात गावातील राहणीमाना बद्दलची आस्था जागवत होतो आणि जगत होतो.
हळू हळू तिथले वास्तव्य संपत आले आणि एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली. अजून काही दिवस राहिलो असतो तर अजून मज्जा आली असती असं प्रत्येकाला वाटत होतं. स्वतःच्या रक्ताच्या ३ पिढ्या जेंव्हा अश्या एकत्र येतात तेंव्हा नात्यांमधील रेशमी वीण अशीच घट्ट होत जाते आणि या आठवणी चिरकाल टिकतात. पुढल्या सुट्टीत इथेच येऊ, दिवाळी इथेच साजरी करू, भरपूर फटके वाजवू असे म्हणत आमची पुढची पिढी एकमेकांचा निरोप घेत होती. हे बघून आमच्या मागील पिढीचे डोळे पाणावले नाही तरच नवल. आजी आजोबांनी डोळ्यांच्या कडा पुसत तिन्ही नातवंडांना खाऊ साठी पैसे दिले. घर जसं भरलं तसचं हलक्या फुलक्या आठवणी ठेवत रितं झालं. दरवाज्याला कुलूप लावताना माझी कन्या मला म्हणाली “दिवाळीच्या सुट्टीत आपण इथेच येऊ. अजून बाकीच्यांना पण बोलवू. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा इथेच जाम मज्जा येते”. मुलीला ऋणानुबंधाची गोडी लावण्याचा माझा उद्देश सफल झाला होता.
नागांवच्या गोड आठवणी मनात ठेवून एकदम ताजे तावाने होत आम्ही सगळे एकमेकांच्या घरी पोहोचलो आणि रोजच्या जगरहाटीला सुरुवात झाली. नोकरी, प्रदूषण, ट्रेनचा प्रवास असह्य असलं तरी करणं भाग होतं. पण मुलीला दिवाळीत काश्मीरला नेण्याचा बेत काही डोक्यातून जाईना. एक कल्पना सुचली आणि धडाधड फोन फिरवले. दिवाळीचा काश्मीरचा बेत निश्चित केला …. हो पण फक्त आम्ही तिघं नाही. माणसं सगळी तीच फक्त स्थळ वेगळं. सहकुटुंब सहपरिवार काश्मीर पण दिवाळीचे फटाके नागांवच्या अंगणात फोडून झाल्यावरच.