आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल

व्यावसायिक रंगभूमीवर जमून गेलेले प्रायोगिक नाटक

abalal

(टिप: हे नाटकाचे परीक्षण नाही. कुठल्याही नाटकाचे मोज मापन करण्या एवढा माझा त्या विषयाचा अभ्यास नाही व्यासंगही नाही. या लेखाला फार तर नाट्यानुभव म्हणू शकतो.)

डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरा पासून हाकेच्या अंतरावर राहायला आलो तरी देखील नाटक बघण्याचा योग काही केल्या जुळून येत नव्हता. कधी नाटकाची वेळ  सोयीची नव्हती तर कधी आवर्जून एखादे नाटक बघायला जावे असे वाटले नाही.  दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी नेहेमीप्रमाणे सकाळचे वृत्तपत्र चाळत असताना स्वयंपाक घरातून आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कुठले नाटक आहे हे बघण्याची वर्दी आली.  शशांक केतकर आणि नेहा जोशी यांच्या “आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल” या नाटकाचा प्रयोग होता. वेळ होती संध्याकाळी साडे चारची. नावाचा आणि नाटकाच्या पोस्टर मध्ये काहीही साधर्म्य नसले आणि काहीतरी वेगळेच नाव असले तरीहि कलाकार ओळखीचे असल्याने “बघायला हरकत नाही” असे म्हणून नाटकाला जायचे निश्चित झाले. आम्हां तिघांची तिकिटे आधीच काढून ठेवली असल्याने थेट आसनस्थ झालो.

तीन घंटानाद झाले आणि अजूनही नाट्यगृह अर्धे देखील भरले नाहीये हे बघून माझी चुळबुळ सुरु झाली. बरेच प्रेक्षक नियमित पास धारक असल्यासारखे वाटत होते. लेक पहिल्यांदाच नाटकाला आली होती त्यामुळे तिच्या साठी हा अनुभव नवीन आणि वेगळाच होता. त्यामुळे तिला माझ्या प्रश्नार्थक आणि चिंताजनक चेहेऱ्यावरून काहीही कळत नव्हते. डोंबिवली सारख्या शहरात एखाद्या नाटकाला इतका अल्प प्रतिसाद म्हणजे, झालं पैसे फुकट गेले. …. माझी अस्वस्थता कुटुंबाच्या लक्षात आल्यावर तिने माझ्यासाठीच्या खास ठेवणीतल्या नजरेने मला गप्प केले.

एवढी कमी गर्दी का याचा उलगडा नाटकाच्या शेवटी झाला. नाटक संपले … पडदा अर्धा बंद होऊन पुन्हा उघडला गेला. सगळे कलाकार रंगमंच्यावर आले. श्री. शशांक केतकर यांनी छोटेसे निवेदन केले तेंव्हा काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. लेखक आणि दिग्दर्शक श्री. गजेंद्र अहिरे यांच्या “आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल” या नाटकाचा डोंबिवलीतील पहिलाच आणि महाराष्ट्रातील केवळ चौथा प्रयोग. १२ एप्रिल ला पहिला प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे संपन्न झाला. साधारणपणे प्रायोगिक रंगभूमीला साजेशी संहिता असलेले, थोडे हटके असलेले नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य पूर्ण टिम ने लीलया पेलले. या संहितेला सजवण्याचे कार्य प्रदीप मुळ्ये (नेपथ्य-प्रकाश), शैलेंद्र बर्वे (संगीत), सोनल खराडे (वेशभूषा) प्रत्यक्षात आणले. शशांक केतकर, नेहा जोशी, नम्रता संभेराव, प्रणव जोशी, किरण राजपुत, आणि श्रद्धा मोहिते या कलाकारांनी तर प्रेक्षकांना दोन अडीच तास नाट्यमुग्ध केले.

राघव आणि सई, एका मनस्वी चित्रकाराची/कलाकाराची आणि त्याला पदोपदी साथ देणाऱ्या प्रेमळ मैत्रिणीची  कथा आहे आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल. स्वतःच्या “मी” च्या शोधात असलेल्या, एका वेगळ्याच मानसिक आणि भावनिक गर्तेत अडकलेल्या राघवच्या मनोगताने कथेची सुरुवात होते. नायकाच्या संवादात आलेली मुंबईची सद्य परिस्थिती सांगणारी कविता तर फारच भन्नाट वाटली. नाटकातले संवाद, स्वगत सहज सोप्या शब्द प्रयोगांमुळे परिणामकारक वाटतात. राघवला जीवापाड जपणारी सई, आपली नोकरी सांभाळून त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा, त्याला त्याच्या पायावर उभे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते. एकामागे एक घटना उलगडत जातात आणि नाटकाची कथा प्रेक्षकांच्या भोवती रुंजी घालू लागते.

शमा नावाची एक अदृश्य व्यक्तिरेखा या नाटकात आहे. खरे तर या व्यक्तिरेखेचा प्रवेश खूप उशिराने होतो. तो जर का पहिल्या अर्ध्यातासात झाला असता तर राघवाच्या मानसिक अवस्थेच्या संकल्पनेला अजून पाठबळ मिळाले असते.  शमा, राघवची बालमैत्रीण, लहानपणी दोघे खेळत असताना तिचे अपहरण होते आणि परत ती त्याला कधीच भेटत नाही. या सगळ्या प्रकरणाचा राघवच्या बालमनावर मनावर परिणाम होतो.

चाळीतल्या काही वादामुळे राघव मुंबई सोडून निघून जातो. आणि त्याच्या मनातली घुसमट कमी होऊन त्याच्यातला खरा कलाकार त्याला सापडतो. “मी” ला शोधायला निघालेला राघव सईला पाठवलेल्या पत्रांच्या रूपाने आपल्याला भेटत राहतो. या सगळ्या प्रसंगाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी दिलेल्या पार्श्वसंगीताला श्रद्धा मोहिते यांनी गायलेल्या गझलची जोड तर निव्वळ अप्रतिमच.

राघव ज्या चाळीत राहत असतो त्या चाळीची मालकीण (नम्रता संभेराव), त्याच चाळीत नवऱ्याच्या कायम दडपणात राहणारी शेजारीण (किरण राजपुत), साधा मध्यमवर्गीय जुन्या रूढींना जपणारा पुरुषप्रधान संस्कृती मानणारा तिचा नवरा, श्री. वाघ (प्रणव जोशी) या सगळ्यांनी आपापल्या भूमिका सुंदर वठवल्या आहेत. कथानक जास्त उघड न करता इथेच थांबतो.

(नाटकाचे पोस्टर गुगल वरून साभार)