शनिवार रविवार जीवाची मंडई (पुण्यातली) करून आल्यावर हिशेब मांडणी चालु होती. बायकोने तिने केलेल्या खरेदीचा जमा(?)खर्च आधीच माझ्या हाती ठेवला होता. मुळात मी दिलेल्या काही नोटां पैकी एकही परत आलेली नसल्याने माझी दिलेली जमा तिच्या खर्चाशी तंतोतंत जुळणार होती हे निःसंशय. तस्मात् वरील खर्चाची विभागणी आमच्या जमाखर्चाच्या वहीत असलेल्या बुडित खाते, अक्कल खाते, मनोरंजन भत्ता, गुप्त हप्ता या आणि अश्या अनेक रकान्यांमध्ये केली जाते. आता ठाणे ते पुणे प्रत्यक्ष खर्च लिहायला बसलो. सगळे म्हणजे अगदी द्रुतगती महामार्गावरील फुडमॉल मध्ये ₹२० देऊन खालेल्या वडापाव सकट सगळे बारीक सारिक खर्च मांडून सुद्धा साधारण पणे ₹५०० चा हिशेब काही लागत नव्हता. पाच दहा रुपये इकडे तिकडे असते तरी विशेष वाटले नसते…. पण पाचशे रुपये म्हणजे फारच झाले. आता हा पंच शतकी कीडा काही स्वस्थ बसु देत नव्हता. अगदी गरम पाण्याचा तांब्या डोक्यावरून घेताना देखील मनातल्या मनात आकडेमोड चालुच होती.
त्याच तिरीमिरीत ऑफिस ला जायला निघालो. जीना चढताना बाबु ने हात दाखवला तेंव्हा पण लक्ष नव्हते माझे. स्थिरस्थावर होताच लॅपटॉप उघडला आणि आता excel sheet काढुन परत सगळा खर्च टायपुन काढला. तरी देखील ₹ ५०० चे गौडबंगाल काही निस्तरले नाही. सकाळी सकाळी डोक्याला चालना द्यायची तर चहाचा गरमागरम घोट घेतल्या शिवाय तरणोपाय नाही असे म्हणत बाबुची वाट बघु लागलो. पण आज आपल्याला गरज असताना ती गोष्ट मिळणार नाही याची तरतुदच विधात्याने करुन ठेवली असावी. चहा विलंब योग आजच्या दिनमानात उच्च स्थानी असला पाहिजे.
वेळ मारुन न्यावी या हेतुने जे वर्तमानपत्र हाती लागले ते चाळायला सुरुवात केली. पहिल्याच पानावर बातमी होती “खारघर येथील टोल वसूली सुरु”. नुसता माथळा वाचला आणि माझ्या आकडेमोड्या मेंदूला साक्षातकार झाला. यूरेका यूरेका असे काहीएक न उच्चारता लक्षात आले की आपण जाता येता ज्या काही दमड्या करकरित रस्त्यां वरुन जाण्यासाठी वाटेत दांडी टाकून अडव्या येणाऱ्या टोळ भैरवांच्या दानपेटित टाकल्या त्याची गोळाबेरीज ही जवळ जवळ पाचशे रुपयांच्या घरात जाते. हा सगळा तालेबंद एकदाचा जुळला आणि मनाला जरा बरे वाटले. पण ३०० किलोमीटर साठी ५०० रुपयांचा टोल हे जरा जास्तच वाटले. बर एवढे पैसे देऊन सुद्धा प्रवास बिन त्रासाचा असेलच असे नाही. सुट्टीच्या दिवशी टोल नाक्यांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा किंवा एखाद्या अपघातामुळे होणारी वाहतुक कोंडी या वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने होणारी गैरसोय. हे सगळे ते पाचशे रुपये देऊन उसने विकत घेतल्या सारखे आहे.
“साहेब चहा घ्या” बाबु टेबलावर ग्लास ठेवत म्हणाला आणि माझी टोल-समाधी भंग पावली.
माझ्या चेहेऱ्यावर उमटलेले अतिसूक्ष्म प्रश्नचिन्ह बघून बाबुने विचारले “काय साहेब कसला इतका विचार करताय? आणि आज सकाळी सकाळी चहा पिण्या अगोदरच कामाला सुरुवात? कशी झाली पुणेवारी?” या बाबुच्या प्रश्नांची सरबत्ती बघून माझे “सर” अजुनच चक्करल्या सारखे झाले. मी जरा वैतागलेल्या सुरात म्हणालो “अरे हो रे बाबु … इथे माझी बत्ती गुल होता होता वाचली आणि तुझ्या प्रश्नांची धडक मोहीम चालुच आहे. जरा दमाने घेशील? चल चहा दे लवकर म्हणजे जरा तरतरी येईल आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण देता येतील.”
या सकाळच्या गडबडी मुळे बाबुला चिमटा काढायला टोलचा विषय आयताच मिळाला होता. आणि त्यावर त्याची टोलवा टोलवी ऐकताना ऑफिस मधल्या कामाची सुरुवात तरी झक्कास होणार होती. इतक्यात बाबुनेच विषय काढला “शनिवार रविवार गेला होता म्हणजे एक्सप्रेस वे चा काय उपयोग झाला नसेल नै?? म्हणजे चारचाकी घेऊन गेला होता की सरकारी वोल्वो ने … शिवनेरी ने?” या बाब्याचे प्रश्न काही केल्या संपत नव्हते. मी आपला शांतपणे चहाचे घोट घशाखाली उतरवत त्याचे कुतूहल वाढवत होतो.
“एक्सप्रेस वे चे काही सांगू नकोस रे बाबु. दीड दोनशे रुपये देऊन पण विशेष फायदा तो कसला??? टोल नाक्यावर शनिवार रविवार मारुतीच्या शेपटाच्या लांबीला लाजवेल अश्या लायनी लागलेल्या असतात.” मी विषयाला हात घातला तसे बाबु म्हणाला “तुमच्या सारख्या गाडी वाल्यांचीच सोय केलिए सरकारने. चांगले रस्ते हवे… गाड्या दामटवायला हव्या मग भरा पैसे आणि जा खुशाल कॉलर ताठ करीत २ तासात पुणे गाठले ओरडत.”
“आधी शंभरीच्या आत असलेली रक्कम आता दोनशे गाठते आहे. असेच राहिले तर जितके पैसे पेट्रोलला लागतील तितकेच या टोळकरींना द्यावे लागतील. अरे आजकाल चांगला रस्ता दिसला कि घाबरायला होते कि पुढे कुठे टोलनाका वाटमारी साठी बसवला असेल कि काय? मस्त रमत गमत गाडी चालवत काही किलोमीटर जायचे आणि मग पुढे हे आपल्या समोर दांडा आडवा टाकुन उभे असतात. ३०-३५ रुपये घेतल्या शिवाय सोडताच नाहीत. ठाण्याच्या लोकांची फारच पंचाईत आहे … कुठूनही बाहेर पडा किंवा आत या टोल भरल्याशिवाय प्रवेशच नाही. घराच्या दरवाज्यांना जसे उंबरठे असायचे तसे ठाणे शहराला टोलनाके आहेत. चांगल्या रस्त्यांनी इंधन बचतीचा दावा करणाऱ्या या लोकांना टोलनाक्यांच्या इथे होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे होणारा इंधनाचा अपव्यय दिसत नाही हेच मोठे नवल आहे. राजकारणी लोकांना खुश ठेवले कि कुणीही या आणि कसेही लुटा.” मी थोडे नाराजीच्या स्वरातच बोललो.
“अहो साहेब राजकारणी लोकांनीच तर बांधा वापरा हस्तांतरित करा नावाची योजना आणली ती काय उगाच का? जनतेची सेवा या गोंडस नावाखाली जे काम सरकारने करायचे ते काम राजकारणी लोक बाहेर देतात. बांधून झाल्यावर वर्षानुवर्षे जनते कडूनच त्याचे अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. जनतेचे पैसे यांच्या आणि राजकारण्यांच्या तिजोरीत हस्तांतरित होतात पण योजना यांच्या खिशातच राहते. सरकारी तिजोरी रिकामी करायची आणि परत यांचा डोळा जनतेच्या पैश्यावर.” इति आमचा ऑफिस बॉय गणेश.
“किती वेळ लुटत राहणार बिचाऱ्या जनतेला. मोठमोठी आश्वासने देऊन निवडणुका लढवायच्या. त्या आश्वासनांना भुलून जनता भरघोस मतांनी यांना निवडून देते. एकदा का सत्ता मिळाली कि हेच राजकारणी यांच्या वचकनामा, वचननामा, जाहीरनामा या सगळ्या पासून नामानिराळे होतात. वर थातुरमातुर बतावणी चालू होते, ‘आम्ही प्रयत्नशील आहोत, लवकरात लवकर जनतेच्या भल्या साठी निर्णय घेऊ’ वगैरे तोंडपुशी बतावणी चालू होते. कधी ना कधी तरी जाणते मधल्या असंतोषाचा उद्रेक होतो. आणि या असंतोषाच्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला काही राजकारणी पक्ष तयारच असतात. या असंतोषाची धुनी बराच काळ धुमसत रहावी आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्या साठी आंदोलने पण घडवून आणतात. टोलच्या मुद्द्याचे मोठे ‘राज’कारण काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील एका पक्षाने ऐरणी वर आणले होते. दिसला टोलनाका कि कर खळळ-खट्याक. बरेच दिवस टोलनाके त्यांच्या आंदोलनाने गाजवले पण नंतर अचानक सगळे शांत. कारण काय तर यांचे संशोधन चालू आहे कि या टोल प्रकरणात काही गफलत आहे का या वर.” चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर माझे शब्द गेल्या दोन दिवसात दिलेल्या टोलदादां वर आसूड ओढत होते.
कधी नव्हे ते शांतपणे ऐकत असलेला बाबुने त्याचे मौन सोडले. “अहो साहेब, पैश्याचा मामला आहे सगळा. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा. यांचे संशोधन आपण किंवा ते मरेस्तोवर संपणार नाही. कंत्राटदारांना यांनी इतके डोक्यावर चढवून ठेवले आहे कि यांच्या पुढे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हतबल आहेत. जो कुणी राजकारणी या वर तोंड उघडतो त्याचे तोंड बंद करण्याची कला यांना चांगलीच अवगत आहे. त्यात टोल म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीच. तिला ते कसे मरू देतील. प्रचंड पैसा खाऊन आणि घोटाळे करून टेंडर पास केल्यावर कंत्राटदारांचे मिंधे झालेले हे राजकारणी त्यांचे काही एक वाकडे करु शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या वर वचक ठेवायला सरकार तिजोरीत दुष्काळ पसरला आहे. राजकारण्यांची चर-खा संस्कृती याला कारणीभूत असली तरी त्याला आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. त्यांना जाब विचारण्यासाठी लागणारे ऐक्य आपल्यात नाही. न्यायालय देखील हेच म्हणणार कंत्राटदाराने काम केले आहे त्याचे पैसे त्याला मिळालेच पाहिजेत. लोकांना खुश करण्यासाठी केलेल्या घोषणा भविष्यात महाग पडणार असे दिसते. नाही म्हणता काही टोलनाके बंद केले पण तसेही त्या रस्त्यांवरून होणारी (वर)कमाई विशेष नसावी. एकंदरीत बघता सत्ताधाऱ्यांना त्यांचा गड राखायचा असेल तर या टोलकरींचे काहीतरी करावेच लागेल.”
मी ग्लासातला चहा संपवून टेबलावर ठेवला. ग्लास घेता घेता बाबु म्हणाला “साहेब खरे सांगू … माझ्या सारख्या सामान्य माणसाला या टोलच्या असण्या नसण्या ने काही विशेष फरक पडत नाही. आम्ही प्रवास करणार येष्टीच्या लाल डब्यातून किंवा गावाकडे एखाद्या दुचाकी वरून. दुचाकीला टोल नाही आणि आता येष्टीला टोल मधून वगळण्याचे प्रयत्न चालू आहेत पण त्याने तिकिटावर काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही. आमचे कोकणातले रस्तेच मुळात अरुंद आणि कमी गर्दीचे कोण टोल बसवणार आणि काय वसुल करणार. आता सगळेच रस्ते कंत्राटदाराला दिले तर घराच्या वेशीतून बाहेर पडल्या पडल्या पावती फाडावी लागेल. हां ! आता मुंबई गोवा महामार्ग चार पदरी करण्याचे काम चालू आहे. तो एकच रोड बिना टोलचा होता तो झाला कि मग तिथेपण वाटमारी चालू होईल. नशीब अजून रस्त्यावरून चालण्याचा हप्ता घेत नाहीत. तसे झाले तर जनताच यांना टोल-वेल.”
शेवटी एकदा दिलेल्या टोलचे पैसे जमाखर्चात धरल्याने सगळा हिशोब बरोब्बर जुळून आला होता.
अनुविना.