३१ डिसेंबर ला ऑफिस मध्ये कधीच विशेष काम नसते. त्यात देखील ज्याचे काम पाश्चिमात्य देशांवर विसंबून असेल त्यांची तर नाताळ नंतर चंगळच. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणे याच्या नियोजनातच मेंदूचा बराच भाग कार्यमग्न रहात असल्याने बाकीच्या रोजच्या कामांकडे अंमळ दुर्लक्ष्यच होते. साहेब पण आधीच थर्टी फर्स्टच्या गुंगीत असतो त्यामुळे तो पण काही विशेष बोलत नाही. कधी एकदा ६ वाजतात आणि घरी पळतो असे भाव चेहेऱ्यावर घेऊन फिरणारी माणसे उगाच दुसऱ्याच्या बे जवळ जाऊन (आजकाल टेबलाला बे म्हणतात बे … आम्हांला एक तर बे म्हटले कि नागपूरकर आठवतात किंवा बे ऑफ बेंगाल आठवतो) उगीच “मग आज काय प्लान ३१ स्ट चा?” “ओली का सुकी?” “घरीच? का कुठे बाहेर हॉटेल वर?” असले एक ना अनेक प्रश्न विचारून वात आणतात. किंवा आपण कश्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि ती कशी आगळीवेगळी आहे हे सांगून उगीच न्यूनगंड वाढवत राहतात. यांची थर्टी फर्स्ट कशी रंगली, किती बाटल्या संपल्या ते किती जण आडवे झाले याची सोमरसभरित वर्णने दुसऱ्या दिवशी कुणाला सांगितल्या शिवाय यांचा उतारा होत नाही.
अश्यातच कुणी एखादा संस्कृती रक्षक भेटला तर मग लपण्या साठी आडोश्याला जागा पण मिळत नाही. नेमका अश्या वेळीच त्यांना हिंदू असल्याचा साक्षातकार होतो आणि त्यांचा जाज्वल्य अभिमान जागा होतो. आपण आपली साधी माणसे जगरहाटी प्रमाणे वागावे…. सगळे जग या ग्रेगोरियन तारखे प्रमाणे चालते की नाही. मग नविन वर्षाचे उत्साहाने स्वागत केले तर बिघडले कुठे??? अहो वाढदिवस तारखेनेच साजरा करता ना?? पगार तारखेने येतो का तिथी ने??? आणि बरे आम्ही झेपेल तितकिच थर्टी फर्स्ट साजरी करतो आणि गुढीपाडवा अगदी साग्रसंगीत पारंपारिक पद्धतीने. आणि हो आजकाल एक नविनच फ्याड निघाले आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री अमावास्येच्या किर्रर्रर्र अंधारात फटाक्यांची रोषणाई करायची ….. त्याला पण हजेरी लावतो. आकाशातील आतिशबाजी बघुन मान अवघडायची वेळ आली तरी बेहत्तर पण शेवटच्या लवंगीचा शेवटच्या सुरसुरीचा आवाज ऐकुनच घरचा रास्ता पकडतो. थर्टी फर्स्टला मात्र बरेच जण रास्ता आधी मोजतात आणि त्या भानगडित गल्ली चुकतात. मग उगीच कशाला नको त्या ठिकाणी हिंदु अस्मिताची खिंड लढवत बसायची. पण समोरच्याला आपण कसे संस्कृतिचे पाईक आहोत हे दाखवून दिल्याशिवाय यांचा कंडू शमतच नाही. आणि दुसऱ्या दिवशी हेच हिन्दू संस्कृति सम्राट डोळे तारवटलेल्या अवस्थेत ऑफिस मध्ये येऊन लिम्बु पाण्याचा मारा करतात तेंव्हा यांची बेगडी संस्कृति कुठल्या पेल्यातल्या पेयात फसफसुन बाहेर पडते ते सांगायला कुणाचीही गरज लागत नाही.
या वर्षीची थर्टी फर्स्ट मस्त थंडीची गुलाबी शाल पांघरूनच आली होती. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जायचे म्हणून सगळ्या धामधुमीला काट मारून टेलिव्हिजन वरील मायमराठीचा कैवार घेतलेले दिलखेच अदा आणि अंगविक्षेपानी भरगच्च कार्यक्रम बघितले आणि झोपी गेलो. थोड्याच् वेळात कसलेसे भयानक स्वप्न पडले आणि घामाघुम होवून जागा झालो. बायकोला म्हणालो “स्वप्नात काळाकुट्ट काळोख बॉम्बस्फोट आणि किंकाळ्या ऐकल्या.” बायको म्हणाली “झोपा, एक तारखेचा एक वाजला तरीही अजून काही मर्काटांची थर्टी फर्स्ट संपली नाहिये. त्यांचाच आरडा ओरडा आणि फटाके वाजवणे चालु आहे. झोपा आता त्यांना माणसात यायला वेळ लागेल.” त्यांच्या या असल्या सेलिब्रेशनला शिव्या देत कधी झोप लागली ते कळलेच नाही.
एक तारखेला ऑफिसला जात होतो तर शहराला जाग यायचीच होती. नेहेमी सकाळच्या धावपळीत गुंग असलेले शहर आज दिवसभर दंगा करून, रात्रीचे जागरण करून निवांत झोपलेल्या एखाद्या तान्ह्या बाळासारखे भासत होते. शहराच्या आसमंतातली थर्टी फर्स्ट ची धुंदी, नशा का काय म्हणतात ती अजूनही उतरली नव्हती. वर कधी नव्हे ती तुरळक गर्दी नविन वर्षाची पहिलीच तारीख उदासीन करत होती. बाकी सगळे जरी नित्यनेमाचे असले तरी वातावरणात थर्टी फर्स्ट रात्रीच्या सारखा जल्लोष … तजेला नव्हता. अश्या वेळेला हमखास आठवण होते ती बाबुची आणि त्याच्या चहापान युक्त गप्पांची. आज असेल चहा का नववर्षाची सुट्टी घेतली असेल बाबू ने हा विचार करत करतच ऑफिस पाशी पोचलो. नेहेमी प्रमाणे बाबू मोठ्या भांड्यावर त्याच्या हातातील मोठ्या डावेने चहा ढवळत बसला होता. मला बघताच बाबू म्हणाला “साहेब आज तुम्हीच पहिले. कुणीच आलेलं नाहीये अजून. या खालीच चहा प्यायला … थोड्या गप्पा पण मारू. नाय तरी आज आरामच आहे. मोठे साहेब पण येणार नाहीयेत …. लंबी छुट्टी वर गेले आहेत म्हणे”. मी हो म्हणून वर सटकलो, “आयला … याला बरी सगळी खबर असते … साहेब कुठे गेलाय, ऑफिस मध्ये कोण कोण आलंय” (स्वगत)
खरंच काही ऑफिस बॉय सोडले तर बराचसा कर्मचारी वर्ग अजून आलेला नव्हता. माझ्यासारखी थोडक्यात थर्टी फर्स्ट साजरी केलेली ४-५ टाळकी वगळता ऑफिस मध्ये शुकशुकाट होता. आणि जे होते त्यांच्या मध्ये २०१४ चे सेलिब्रेशन आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिस याबद्दल जरा नाराजीच होती. या पुढे तरी पुढील वर्षी तरी १ तारखेला सुट्टी मंजूर करून घ्यायला हवी या आणि अश्या सारख्या अनेक विविधांगी मुद्द्यांवर गोलमेज परिषद चालू होती. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्थानापन्न झालो. उत्तरादाखल आलेल्या शुभेच्छांमध्ये हा आपला सण नाही, आम्ही साजरा करत नाही असा देखील सूर होता. अर्थात या सगळ्या सुरावटी कडे दुर्लक्ष्य करून मी खाली चहापाना साठी गेलो आणि आमचा “चाय विथ बाबू” कार्यक्रम सुरु झाला.
“काय मग साहेब केले का सेलिब्रेशन??” – बाबु
“नाही रे … सेलिब्रेशन कसले करतोस? आम्ही ना ग्लासातले ना तंगडीतले. आमचे सेलिब्रेशन पावभाजी, भेळ, मिसळ, मसाला दुध, आईसक्रिम अश्या कोजागिरी मेन्यू वर संपते. रात्री १२ पर्यंत उगीच जागत बसायचे, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आणि झोपी जायचे. हेच गेली कित्येक वर्षे चालू आहे. मुलं तर दमून भागून केंव्हाच झोपून जातात. मग उरतो आम्ही दोघेच.” – मी
“अहो मग जायचे ना कुठे तरी फिरायला … मुलाना पण ख्रिसमस ची सुट्टी असते. आणि इथे पण काही विशेष काम नसेलच. जायचे जरा लोणावळा, लवासा, अलिबाग, मुरबाड किंवा तिथे विरार वसईच्या पुढे कुठेतरी. जास्त सुट्टी मिळाली तर येवा कोंकण आपलोच असा.” – बाबु
“अरे कसले काय …. साहेब जातो सुट्टीवर त्यामुळे आम्हाला झकत ऑफिस मध्ये थांबावे लागते. आणि तसेही तू म्हणतोस त्या सगळी कडे आधीच गर्दी झालेली असते. जे अंतर जायला २ तास लागतात तेच अंतर अश्या वेळी ४-४ तासात देखील कापता येत नाही. सगळ्या जणांना इच्छित स्थळी पोचण्याची घाई झालेली असते. आणि तिथे जाऊन काय तर रात्रभर दंगा, मोठमोठ्या आवाजात डीजे. यात हाती काय लागते तर अस्वस्थता, जीवाचा कलकलाट. त्यात वर तळीरामांचा उच्छाद, त्यांची भांडणे, हे सगळे नको होऊन जाते. याच कारणामुळे नियमित वर्षा सहलीला जात होतो ते पण बंद झाले.” – मी
“अहो मग इथे कुठे तरी जायचे ना हॉटेल मध्ये वगैरे” – बाबु
आज बाबु माझे वैचारिक चावे घेण्याच्या मूड मध्ये होता. एवढे सांगून देखील या महात्म्याला का समजत नव्हते कि बाबा रे सध्या ज्या प्रकारे हे उत्सव साजरे केले जातात ते मलाच काय माझ्या सारख्या बऱ्याच माणसांना झेपत नाहीत. आम्ही पुरोगामी असलो तरी आम्ही आमची संस्कृती सोडलेली नाही. तरी देखील ज्या इंग्रजांनी आमच्यावर वर्षोनुवर्षे राज्य केले त्यांचे सण जरी नावापुरते का होईना आम्ही साजरे करतो. आम्ही वर्षातून एकदाच शिमगा करतो पण यांचा प्रत्येक सण शिमगोत्सवा सारखा साजरा केला जात असेल तर ते न झेपणारे आहे.
“अरे किती प्रचंड गर्दी असते त्या हॉटेल मध्ये. तासंतास थांबून जेंव्हा नंबर लागतो, बसायला टेबल मिळते तोपर्यंत अन्नावरची वासना आणि पोटातली भूक दोन्ही मृतवत झालेल्या असतात. आणि अश्या वेळी समोर जे येईल त्याच्या दर्ज्याची कल्पना/अपेक्षा न केलेली बरी. आपल्या नंतर देखील तिथे इतके लोकं रांगेत उभे असतात कि तिथला वेटर देखील कधी एकदा हे ऑर्डर संपवतात आणि जागा रिकामी करतात अश्या निरागसतेने बघत असतो. त्याला बघुन डेझर्ट पण डेझर्ट सारखे वाटायला लागते” – मी
“छे! तुम्ही सगळा मजाच घालवला. मला वाटले काहीतरी रसभरीत वर्णन ऐकायला मिळेल तर कसले काय …. तुम्ही तर पार गळपटले. मी आणि बायको मस्त चौपाटी वर गेलो … भेळ पूरी खाल्ली …. गाडी वरचा फालूदा खाल्ला आणि घरी येऊन निवांत झोपलो. पोरं गेली होती त्यांच्या फ्रेंड्स कडे. पोरगा आता वयात आलाय. दरवाजा उघडताना पाहिले कुत्र्यासारखे हुंगले त्याला … खात्री केली आणि मगच घरात. दोघांना व्यवस्थित पूर्ण कपड्यात धाडले होते. जिथे जाणार तिकडचा पत्ता, फोन नंबर सगळे घेतले होते आणि मगच परवानगी दिली. आधी थोड़ी कुरबुर केली दोघांनी पण मी आणि बायको ठाम होतो. ही माहिती दिलीत तरच जायला मिळेल. साहेब आपण संस्कार करतो पण संगत कशी असेल हे काय सांगू शकतो. मी दिवसभर इथे धंद्यावर … बायको पोळी भाजी केंद्रात नोकरीला. फार पैश्याचे सुख देऊ शकत नाही पण निदान पुरेसे शिक्षण आणि संस्कार तर देऊ शकतोच ना.” – बाबु
“हो रे अगदी खरे आहे. माझी मुले लहान आहेत पण हाच विचार नेहमी करत असतो. रस्त्यावरुन फिरणाऱ्या हुल्लडबाज टोळक्या मध्ये आपले पोर असावे असे कुठल्या आई बापाला वाटेल? त्यात वाढती गुन्हेगारी, वाईट संगती मुळे लागणारी व्यसने यांचा सारासार विचार करण्याची कुवतच हरवत चाललेला तरुण वर्ग बघितला की चिंता वाटते. चिमुटभर पैश्यासाठी काहीही विचार न करता सरसावणारी, मना विरुद्ध घडले की घरातून पळून जाणारी वेळ प्रसंगी जीव देणारी कॉलेज वयीन मुले बघितली की त्यांच्या आई बापाचा विचार मनात येतो. सगळी दुःख सहन करुन मुलांना जन्म द्यायचा, दिवसभर राबुन, कष्ट करून त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे … त्यांना समाजात वावरण्याची समज द्यायची आणि एखाद्या नाजुक क्षणी लागलेली वाईट संगत जर या सगळ्या कष्टावर पाणी फिरवत असेल तर काय करावे. त्यातून डोलारा सावरला तर ठीक नाहीतर कशाला ९ महीने पोटात पिंड वाढवून त्याला ब्रह्मांड दाखवले असे त्या मायबापाला वाटले तर चुकले कुठे त्यांचे? काल आजूबाजूच्या बिल्डींग मधून १२ वाजताना एकदम गोंगाट, आरडाओरड, किंकाळ्या ऐकायला आल्या. या हल्लकल्लोळालाच जल्लोष म्हणत असतील तर असे उत्सव साजरे न केलेलेच बरे.” – मी
“अहो साहेब, या सगळ्या बेजबाबदारपणाला आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. नोकरी करणाऱ्या आई बापांचे लक्ष नाही. पैसा आणून दिला कि काम झाले असे थोडीच होते. लहानपणी लालूच दाखवतच मुलांना मोठे केले. पराकोटीचे लाड आणि पराकोटीची शिस्त या दोन्ही गोष्टी नव्या पिढीसाठी मारक ठरू शकतात. आई बाप डीस्कोच्या ठेक्यावर नाचतात मग त्यांच्या मुला मुलींनी त्यांचे अनुकरण केले तर वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे? आज मित्रां बरोबर ओली पार्टी करून आल्यावर घराच्या पायऱ्या सुद्धा न चढता येणाऱ्या बापाला त्याचा मुलगा पायरी सोडून वागू लागला तर त्याला दुषणे देण्याचा नैतिक अधिकार राहतो का? आपल्या लहान मुलांसमोर नवरा बायको तोंड सोडून भांडत असतात आणि ते बघून मुलांनी पुढे जर उलट उत्तरे दिली तर मुल बिघडले असे म्हणून मोकळे होता … पण त्याचे मूळ कारण आपणच आहोत हे लक्षात येत नाही. आपल्या मुला मुलींना मैत्रीपूर्ण वागणूक द्यायचे नवीन फ्याड आले आहे. चांगलेच आहे ते या मुळे सुसंवाद वाढायला मदतच होईल. पण व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा, संयम आणि संस्कारांची चौकट असायलाच हवी नाहीतर अजून काही वर्षांनी थर्टी फर्स्ट डर्टी फर्स्ट व्हायला वेळ लागणार नाही.” – बाबु
साधारण शिकलेला बाबू देखील सभोवतालची परिस्थिती पाहून शहाणा झाला. आपण मात्र अजूनही पैसे कमावण्याच्या कोलुला जखडून घेतले आहे. घरात सुसंवाद राहिले नाहीत तर हे डर्टी फर्स्ट चे लोण हळू हळू गुढीपाडाव्याच्या औक्षणा पर्यंत कधी येऊन पोहोचेल याचा पत्ता लागणार नाही. आजचा चहा जरा जास्तच कडक असला तरी त्याचा तजेला मात्र नववर्ष्याच्या उदासीन वातावरणात हरवला होता.
अनुविना.