चार भाई

माझा बालपणीचा बराचसा काळ डोंबिवली म्युनिसिपाल्टीच्या (त्या वेळचि डोंबिवली नगर परिषद) समोरच्या गल्ली मधल्या परिसरात गेला. खेळायला भरपूर जागा असल्याने आम्हा पोरा टोरांची दंगामस्ती चालायची.   बिबिकरांचा वाडा, तयशेट्ये यांची शुभांगी दर्शन (नार्वेकर ज्वेलर्स ची बिल्डिंग) वादळ बिल्डिंग, जुवेकरांचा वाडा, बाजुला कुलकर्ण्यांचा वाडा अशी आमची हद्द असायची. शुभांगी दर्शन चाळ स्वरुपाची असल्याने तिथे बिर्हाडकरू मुबलक आणि पर्यायाने बच्चे कंपनी पण भरपूर. प्रत्येक वयोगटाची 10-12 टाळकि असायचिच दंगामस्ती करायला ….त्यात मी आणि  माझे सवंगडी देखिल होते. आम्ही वादळ बिल्डिंगच्या तळ मजल्यावर रहायचो. घरासमोर आम्हाला खेळण्या पुरते आँगन होते. त्यामुळे काय खेळायचे असा प्रश्न कधीच पडला नाही. लंगड़ी, कबड्डी, लपाछपी, डबा ऐसपैस, लगोरी आणि क्वचित कधीतरी क्रिकेट …. अगदी फावल्या वेळात होपिंग करत करत सायकली पण धावडवल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी तर ती गल्ली दणाणुन सोडली आहे.
शुभांगी दर्शन मध्ये दुसर्या मजल्यावर शहा कुटुंब रहायचे. दोन खोल्यांच्या बिर्हाडात शहा पति पत्नी आणि त्यांची ४ मुले ….. चारही मुलगे …. २ -४  वर्षांच्या अंतराने झालेले. सर्वात मोठा विजय उर्फ़ पप्पू (हा माझ्या पेक्षा देखिल 1-2 वर्षानी मोठा होता). क्रमांक दोन चा अश्विन, क्रमांक तिन अतुल, आणि क्रमांक चार विपुल. या चारही भावांमध्ये साम्य एकच ते म्हणजे ते चारही जण त्या काळच्या प्रसिद्ध ग्रीन्स इंग्लिश स्कुल मध्ये शिकायला जायचे. बाकी रंग, रूप, आकार यात कमालीचा फरक. बहुतेक वेळा हे चारही जण कायम एकत्र. खेळता खेळता त्यातला एकाला कुणाला जरी बोलावणे आले तरी चारही जण गायब व्हायचे. संध्याकाळी खेळायला येताना पण चारही जण बरोबर. धाकटा विपुल त्याच्या आई बरोबर असायचा पण नंतर मग तो पण शेपटा सारखा आमच्या मागे.
त्यांच्या आईला आम्ही पप्पुच्याई (पप्पू च्या आई) म्हाणायाचो. तिथे कुणीही बाई एकमेकींना नावाने का हाक मारत नसत हा त्या काळी पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक गहन प्रश्न होता. अमक्याच्याई …. तमक्याच्याई …. ही काही तरी अजब प्रकारची हाक मारायची पद्धत. तर या पप्पुच्याई जाम कडक होत्या. शिडशिडित बांधा आणि टिपिकल गुजराथी. गुजराथी पद्धतीची साडी, लांबसडक केसांची वेणी, तार सप्ताकातिल किरटा आवाज. या चौघांपैकी कुणाला ना कुणाला तरी कायम ओरडत असायची. अर्थात चार दंगेखोर मुलांच्या आईला प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे खुपच कठिण आहे हे अत्ता पटते.
पप्पू आणि मी जवळ जवळ सारख्याच वयाचे त्यामुळे आमच्या दोघांचे सख्य अधिक. पण बाकी सगळ्याच दृष्टीने कुठेच सारखे पणा नव्हता. ते जैन तर आम्ही पक्के कोकणस्थ ब्राह्मण. घरातील भाषाच काय पण शाळेतिल विषयांचे माध्यम देखिल वेगवेगळे. पण लहानपणी ही असली कुठलीही बंधने कधीच आड आली नाहित. पप्पू बरोबर एकदा मी त्यांच्या मंदिरात गेलो होतो …. उत्सुकता म्हणुन. तिथे तो जसे करत होता तसेच मी पण केले. पिवळा टिळा लावून घरी आलो आणि मग परत कधी जायचे धाडस झाले नाही. अश्विन माझ्यापेक्षा वयाने लहान. पप्पू स्वभावाने जितका शांत तितकाच अश्विन मस्तीखोर. मुळात तो आधी अजोळी रहायचा. माझ्याशी गप्पा मारताना तो त्याच्या अजोळच्या गोष्टी सॉलिड रंगवून सांगायचा आणि मी पण गुंग व्हायचो. त्याचे घोड्यावरून फ़िरणे काय …. तलवारी काय…. त्या मारामार्या काय …. जणू हे तिथले जहागीरदार किंवा वतनदारच. हे सगळे धादांत खोटे असणार हे अत्ता पटतय कारण त्याचे अजोळ होते “मरोळ”. अतुल …. तिन नंबर … हा नेहेमी मला कुठल्या ना कुठल्या पिक्चरची स्टोरी सांगायचा. उपकार या चित्रपटातले “मेरे देश की धरती” हे त्याचे फेवरिट गाणे. खेळताना याला आम्ही बरेच वेळा बकरा बनवायचो. धाकट्या विपुलशी कधी विशेष सूत जुळले नाही कारण त्याच्या आईने पदर झटकला की तो आमच्यात यायचा. आणि आम्ही कधी याची खोड काढली की रडत घरी जायचा. त्याचे असे निर्गमन झाले की हे तिघे त्यांच्या आईच्या हाकेकडे लक्ष ठेवून असायचे. वरून आरोळी आली की सगले धूम पसार.
पप्पुच्या घराचा उम्बराठा ओलाण्डायची वेळ कधीच आली नाही. बाहेर खेळायला इतकी मुबलक जागा असल्यावर आम्ही घराच्या चार भिंती मध्ये सामावणे निव्वळ अशक्य. बैठे खेळ देखिल जिन्यात किंवा चाळीच्या संयुक्त बालकनी मध्ये खेळले जायचे. संयुक्त बाल्कनी मध्ये यांच्या घरा समोर कायम काही ना काही तरी वाळवणे टाकलेली असायची. घर एकदम स्वच्छ …. लखलखित असायचे. कधी कुठे पसारा दिसायचा नाही …. एकंदरीत पप्पुच्याई कड़क शिस्तिच्या होत्या. या चार महात्म्यांचा पालनकर्ता बघितल्याचे आठवत नाही कारण त्यावेळी तिन्हीसांजेला आम्ही आपापल्या घरात असायचो. त्यांच्या पोषणकर्ती चा दराराच इतका होता की एकाला हाक मारली की क्रमाक्रमाने चारही बंधू घरी पोचायाचे.
परिक्षेच्या काळात मात्र या चौघांपैकी कुणीच खेळायला यायचे नाही. एकदाच त्याना बोलवायला गेलो होतो. तर हे चारही जण चार कोपर्यात भिंती कडे तोंड करून घोकम्पत्ति करत बसले होते. पप्पुच्याईने नुसते माझ्याकडे बघितले आणि मी तिथून पसार झालो. परीक्षा संपल्यावर मात्र धम्माल चालायची. सकाळचि अन्हिके उरकून सगळे खाली जमयचो मग जेवायला घरी. नंतरचा प्लान असायचा बाल्कनी मधे काहीतरी टाईमपास. 4 वाजले की पप्पुच्याई पप्पूला किंवा अश्विनला बोलवून त्याच्या हातात एक पिशवी आणि काही पैसे द्यायच्या. आणि बाकीचे तिघे हळु हळु घरी जायचे. पप्पू / अश्विन पिशवीतुन विब्स ब्रेड्चा पुडा घेउन यायचा. ब्रेड्च्या स्लाइसची चौघां मध्ये समसमान वाटणी व्हायची. पप्पुच्याई प्रत्येकाला कपात गरमागरम वाफालालेला चहा द्यायच्या. चहात पाव बुडवून खाताना चहा संपला तर परत मिळायचा. बाकीची आमची सेना हे सगळे कुतुहलाने पहात असायचो. कार्यभाग संपला की मग परत हे चौघे खेळायला बाहेर. एखादी गोष्ट भावंडामध्ये काटेकोर रित्या वाटुन खाण्याची अजब पद्धत होती त्यांची. आपापसात एकमेकाना लोळवतिल पण दुसर्या कुणी या पैकी एकाला जरी दमबाजी केली तर सगळे एक होतील. मला त्यांच्या याच एकीचे खुप अप्रूप वाटायचे.
माझ्या वयाच्या 12व्या वर्षी आम्ही ती जागा सोडली आणि चार रस्ता चौकातील डोंगरे यांच्या नविन बिल्डिंग मध्ये रहायला आलो. नविन जागी स्थिरावताना नविन मित्र जोडले गेले आणि हे चारही भाऊ माझ्या पासून कायमचे दुरावले. कालांतराने त्यानी देखिल डोम्बिवली सोडल्याचे ऐकले. या घटनेला आता जवळ जवळ 25 एक वर्षे झाली असतील. पण आजही त्या गल्लीत गेल्यावर बालपणी चा गंध रोमारोमाला स्पर्श करुन जातो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं म्हणताना उगीचच वाटत राहतं … कुठे असतील ते सगळे असेच एकत्र असतील का भरकटले असतील वार्यावर उडालेल्या रांगोळीच्या कणां सारखे?

प्राचार्य – भाग ०२

बऱ्याच दिवसांनी प्राचार्य – भाग ०२ टाकत आहे. कामाच्या व्यापात राहून गेलं. पण आज “शिक्षक दिन” आणि या निमित्ताने हा लेख अनुविना वर येत असल्यामुळे एक वेगळाच आनंद होत आहे. तसं बघायला गेलं तर सरांच्या बाबतीतले लेखन कधीच पूर्ण होणार नाही. तरी देखील सरांच्या स्मृतींना माझे विनम्र अभिवादन.

VajpeiSir01१९६२-९९ या कालावधीत डोंबिवलीच्या टिळक नगर शाळेने खर्या अर्थाने सुवर्णकाळ अनुभवला. या शाळेचं आणि प्राचार्य सुरेन्द्र बाजपेई सरांचे नातंच वेगळ. शाळा तिच्या नावाने कमी आणि बाजपेई सरांमुळे जास्त ओळखली जायची. त्यांच्या कारकिर्दी मध्ये टिळक नगर शाळा आणि पर्यायाने शिक्षण सहकार संस्था खर्या अर्थाने नावारुपाला आली. बाजपेई सरांनी शिक्षणाच्या जोडीला क्रीडा क्षेत्रात देखिल विविध उपक्रम चालु केले होते. कुठल्याही विषयाचे सखोल ज्ञान, विद्यार्थ्यांवर असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्याची आवड या मुळे निवृत्ति नंतर पण त्यांच्या कामाचा आवाका एखाद्या तरुण व्यक्तीला लाजवेल असाच होता.

असामान्य व्यक्तिमत्व लाभलेला एक आसामी. हाडाचे शिक्षक आणि उत्तम प्रशासक. समोरच्या विद्यार्थ्याच्या काळजाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि त्या नजरेला साजेसा भरदार आवाज. या निसर्गदत्त गुणांमुळे जरब, धाक, शिस्त या सगळ्या शब्दांची पुरेपूर ओळख आम्हाला शालेय जिवनातच झालेली होती. नेहेमी कडक इस्त्री केलेले कपडे घालणारा हा माणूस तितक्याच कडक शिस्तीचा भोक्ता होता. टिळकनगर शाळेत विद्यार्थी आला की त्याला योग्य शिस्त लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम. या सगळ्या “जरब” दस्त व्यक्तिमत्वाच्या जोडीला एक वेताची छडी किंवा पिवळ्या रंगाची जाड लाकडी पट्टी बरोबर असायचीच. त्यांच्या गणवेशाचाच एक भाग म्हणा हवं तर. त्यांचा दराराच इतका होता की इतर शिक्षक पण त्यांना बिचकुनच असायचे. म्हणुनच कदाचित त्यांच्या कारकिर्दीत आमच्या शाळेत शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संप, गुंड प्रवृत्तिच्या विद्यार्थ्यांची मुजोरी, गुंडगिरी, दादागिरी या सगळ्या अवांतर गोष्टींना अजिबात थारा नव्हता. शाळेच्या बाहेर देखिल त्यांचा हा दरारा कायम होता. आजही शाळेच्या परिसरात कुठेही पानाची टपरी किंवा खाद्य पदार्थ विक्रेते दिसून येत नाहित. याचे श्रेय बाजपेई सरांनाच जाते.

हा माणूस खरच विलक्षण होता. मुख्याध्यापक होते तेंव्हा सगळ्या शाळेवर त्यांची बारीक नजर असायची. ते शाळेत असले की चिडीचुप शांतता असायची. पण ती शांतता कधी भयाण वाटली नाही. शाळेतली अशी शांतता सरांचे अस्तित्व सांगून जायची. रिकाम्या वेळात कित्येक वेळा त्याना मी शाळेतिल झाडांना पाणी घालताना बघितले आहे. विद्यार्थ्यांमधिल कला गुणांना त्यानी नेहेमी प्रोत्साहन दिले. शालेय जीवनात त्यांच्या वरील आदरयुक्त भीती मुळे त्यांच्याबद्दल कधीच विशेष आपुलकी वाटली नाही. कदाचित त्यांच्या नजरेने, आवाजाने आणि त्यांच्या हातातल्या छड़ी मुळे विद्यार्थी त्यांच्या पासून ४ हात दूर असायचे. आमच्यवेळी ते शाळेचे मुख्याध्यापक असल्याने आम्हाला ते शिकवायला नव्हते हे त्यावेळी वाटलेले सुदैव अता मात्र दुर्दैव आणि कमनशिब वाटते. मुलाना शिस्त लावताना त्यांच्या जीव्हाग्रे तांडव चालु असायचे तर भाषण करताना मात्र सरस्वती नंदायाची. कधीही यांनी भाषण लिहून आणलय आणि वाचुन दाखवले आहे असे झाले नाही. ओघवती भाषा, सुस्पष्ट आवाज आणि उत्कृष्ट वक्तृत्व लाभलेले दुसरे शिक्षक माझ्या पाहण्यात नाही. म्हणून तर भारतात झालेल्या एशियाड स्पर्धेच्या वेळी हिंदी मध्ये धावते समालोचन करण्या साठी बाजपेई सराना पाचारण करण्यात आले होते. हा एक मोठा सन्मान त्यांच्या मुळे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला मिळाला.

त्याना मिळालेल्या पुरस्कारांची मोजदाद करणे खरच कठिण आहे. अगदी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार ते जनगणनेत केलेल्या उल्लेखनीय कामामुळे राष्ट्रपति पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी केलेल्या कामाची त्यांच्या अष्टपैलुत्वाची ग्वाही देतात. विविध संस्थांचे मानाचे पद भुषवताना त्यांनी केवळ संस्थेच्या विकासाचा प्रगतीचाच विचार केला. कर्मण्येवाधिकारस्ते या उक्ती प्रमाणे प्रसिद्धि पराङ्ग्मुख राहून त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य अविरत पणे चालु ठेवले. १९९९ साली सर प्राचार्य या पदावरून निवृत्त झाले. पण अशी धडाडीची माणसे निवृत्त थोडीच होतात …. त्यांनी आपले वानप्रस्थ सामाजिक आणि सांस्कृतिक कामांसाठी अर्पण केले. कुशल प्रशासक, उत्तम वक्ता, उत्कृष्ठ शिक्षक याच जोडीला व्यासंगी लेखक हा पैलू देखिल सरांनी जोपासला. लोकसत्ता या दैनिकात शिक्षण विषयक लेखमाला लिहिली आणि पुढे त्याचीच परिणिती “चैतन्याचे झरे” आणि “उगवते सूर्य” यांच्या पुस्तकाने झाली.

१२ वी ला नंतर शाळेशी आणि पर्यायाने बाजपेई सरांशी विशेष संबंध आला नाही. डोंबिवलीत फिरताना कुठे लाउडस्पिकर वर त्यांचा ओळखीचा आवाज ऐकला तर चार शब्द कानावर पाडून घेण्यासाठी पाउले नकळत वळायची. मग एखाद्या व्यासपीठावर त्याच धडाडीने भाषण करताना ते दिसायचे … त्याच उत्साहाने. कधी लक्ष गेलं तर  मंद स्मित करायचे तेंव्हा बारावीच्या पहिल्या दिवसाची आठवण व्हायची. तेंव्हा वाटायचे की सरांनी खरच आपल्याला ओळखले असेल का? की असच मी हसलो म्हणून त्यांनी ओळख दाखवली असे नेहेमी वाटायचे. पण एका उपनयन समारंभात त्यांची भेट झाली आणि या शंकेचे देखिल निरसन झाले. या समारंभात बाजपेई सर आलेत असे कळले. त्यांना शोधायला विशेष कष्ट पडले नाहीत. जिथे गर्दी होती तिथेच हे असतील अशी खात्रीच होती. थोडा बिचकतच त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. समोर कोण उभं आहे हे बघण्या करता त्यांनी वर बघितले. इतक्या वर्षांनंतर देखील त्यांच्या नजरेला नजर न मिळवता मी सरळ त्यांच्या पाया पडलो. शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर बसायला सांगून “काय भातखंडे? काय चालू आहे सध्या?” अशी नावानिशी चौकशी केल्यावर मला अतिशय आनंद झालाच आणि वर आश्चर्याचा सुखद धक्का देखील बसला. त्यांच्या कारकीर्दीत शाळेतून बाहेर पडलेल्या लाखो यःकश्चित विद्यार्थ्यांपैकी मी एक आणि तरी देखील मी कोण हे त्यांच्या स्मरणात होते हे खरंच सुखावह होते.

डोंबिवली मधील कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात बाजपेई सरांचा सक्रीय सहभाग नाही असे कधीच झाले नाही. त्यासाठी त्यांना कधी विशेष आमंत्रणाची देखील गरज भासली नाही. ६ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री बाजपेई सरांना देवाज्ञा झाली आणि डोंबिवलीकर एका महान व्यक्तिमत्वाला मुकला. शैक्षणिक आणि सांस्कृतिक डोंबिवली पोरकी झाली आणि शाळेतली शांतता भयाण वाटू लागली. येणार्या दिवाळीत डोंबिवलीच्या गणपति संस्थानाच्या व्यासपीठावर त्यांचे रिक्त आसन डोंबिवलीकरांना अस्वस्थ करेल…. कारण व्यासपिठा वर गरजणारा ओळखीचा आवाज शांत झालाय….. कायमचाच ….चिरकालीन.

फोटो सौजन्य: श्री. अमित भुस्कुटे.

प्राचार्य – भाग ०१

विज्ञान शाखेत प्रवेश मिळवायला पुरेसे गुण न मिळाल्याने आणि पुढील शिक्षण विज्ञान शाखेतुनच करायचे असा हट्ट असल्याने महाविद्यालयीन प्रवेशा साठी ससेहोलपट सुरु झाली होती. बऱ्याच कॉलेजांचे उंबरठे झिजवता झिजवता हक्काचे टिळक नगर महाविद्यालय हातातून निसटले होते. बाकीच्या ठिकाणी देखिल निराशाच पदरी पडली. मनाचा हिय्या करून परत टिळक नगरच्या तत्कालीन प्राचार्याना भेटलो. त्यांनी किमान शब्दात नकार कळवुन माझी बोळवण केली. त्यांचे पण बरोबरच होते म्हणा… जेंव्हा मला प्रवेश मिळत होता तेंव्हा घेतला नाही आणि आता कुठेच मिळत नाही म्हणून माझ्या परत येण्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला होता. खरे तर त्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असून सुद्धा मी परत का गेलो असा प्रश्न मला बरेचदा पडतो.

शेवटी जिल्हा परिषदेचे पाय धरले आणि माझ्या सारख्या काही समदु:खी, प्रलोभनांना फसलेल्या, फिरून फिरून दमलेल्या ३० – ३५ विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. किडलैंड या डोम्बिवलीच्या शाळेच्या खांद्यावर आमची जबाबदारी झटकून झेड पी मोकळी झाली. कॉलेज चालु झाले पण शिक्षणाच्या नावाने आनंदी आनंदच होता. शाळाच ती, त्याच सोयींमध्ये कॉलेज कसे चालवणार? शेवटी व्हायचे तेच झाले. अकरावी चे शिवधनुष्य आमच्या पेक्षा शाळेलाच जड झाले आणि आमची जबाबदारी परत एकदा झेड पी वर येउन पडली. याच अस्थिर वातावरणात जिथे वर्ष फुकट जाते की काय अशी चिंता लागुन राहिली असताना परत प्रवेशासाठी धडपड करणे म्हणजे एक दिव्य होते. आणि परत अश्याच एखाद्या शाळेत आमची सोय केली तर मग कॉलेजच्या शिक्षणाची पुरे वाट लागली असती. पण आमचा भवितव्याचा निर्णय आधीच झाला होता. झेड पी ने ठाणे, डोम्बिवली परिसरातील प्रत्येक महाविद्यालयात २ – २, ३ – ३ विद्यार्थी घुसवुन टाकले. यादी जाहीर झाली … माझ्या आणि माझा मित्र अमित भुस्कुटे याच्या नावापुढे टिळक नगर महाविद्यालय हे नाव वाचले आणि एक अनाहूत भीती वाटायला लागली. परत तेच प्राचार्य … शालेय जीवनात दहा बारा वर्षे अनुभवलेला धाक, शिस्त किमान एक वर्ष तरी सामोरे जावे लागणार.

पहिल्या दिवशी जेंव्हा कॉलेज मध्ये गेलो तेंव्हा माहेरी आल्या सारखं वाटलं. ज्या वातावरणाची गेली ११ वर्षे सवय होती त्यात नवखेपणा कुठून येणार. या कडक शिस्तीला, नजरेच्या धाकाला आम्ही चांगलेच सरावलो होतो. शिपायाचा निरोप आला “तुम्हाला सरांनी बोलावले आहे. घरी जाताना भेटून जा”. हे त्याचे शब्द म्हणजे “यमाने तुम्हाला बोलावले आहे …. लाकडे पेटवून तयार रहा” अशा स्वरुपाची भासली. दिवसाचे तास संपले आणि परत शिपाई म्हणाला “भेटून जा सरांना … नाहीतर जाल तसेच”. आमचा वर्ग आणि प्राचार्यांची केबीन हे अंतर म्हणजे जेमतेम १०० मीटर असेल पण तेच १०० मैल वाटत होते. हृदयाची धडधड कमालीची वाढली होती … पोटात येणार्या गोळ्याचे भाऊबंध शरीरातील इतर कुठल्या कुठल्या अवयावात अचानक उत्पन्न झाले होते याचे अनुमान लावणे खरच शक्य नव्हते. मजल दरमजल करत आम्ही त्यांच्या केबीन च्या दरवाज्यात उभे राहिलो. आत येऊ का हे विचारताना मान खाली आणि नजर आमच्या पायाच्या अंगठ्या वर खिळलेली हा अंगवळणी पडलेला शालेय शिरस्त्याचे पालन त्यावेळी देखिल झाले …. अगदी नकळत. सिंहाच्या पिंजर्याच्या दरवाज्यात उभे राहणे …. त्या नंतरच्या डरकाळ्या …. भीतीने उडालेली गाळण … वेताच्या छडीचे दोन चार वार …. विद्यार्थी नेस्तनाबूत .. परत एक “दाखला” देणारी डारकाळी …. हा क्रम वर्षोंवर्ष पाठ झालेला …. अनुभवलेला. पण ही वेळ वेगळी होती …काहीच अपराध केला नसल्याने शिक्षेची भीती नव्हती. विद्यार्थ्यांवर जरब असणे हा त्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग होता.

आतून आवाज आला “या”. नजर वर करून बघितले तर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. प्रसन्न चेहेर्याचे हसरे प्राचार्य मी कधीच बघितले नव्हते. क्षणार्धात केबिन मधील वातावरण सुसह्य वाटत होते. त्यांची भेदक नजर अचानक सौम्य वाटायला लागली पण आवाजाला तीच धार होती. “मीच झेड पी मध्ये सांगून तुम्हांला या महाविद्यालयात प्रवेश दिला. म्हटलं माझी मुले आहेत परत माझ्या कडेच पाठवा. अकरावीत तुमची आबाळ झाली आता नीट मन लावून अभ्यास करा”. नेहेमीच ताशेरे ओढणारे शब्द या वेळी मात्र हळुवार फुंकर मारून गेले.