पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ५

शाळेची बस निघून गेली आणि तिच्या बरोबर घाईत असणारे पालक पण निघून गेले. आता वर्गात १०-१५ निवडक पालक आणि समोर त्यांच्या शंकांचे निराकरण करणारा शिक्षक वर्ग इतकेच जण होते. एक एक पालक आपापल्या मुलांच्या प्रगतीच्या अनुषंगाने त्यांच्या शंका विचारत होते पण शेवटी सूर तक्रारीचाच असायचा. पालकांचे संदर्भ आणि त्यावर शिक्षकांचे निरुपण उत्तम चालले होते. पालक आणि शिक्षकांचे संवाद ऐकल्यावर वाटलं की सगळी कडे चित्र जवळ जवळ सारखंच आहे. काही पालक विशेषतः “मातृ”खाते चेहेऱ्यावरूनच त्रस्त वाटत होतं आणि “पितृ”खाते पिडीत(मुलांना आणले नव्हते नाहीतर ते निश्चित शोषित वाटले असते). व्यक्ती, प्रकृती हाच काय तो फरक. सगळ्या शिक्षिका एखाद्या मानसोपचार तज्ञ असल्या प्रमाणे समुपदेशन करत होत्या. मुलं खात पीत नाहीत, ऐकत नाहीत, हट्ट करतात, लक्ष देत नाहीत असे सर्वांगीण प्रश्न होते. आता यात त्या गुरुमाउली काय करणार हा माझ्यासाठी एक अभेद्य प्रश्न होता. काही आशयपूर्ण आणि काही निरर्थक प्रश्नांनी माझी मात्र करमणूक होत होती. एकूण काय तर कुटुंबामध्ये कसलाच समन्वय नाही, संवाद नाही. चालू होती ती निव्वळ ओढाताण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीची खेचा खेच. विचारात गढून गेलेल्या माझ्या मेंदूने मझ्यातला युरेका जागवला आणि मी कोण आहे कुठे आहे आजूबाजूला काय चालू आहे याचा विचार न करता दोन्ही हातानी टाळी वाजवली. आरती करताना देखील माझ्या टाळीचा आवाज माझ्या व्यतिरिक्त कोणालाच ऐकायला जात नाही पण नेमका त्या वेळी मात्र जोरदार आवाज झाला आणि परत एकदा उपस्थितांच्या नजरेच्या केंद्रस्थानी मी होतो.

“Do you want to say something? You don’t need to clap, just raise your hand” असं कुठल्या तरी बाई म्हणाल्या. पुढे किती तरी वेळ माझे कान फक्त उघडे होते आणि डोकं खाली करून बसलो होतो. काही असेही होते ज्यांना आपल्या मुलाची प्रगती/अधोगती जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यावर शिक्षकवर्गाचे आभार मानून ते निघून गेले. आता मागे राहिलो आम्ही आणि अजून काही टाळकी. माझ्या बायकोने तिच्या पर्स मधून एक मोठा कागद काढला. त्यावर बरेच प्रश्न लिहिलेले होते.बायको नुसती नट्टापट्टा न करता पूर्ण तयारीनिशी आलेली बघून मी अगदी सदगदित झालो. मी म्हटलं “मी पण दिले असते २-४ प्रश्न”. ठसक्यात उत्तर आले. “मला माहित आहे तुझे प्रश्न काय लेव्हलचे असू शकतील. मी सगळेच यात कव्हर केले आहेत.” मी परत प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने हात वर केला. तितक्यात त्या सायन्सच्या टीचर कोमोली मुखर्जीनी आम्हालाच विचारले “आर्यांचे पेरेंट्स ना?” आणि जो होवू नव्हे तो गोंधळ झाला, बोटांचे चाळे करत असलेल्या आर्यांच्या हातावर बसणारी चापट माझ्या हातावर बसली. दबक्या आवाजात आर्याला दामटवत असताना बायकोचा नेम आणि टार्गेट दोन्ही चुकले होते. आमची ही धडपड बघून वर्गात खस खस पिकली नसती तरच नवल. आणि त्यातच बायकोच्या चेहेर्यावर “नेहेमीचीच शोभा करून घेता (म्हणून मी तुला कुठे नेत नाही)” असे भाव. इतक्यात तिच्या मुख्य वर्गशिक्षिका म्हणाल्या “तुमची मुलगी अतिशय बडबड करते आणि त्यामुळे इतर मुलांचे लक्ष वेधून घेते. एका जागी शांत पण बसत नाही.” मी सॉलिड खुश इतका कि मी माझ्या चेहेर्यावरचे भाव लपवता लपवू शकलो नाही. … चला, निदान हा गुण तरी बापाच्या गुण(सुत्रातून) आलेला आहे. आणि नेमके उलट भाव माझ्या बायकोच्या चेहेर्यावर. ती काही बोलणार इतक्यात मीच विचारले “पण मग अभ्यासाचे विचारल्यावर उत्तरे देते ना?” पलीकडून उत्तर “हो” आले आणि (आम्ही बसलो होतो तिकडच्या) वातावरणात थोडा गारवा आला. “अहो काय सांगू … ती इतकी गोड बोलते ना … आम्ही घरी गप्पच मारत असतो. फुल धुमाकूळ आणि करमणूक असते …. आमच्या घरात आम्ही तिला FM ची बालवाहिनी म्हणतो …. ह्या ह्या ह्या” या माझ्या वक्तव्याची शिक्षा लगेच मिळाली. परत एकदा कोपर लागले आणि परत एकदा तोच दबका आवाज तिच्या अंतरात्म्याकडून आलेला “आता मिटिंग होई पर्यंत तू काहीच बोलायचे नाहीयेस”.  एक भयाण शांतता आणि माझ्या कानात मुलीची कुजबुज “आई जाम भडकली आहे …. बाबा आता तू काहीच बोलू नको”. शक्य तितके करुण भाव चेहेर्यावर आणण्याचा प्रयत्न करत मी पुढील संभाषण ऐकू लागलो.

माझ्या पत्नीने सगळे प्रश्न आणि (कु)शंका एका डायरी मध्ये लिहून आणल्या होत्या त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांचे निराकरण झाले होते. मुलीची एकंदरीत शिक्षण आणि अवांतर विषयांमधील प्रगती विचारली. त्यांच्या उत्तराने बायकोचे समाधान झाले असणार कारण शेवटी निर्वाणीचा प्रश्न आला “तुम्ही जी शाळेत शिस्त लावता किंवा अभ्यास करून घेता या व्यतिरिक्त आम्हीअजून काही करायला हवय का?” टीचर म्हणाल्या “तिला रोज १५ मिनिटे एका जागी न बोलता न हालचाल करता उभं करा. इथे आम्ही इतक्या लहान मुलांना असे करू शकत नाही” आणि माझ्यातला बाप जागा झाला. “चंचलपणा तिचा स्वभावगुण आहे. वयोमानापरत्वे तो कमी होईल. तिची काही चूक झाली असेल तरीही आम्ही उगीच मारझोड न करता तिला योग्य ती शिक्षा करतो. ती शांत बसत नाही म्हणून मी तिला सक्तीने अजिबात उभी करणार नाही आणि ती जितकी चंचल आहे तितकीच समजूतदार देखील. आमचा धाक, आमची जरब हे केवळ नजर आणि आवाजाने ठेवतो. तिच्या अभ्यासात काही कमी असेल तर जरूर सांगा आमच्या कडून आम्ही योग्य तो प्रयत्न करू. मला एक आठवड्याची मुदत द्या ती वर्गात तास चालू असताना कुणाशीही गप्पा मारणार नाही आणि इतर मुलांचे लक्ष पण वेधून घेणार नाही …. पुढच्या मिटिंगच्या वेळी आपण या वर परत चर्चा करू किंवा आढावा घेऊ .. पण आपण सांगत असलेला उपाय मला मान्य नाही” वर वर वेंधळा बावळट अशी माझी प्रतिमा गेल्या अर्ध्या तासात झाली असल्याने कदाचित अश्या परखड, सडेतोड प्रतिक्रियेची अपेक्षा ना बायको ने केली होती आणि ना ही त्या शिक्षक वर्गाने. मुलगी खुश … बापाने आपली बाजू सांभाळून घेतली म्हणून. तरी देखील मी माझ्या बायको कडे बघण्याचे टाळले फक्त एवढेच जाणवले कि ती हात मात्र झटकत होती. (असणारच ना कारण या वेळी कोपर मारता आले नाही, संभाव्य धोक्याच्या जाणीवेने मीच एका हाताने घट्ट पकडून ठेवले होते.) प्रसंगावधान राखून बायकोने पुढील प्रश्न जास्त वेळ न लावता विचारून घेतले आणि मला काही बोलायची वेळच आली नाही.

(क्रमशः)

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ४

इतका वेळ ताटकळत असलेल्या ललीथा बाई दुडूदुडू चालत आल्या आणि त्यांनी त्या मिटींगचा ताबा घेतला. विद्यार्थ्यांच्या या लाडक्या टीचर गणित शिकवणार होत्या. ज्या पद्धतीने या गुरुमाऊलीने मुलांना लळा लावला होता ते बघता गणितासारख्या कठीण विषयाची गोडी देखील लागेल याची खात्री होती. आता पाळी होती अल्पसंख्यांक गटाची. भुजबळ मास्तर आणि पाटील मास्तर आले, बोलले आणि परत कोपरा पकडला. अश्या पद्धतीने ओळख परेड संपली. या वर्षात मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडूनकाय काय अपेक्षा आहेत याची स्पष्ट शब्दात सुनावणी झाली. शाळेचे लिखित आणि अलिखित नियम पालकांवर अक्षरशः बिंबवले जात होते. एकंदरीत शिस्तबद्ध वातावरण असणार याचा अंदाज आधीच आला होता जेंव्हा आमची कन्या शाळेचे ओळखपत्र घरीच विसरली होती आणि त्याबद्दल नियमावर बोट ठेवून नियमाप्रमाणे तिच्या रोजनिशीमध्ये एक सूचना आली होती.

तितक्यात इंग्रजीच्या बाई म्हणाल्या “Raise your hands…..”. तसे आधीच या ओळख परेड मुळे गोंधळलेला असल्याने आणि त्यात अचानक प्रश्न विचारला गेल्या मुळे मी माझे दोन्ही हात वर केले. त्याच क्षणी मला परत कोपराचा धक्का बसला …आणि तोच धीरगंभीर दबका आवाज माझ्या शेजारून आला. “अरे हात खाली कर. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी हात वर करायचे आहेत” माझं प्रत्युत्तर, “मला माहीत होतं तु हात वर नाही करणार म्हणून तुझ्या वाटणीचा मीच केला …. ह्या ह्या ह्या …. इतकंच काय त्यांची प्रथा आहे  असं समजून सांगितलं असतं तर पाय पण वर केले असते”. चाणाक्ष मुलीने नको तिथे नाक खुपसले ..”म्हणजे बाबा, मी खोटं खोटं मारते आणि तु खोटं खोटं पडतोस आणि दोन्ही पाय वर करतोस तस्सं?” अवघा पालक वर्ग, शिक्षक महोदय आमच्या या लीलांकडे तन्मयतेने बघत होता …सगळ्यांच्या चेहेऱ्यावर “वा काय कुटुंब आहे!” असेच भाव होते. “आता जर परत तुम्ही दोघे काही बोललात तर वर्गाच्या बाहेर जावे लागेल” हिने आम्हां दोघांना दमात घेतले. एकंदरीत वातावरणाचा हिच्या वर परिणाम होतो माहीत होतं पण इतका????.

नेहेमीच्या सवयी प्रमाणे एक शिपाई बेधडक आत आला आणि न्यायालयात पुकारा करतात त्याप्रमाणे मोठ्या आदबीने म्हणाला “शाळेच्या बशी अजून २० मिनिटात निघतील. ज्यांना जायचं असेल त्यांनी घंटा वाजल्यावर शाळेच्या गेटापाशी जमा.” समोर उभ्या असलेल्या प्राजक्ता मराठे टीचर म्हणाल्या “सखाराम हा रोजचा वर्ग नाहीये. पेरेंट्स मीट चालू आहे. जरा सावकाश”. सगळेच शिपाई अंगकाठीने “मल्ल” या गटात मोडणारे होते. काही गोंधळ गडबड झाली तर ४-५ मुलांना लीलया उचलून घेऊन जाऊ शकतील … आणि गरज पडली तर शिक्षकांना आणि काही आगाऊ पालकांना देखील. ;). मग त्याच बाईनी सखारामने दिलेली सूचना एकदा हिंदीत आणि एकदा इंग्रजीत भाषांतर करून सांगितले. “आत्ता तर कुठे पेरेंट्स मिटींग चालू झाली आणि अजून २० मिनिटात बस निघणार? आता कसं काय सगळं विचारणार? शी बाई इतक्या लांब शाळा आहे …धड रिक्षा पण मिळत नाही” अश्या पद्धतीची कुजबुज महिला पालकांच्यात चालू होती. जे स्वतःचे वाहन घेऊन आले होते ते निश्चिंत होते. ही सगळी कुजबुज भेदून एक किरटा आवाज वर्गाच्या एका कोपऱ्यातून आला. तिच्या आवाजाची पट्टीच संगत होती की ही कुणीतरी “बेन” असावी. रेंगाळलेल्या माना तिच्या दिशेने फिरल्या. मुलाच्या तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला तिने. आपल्या या नतद्रष्ट पोराला शाळेतले शिक्षकच वठणीवर आणि शकतील अशी खात्री दाखवत तिने आपल्या कर्तव्याचे ओझे त्यांच्या खांद्यावर रिते केले. आता घरात हिचा दिवटा काय दिवे लावतो त्याला टीचर काय करणार? पण या बाईने शिक्षकांना गळच घातली की तुम्हीच या मुलाला सुधरवू शकता. असे म्हणून टीचर काही सांगायच्या आताच ही बाई धावत बस पकडायला निघून गेली. आता ज्यांना शाळेच्या बशीने जायचं होतं त्या सगळ्यांनी थोडक्यात त्यांच्या समस्या सांगितल्या आणि त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. अश्यामुळे या पहिल्या वहिल्या पेरेंट्स मीटला गावातल्या चावडीचे स्वरूप आले होते. शिक्षक म्हणजे पंच आणि पालक म्हणजे तक्रारदार गावकरी. तंटामुक्ती केंद्राची बैठक काही फार वेगळी नसावी. मी आणि माझी बायको सगळ्यांचे बोलणे आणि त्यावरच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया नीट ऐकत होतो. बायको तिने आणलेल्या डायरीत काहीश्या नोंदी करत होती. सहजच वाटलं की मुलांच्या वर्तणुकीचा आलेख सर्वसाधारण सारखाच आहे.  विभक्त (संकुचित) कुटुंबातील बहुतांश पालकांच्या समस्या साधारण सारख्याच होत्या. आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती जाणून घेण्याची गरज विशेष कुणालाच वाटली नाही. काहींना वेळ नव्हता, कामावर जायचं होतं, शाळेने बस ची सोय केली होती ती गाठायची होती, इतक्या धावपळीत वेळ कुणाला आहे? नुसतं मुलाला शाळेत सोडले की आपली जबाबदारी संपते का? मग अश्यातच अजाणत्या वयात मुलाला त्याच्या आई वडीलांचा हवा तितका सहवास नाही मिळाला तर त्याने काय करावं? लहान मुलंच ते … काही करून पालकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतं. घरात मूळ नीट वागत नाही, हट्ट करतं, उलट उत्तरं देतं, आदळाआपट करतं. पण याला तो शाळेत शिकवणारा शिक्षक काय करणार? लहान मुले अनुकरण करतात …खरं तर अंधानुकरण, त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या जवळच्या माणसांचं. त्यांच्या साठी नकळत आई बाबच आदर्श असतात. त्यामुळे त्यांची वर्तणूक हा प्रत्येक पालकासाठी देवाने दाखवलेला आरसाच आहे. आपल्या एखाद्या लकबीची हुबेहूब नक्कल करणाऱ्या आपल्या मुलाला आपण हसून टाळ्या वाजवून दाद देतो पण हेच जर तो आपल्याला उलटं बोललं तर प्रसंगी आपण दोन रट्टे पण ठेऊन देतो. पण त्याने हे असे उलटे बोलणे आपल्याच घरात बघितले आहे हे आपण सोयीस्कर रित्या विसरतो. पैसे कमावुन सगळी ऐहिक सुखे देण्याच्या नादात त्या कोवळ्या जिवाच्या संगोपनासाठी आवश्यक असणारा वेळ मात्र आपण देऊ शकत नाही हीच खेदाची गोष्ट आहे. विचार करता करता मन सुन्न झालं आणि अश्या वेळी संदीप खरेच्या कवितेची आठवण झाली

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी?
कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी?
खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही

(क्रमशः)