सुकामेवा

सध्या का कुणास ठावुक पण इतके दिवस बंद कप्प्यात साठवून ठेवलेल्या काही आठवणी अचानक सतावु लागल्यात. आठवणी आहेत, कडू आहेत तितक्याच गोड देखिल आहेत पण म्हणून मी आठवणींचे पुस्तक कधीच उघडून बसत नाही. पण क़ाही आहेत अत्तराच्या कुपी सारख्या ….कप्पा उघडला की लगेच मनात दरवळणार्या …. त्यांचा सुवास देखिल सगळी कडे भरुन राहतो. मग तो कप्पा बंद करावासा वाटत नाही.

माझ्या आधीच्या आमच्या सगळ्या पिढ्यांचा धंदा म्हणजे पौरोहित्य. आजोबा तर उच्च विद्याविभुषित आणि वेद पारंगत. त्यामुळे वडिल देखिल याच व्यवसायात आणि पारंगत. यजमानांच्या घरी जाउन धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करणे हाच काय तो उद्योग. भरभराट नसली तरी मानमरातब मात्र भरपूर. जिथे जे मुबलक तिथे त्याची किंमत नसते असच काहीसे चित्र आमच्या घरी देखिल होते. पण आई वडिलांनी मिळालेल्या चीज वस्तुंची कधी नासाडी होऊ दिली नाही आणि आम्हाला पण तीच सवय लावली. प्रत्येक गोष्टींचा योग्य विनियोग केला. पौरोहित्य करून जे सामान मिळायचे त्यात तांदुळ, गहू, साखर, गुळ, विविध प्रकारची फ़ळे, नारळ यांची रेलचेल असे. या गोष्टी कधीच विकत आणाव्या लागल्या नाहित. आमच्या पुरते ठेऊन आई बाकीचे शेजारी पाजारी वाटुन टाकायची. नारळ, पंचे, कापडं वगैरे विकून तिच्या आणि आमच्या हातखर्चा साठी लागणारे पैसे सहज जमायचे. सीताबाई विड्याची पाने दर आठ दहा दिवसांनी येऊन हक्काने घेऊन जायची. वयाने आई पेक्षा मोठी असलेली एक गावकरी बाई आपल्या आगरी लहेज्यातुन मला दादा अणि माझ्या बहिणींना पोरी म्हणायची याचं खुप अप्रूप वाटायचे.

पूजेच्या साहित्या मध्ये खारका, बदाम, हळकुण्ड, अक्रोड इत्यादी माफक जिन्नस देखिल असायचे. पूजाविधि कुणाकडे झालाय यावरून यातील जिन्नस कमी जास्त व्हायचे …. इतकच काय त्याची प्रत पण अवलंबून असायची. एक विशिष्ठ प्रकारची खरीक असायची पिवळट रंगाची, अतिशय गोड. बाबा तिला साखरी खारीक म्हणायचे. आलेल्या सामानात ती दिसली रे दिसली की एक एक आमच्या तिघांच्या हातावर ठेवीत. अर्थात या गोष्टी मुबलक असल्याने आम्हाला त्याचे विशेष वाटायचे नाही. किंवा बरेच वेळा त्यांना लागलेल्या हळद कुंकू या मुळे खायची इच्छा व्हायची नाही. तीच गत बदामांची. आधी बत्त्याने ते फोडा आणि मग ते थोड़े खाऊन बघा खवट असेल तर चमचा भर साखर खाल्ल्या शिवाय तोंडाला चव येत नसे. वडिलांनी अक्रोड, खारीक, बदाम यांच्या पौष्टिकतेचे सगळे संस्कार आमच्यावर करण्याचा प्रयत्न केला. पण यश काही आले नाही. आम्ही आपले त्यांच्या देखत गपगुमान हे सगळ पाण्याच्या घोटा सरशी रिचवायचो. पण आईची मात्रा काही चालायची नाही. धाक अणि प्रेमातला हाच काय तो फरक.

२०-२५ वर्षांपूर्वी बोर्नव्हिटा, होर्लिक्स तत्सम पावडरीची रेलचेल नव्हती. आणि असले लाड परवडणारे देखिल नव्हते. सगळ्या प्रकारच्या भाज्या, धान्य, कडधान्य खा मग बाकीच्या पावडरी चूर्ण यांची गरजच काय? अशी विचारसरणी त्यामुळे तीर्थरुपांच्या मागे लागुन देखिल असल्या चुर्णांचा प्रसाद मिळवणे शक्य नव्हते. पण बहुतेक त्यांनी एक शक्कल लढवली असणार. ते म्हणाले आपण घरीच बनवू ती पावडर. त्यावेळी घरगुती पदार्थाना एक वेगळेच महत्व होते. आणि “घरगुती” या शब्दाचा अर्थ पण वेगळा होता …. स्वतः च्या घरात बनवलेल म्हणजे “घरगुती” … आजकाल दुकानात मिळणार्या घरगुती भाजणीच्या पिठा प्रमाणे दुसऱ्याच्या घरी बनवलेले कमर्शियल “घरगुती” नाही काही.

प्रायोगिक तत्वावर त्यांनी आपल्या मुलांसाठी ही पौष्टिक पावडर बनवण्याचे ठरवले. आलेल्या सामानातुन त्यातल्या त्यात चांगले वाटणारे सुपलीभर खारिक, बदाम, अक्रोड आदी जिन्नस जमा केले. व्यवस्थित धुऊन आणि वाळवुन घेतले. सुपारी कातरण्याच्या अडकित्त्याने आधी खारका कापून त्यातल्या बिया बाजूला काढल्या. मग अडकीत्त्यानेच त्याचे बारीक तुकडे केले. बत्त्याने बदामाचे जाड कठीण कवच फोडले. प्रत्येक बदामाचा छोटा तुकडा खाऊन बघायचा, खवट कडवट असेल तर बदाम फेकून द्यायचा. चांगला असेल तर त्याचे पण अडकित्याने तुकडे करायचे. अक्रोडाची पण अशीच गत. अक्रोड जास्त खराब निघायचे. अगदी वरून उत्तम प्रतीचे वाटणारे अक्रोड आतून खुळखुळा असायचे. अडकित्त्याने सगळ्याचे बारीक तुकडे करून त्याचे मिक्सर मधून बारीक चूर्ण केले. गोडी वाढावी म्हणून चवीला साखर घातली. चांगली डबा भर झाली ती. सुरुवातीला नियमित पणे त्याचे चर्वण व्हायचे. बाबांचा प्रयोग आवडला होता आणि बऱ्या प्रमाणात यशस्वी देखील झाला होता. अगदी दुधात टाकून मसाला दुध म्हणून मिटक्या मारत प्यायलय देखील. त्या नंतर देखील असे प्रयोग झाले पण पहिला प्रयोग जमून गेला. नंतर मात्र बाबांनी असं काही बनवल्याचे आठवत नाही. कारण काही वर्षांनी घरात होर्लीक्स, बोर्नव्हिटा चे डबे दिसू लागले. पूजेच्या सामानात खारीक बदाम कमी होऊ लागले आणि कालमानापरत्वे “घरगुती” ची व्याख्या बदलू लागली.

परवाच सामानात साखरी खारीक बघितली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पण ही आत्ताची साखरी खारीक दिसायला जुन्या खारके प्रमाणे असली तरी आकाराने बरीच लहान होती. नीट धुवून चव बघितली तर साखरीच काय तर तिच्या खारीक असण्यावर पण संशय येऊ लागला. तसंही आता पूजा साहित्याच्या दुकानात पूजे साठी विशिष्ठ प्रतीचे खारीक बदाम अक्रोड नारळ सुपाऱ्या मिळातात. त्या इतक्या सुकलेल्या असतात की त्याचा सुकामेवा बनवणे निव्वळ अशक्य. आकाराने अतिशय लहान आणि निव्वळ पूजे साठी वापरता येतील असे. पूजा झाली की निर्माल्यात टाकून देण्या सारख्या. बर चौरंग तरी कुठे मोठे राहिलेत?  कुटुंबाच्या आकारा बरोबरच चौरंग पण लहान झालेत ना मग त्यावर मावेल असेच साहित्य हवे ना.

सुकामेव्याची पावडर पण घरगुती मिळायला लागली आहे. दुधात विरघळणारी …. एव्हरेस्ट च्या मसाला दुध पावडर सारखी …. पण लहानपणीच्या आठवणींचा मेवा आणि वडिलांच्या प्रेमाची पौष्टिकता त्यात नाही.

लीला सेल्फ हेल्प ग्रुप

कुठल्याही आईला नेहेमीच आपल्या मुलाबद्दल चिंता लागलेली असते. अगदी त्याच्या संगोपना पासून ते त्याच्या भविष्यापर्यंत. ही मातेची भूमिका गर्भधारणेपासूनच म्हणजे जेंव्हा स्वतःच्या मुलाला बघितले नसेल अगदी तेंव्हा पासून. पण काही मुले अशी असतात की त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सुरळीत नसतात. गुणसूत्रांच्या २२ जोड्यांपैकी २१व्या जोडीत गडबड होते. तिथे २ ऐवजी ३ गुणसूत्रे असतात आणि त्या  बालकात शारीरिक, बौद्धिक विकलांगता येते. हा कुठलाही साध्य किंवा असाध्य असा शिक्का असलेला रोग नाही तर ही एक स्थिती आहे, कधीही न बदलणारी. याला डाउन्स सिंड्रोम म्हणतात. अश्या मुलांचा बुद्ध्यांक सामान्य मुलांपेक्षा निम्मा असतो. कुणाचेही मुल विकलांग असावे असा कधी विचारही आपल्या मनाला शिवत नाही. पण जे अश्या मुलांचे पालक असतात त्यांचे काय? सगळ्या बाजूंनी झालेला हा आघात पचवून त्यांना या मुलांच्या भवितव्या साठी कंबर कसून उभं राहावं लागतं. त्यांना सांभाळता सांभाळता त्यांचं भविष्य घडवावं लागतं…. अगदी नाजूकपणे आणि विचारपूर्वक.

अश्या मुलांच्या भवितव्याची काळजी जपणाऱ्या बऱ्याच समाजसेवी संस्था सध्या कार्यरत आहेत. या संस्था अश्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत आहेत. त्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी बनवण्याचे अवघड कार्य चोखपणे बजावताना या मुलांच्या पालकांना देखील मानसिक आधार देण्याचे काम या संस्था करतात. बरेच वेळा या संस्थांच्या पाठीमागे समाजातील मान्यवर व्यक्ती, सरकार यांचे आर्थिक पाठबळ असते. काही पालक मात्र निव्वळ या संस्थांवर अवलंबून न राहता स्वतः मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देतात. पण बहुतेक वेळा हे सगळे उपक्रम स्वतःच्या मुलां पुरतेच मर्यादित असतात.

आज अश्याच एका ग्रुपशी ओळख झाली. “लीला सेल्फ हेल्प ग्रुप”, ५ मातांनी आपल्या ५ मुलांसाठी चालू केलेला हा उपक्रम. दिवाळी साठी बनवलेल्या रंगीबेरंगी पणत्या, सुगंधित उटणे, विविध आकाराच्या मेणबत्त्या अश्या सगळ्या विविध उत्पादने आमच्या ऑफिस मध्ये विक्रीसाठी आणली होती. विशेष म्हणजे ज्यांनी ह्या वस्तू बनवल्या होत्या ती मुले देखील त्यांच्या आयांना मदत करत होती. कुठलीही जाहिरातबाजी नाही की कुठलाही बडेजाव नाही. त्यांची कलाकुसरच इतकी सुंदर होती की ते बघितल्यावर त्यांना वेगळी जाहिरात करण्याची गरजच भासली नाही. गेली ३ वर्षे या पंचमाता आपल्या मुलांसाठी हा उपक्रम राबवत आहेत. त्यांचे प्रयत्न, त्यांचे श्रम, त्यांची चिकाटी बघून नतमस्तक व्हायला होतं.

मी सकाळी सकाळीच गेलो होतो त्यामुळे तयारी नुकतीच झाली होती. आपल्या सगळ्या कलाकृती अश्या छान रीतीने मांडून ही बच्चे कंपनी तय्यार होती. गर्दी नसल्यामुळे या सगळ्यांशी संवाद साधणे सोप्पं झालं.

सर्वात एक गोष्ट आवडली ती म्हणजे घेतलेल्या सगळ्या वस्तू कागदाच्या पिशवीत बांधून दिल्या जात होत्या. या पिशव्या देखील या मुलांनीच बनवल्या होत्या. त्याही कुठलाही प्रकारचा गम किंवा तत्सम चिकटवण्याचा पदार्थ किंवा पिना न वापरता.

Happy Diwali म्हणत या छान छान कलाकारांनी मला टाटा केलं. या मुलांसाठी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेल्या या मातांना विनम्र अभिवादन.

संपर्क:
लीला सेल्फ हेल्प ग्रुप
सीमा कासम,
२०१, सीता कुटीर, कोस्टा कॉफीच्या मागे, जुहू स्कीम, अंधेरी (प.)

तो एक बाप असतो

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो…

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं… Continue reading