ठाणे: महायुती की आघाडी

आज ठाण्याचा महापौर ठरणार. मतदारांनी आपले काम बजावले आणि आता वेळ आली आहे ती निवडून आलेल्या नगरसेवकांची आणि त्यांच्या पक्षांची. कुणाचे राजकारणातील गणित चुकलंय आणि कुणाचे बरोबर आलाय ते आजचा सूर्य मावळायच्या आताच कळेल. या घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवार रविवारी जे काही झालं त्याला बिचारा मतदार काहीच करू शकत नाही, हा या राजकारण व्यवस्थेचा तोटा आहे.

नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे अपहरण (?) झाले किंवा नाही. ….. असल्यास ते आघाडीतील नेत्यांनी केले असणार. हे समजून आल्यावर मातोश्री वरील बैठक ….. आणि त्या नंतर झालेलं राडा संस्कृतीचे सामाजिक प्रदर्शन. सर्वसाधारण मतदाराला वाटत असेल …. खरंच यांची लायकी आहे का?? एक नगरसेविका गायब होते याचा अतिरेक इतका जोर जबरदस्तीने करावा??? तोडफोड, मारझोड, बंद ई.ई. …. ज्या मतदारांच्या समोर यांनी पदर पसरून भीक मागितली त्यांनाच आपले काम झाल्यावर वेठीस धरले …. कारण काय तर निव्वळ एक नगरसेविका गायब झाली म्हणून???? आता पक्षातील महान नेते म्हणतील ….. राग अनावर झाला की कार्यकर्ते उद्रेक करणारच …. आणि वर हे पण म्हणायचे की कार्यकर्ते आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. मग हा उद्रेक चालू असताना पक्षातील नेते आपले तोंड बंद करून बसले होते का? या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नाही …. आणि मिळणार देखील नाही. आघाडी मध्ये पण टगे आहेत …. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये विशेष फरक नाही. पण मागे एकदा शरद पवारांच्यावर जो हल्ला झाला आणि त्या नंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या विनंतीस योग्य मान दिला गेला.

ठाणेकरांनो सांभाळा …. महायुती आली तर राडे वरच्यावर होत राहतील. टगे आले तरी फार काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला परत संधी आता ५ वर्षांनी …… या ५ वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकांत आपले मत कुणास द्यायचे याचा अभ्यास, पूर्वतयारी आत्ताच चालू करा. शेवटी नगरसेवक निवडून द्यायचं आपल्या हातात आहे…. सत्ता कुणाची असेल हे आपण ठरवू शकत नाही हीच शोकांतिका आहे.

निवडणुकीचा थरार – भाग ३

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉

(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)

(निवडणुकीचा थरार – भाग २ इथे वाचा)

—————————————————————————————————————————————————————–

मोजणी आणि सत्ता संघर्ष

आपले भविष्य टांगणीला लागलेले आहे या जाणिवेनेच उमेदवारांना झोप पण येत नसावी. आणि आपल्या “पातेल्याचे” काय होईल या चिंतेने “चमचे” देखील जागे असतात. सकाळ पासून मतपेट्या लपवून ठेवलेले अंतरंग दाखवायला सुरुवात करतात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे रंग पसरू लागतात. आश्चर्य म्हणजे निवडणुकीला उभ्या असलेल्या यच्चयावत उमेदवारांना आपणच जिंकणार याची खात्री असते. त्यात फक्त एक विजयी उमेदवार सोडून बाकी सगळ्यांचा भ्रमनिरास योग्य वेळ आली की होतो हा भाग अलाहिदा. मिडीयाने इतके दिवस चालवलेला खरा होता का नुसताच फुसका बार हे याच दिवशी उमगते. मत मोजणी चालू झाली की सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोचलेल्या असतात. पहिल्या अर्ध्यातासातच खरा सामना कुणा मध्ये रंगणार हे निश्चित होते. क्षण क्षणाला झुलणारी दोलायमान परिस्थिती अनुभवण्या साठी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी उपस्थित असाल तरच त्याचा खरा थरार तुम्हाला अनुभवता येईल. मोजणीच्या वेळी आघाडी मिळालेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अंगावर रोमांच निर्माण करतो. त्यांच्या घोषणा, नारेबाजी सगळंच थरारक. शेवटी मोजणी पूर्ण होते आणि विजेत्याच्या नावाची घोषणा होते. विजयी उमेदवार किती मताधिक्याने निवडून आला आहे हे पण सांगण्यात येते. विजेत्या उमेदवाराच्या गोटामध्ये जल्लोष आणि उत्सवाचे वातावरण तर पराजित पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्मशान शांतता ….. अश्या दोन विरुद्ध टोकाच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया फारच कमी ठिकाणी पहायला मिळतात. एका बाजूला कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अविश्रांत मेहेनतीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे योग्य निकाल लागल्याचा आनंद तर दुसरीकडे जमीन आसमान एक करून सुध्दा पदरी पडलेला पराभव. किती हा विरोधाभास? काही निकाल अपेक्षित तर काही आश्चर्यकारक असणारच ना?

कार्यकर्त्यांच्या जल्लोषा बरोबरच विजयी उमेदवाराचे हात गगनाला भिडतात. वाजत गाजत मिरवणूक निघते. जनतेचे आभार प्रदर्शन, अभिष्टचिंतन, औक्षण या सगळ्या औपचारिक गोष्टी पण पूर्ण होतात. एखादी लढाई जिंकून आल्यावर योद्ध्याच्या चेहेर्यावरील हावभाव आणि या उमेदवाराच्या हावभावामध्ये विशेष फरक नसावा. आणि मनात मात्र “कसा पाडला लेकाला …. माझ्यासमोर उगाच गमजा करत होता” वगैरे वगैरे. मग परत एकदा स्वारी मिडीयाला “बाईट” द्यायला तयार होते. कितीही काहीही दर्शवले तरी शेवटी मीच कसा योग्य आहे हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच रात्री कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार आणि विरंगुळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि सगळे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे आभार मानून विजयाच्या धुंदीत “झुलत” असतात. बरेच दिवसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला शांत झोप लागलेली असते …. उराशी एकाच स्वप्न घेऊन … कधी तरी माझीपण अशीच विजययात्रा निघेल …

पक्षाचे विजयी उमेदवार मग पक्षश्रेष्ठींची भेट घेतात. पक्षाला मिळालेल्या सर्वांगीण विजयावर पक्षाचे पुढचे पाऊल काय असेल हे निश्चित होते. सत्ता स्थापन करण्यासाठी काय अजेंडा असावा हे ठरवले जाते. बहुमत मिळाले असेल तर प्रश्नच येत नाही …. पण बहुमत नसेल तर आघाडी, युती, महायुती असे काहीतरी प्रयत्न करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला जातो. यात अपक्ष म्हणून जे निवडून येतात त्यांची चंगळ असते. गुप्त चर्चा, खलबतं यांना ऊत येतो. जिथे फायदा अधिक तिथे हे अपक्ष धावत असतात. काही अपक्ष उमेदवार अचानक गायब होतात …. कुणी तरी पोलिसात तक्रार करतं …. अमुक अमुक उमेदवारास अमुक अमुक पक्षाच्या नेत्याने पळवून नेले आहे. एकदम पोलिसांची सूत्र फिरू लागतात. मिडीयाला TRP वाढवण्यासाठी अजून एक खाद्य मिळते. जसा तो उमेदवार एकाएकी गायब होतो तसाच तो कुणातरी बड्या नेत्या बरोबर पोलीस स्टेशन ला स्वतःहून हजर होतो. याचाच अर्थ या दोघांमधली अर्थपूर्ण बोलणी सुफळ संपूर्ण झालेली असतात. असेच काही उमेदवार ज्यांना तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात उभे राहतात आणि नाकावर टिच्चून जिंकून येतात त्यांना पण परतीचे दरवाजे उघडे होतात …. अर्थात हे सगळे सत्ता स्थापन करण्याच्या अभिलाषेनेच. अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने फिरवण्यासाठी रस्सीखेच चालू असते …… जो हा घोडेबाजार जिंकतो तोच पुढे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रबळ दावेदार असतो.

“जिसकी लाठी उसकी भैंस” या उक्ती प्रमाणे ज्याच्याकडे साम, दाम, दंड, भेद या चारही नीती ज्याला अवगत आहेत तोच या राजकारणात आपला घोडा दामटवू शकतो ….. किमान ५ वर्षे तरी. दर ५ वर्षांनी हे थरारक नाट्य असंच चालू राहतं. नेते बदलत जातात, पार्ट्या बदलतात, कार्यकर्ते बदलतात पण निवडणूक आणि तिच्या अवती भवती घडणाऱ्या घटना नेहेमी प्रमाणेच रोमांचक … आणि थरारक.

(समाप्त)

निवडणुकीचा थरार – भाग २

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉

(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)

—————————————————————————————————————————————————————–

फॉर्म भरून एकदा का उमेदवारी निश्चित झाली की यांचा राजेशाही थाट बघण्यासारखा असतो. कधी नव्हे ते ही लोकं सामान्य माणसाशी इतकी गोड बोलतात की क्षणभर असं वाटतं यांच्या तोंडातून मध गळतंय की काय. येता जाता हातवारे काय करतील, थांबून ख्याली खुशाली काय विचारातील आणि सर्वात शेवटी असं ही नमूद करतील “आपलं मत आम्हांलाच मिळालं पाहिजे बरं ….. मग तुमचे सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सोडवून दाखवीन”. यात काही उमेदवार खरंच सामाजिक कार्य करणारे, जनतेसाठी झगडणारे असतात. पण यांची संख्या सध्यातरी नगण्य आहे. पण कधी कधी उमेदवारी हातात आल्यावर त्यांच्या डोक्यात पण हवा जाण्याची शक्यता असते. सगळेच उमेदवार असे फुगे होऊन तरंगत असतात. झुंडीने फिरत अनोखे शक्ती प्रदर्शन करणारे हे तथाकथित नेते आचारसंहिता लागू झाली की गोगलगाय होऊन जातात. या काळात शब्द न शब्द तोलून मापून बोलला जातो. कारण या काळात काही गडबड झाली तर सगळं मुसळ केरात. ;). त्यामुळे या काळात सगळं कसं शांत शांत असतं. कदाचित वादळा पूर्वीची शांतता असू शकते. पण या सगळ्या धकाधकीत कार्यकर्ते मात्र अविरत काम करत असतात. काही ठिकाणी खाण्यापिण्याची चांगलं तर काही ठिकाणी वेळेला पाणी देखील मिळत नाही. अश्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची धडाडी असते. त्यांची निष्ठा पणाला लावून एक दिलाने ते प्रचार करत असतात. कधी मनापासून तर कधी “वरच्या” आदेशाचा मान राखून. उमेदवार जिंकला तर स्तुतिसुमने नाहीतर प्रचार नीट न केल्याचे खापर माथी मारलं जातं. घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदारांच्या याद्या तयार करणे इथपासून ते निकाल लागे पर्यंत अविश्रांत मेहेनत करणे थरारकच नाही का?

निवडणुकीचा दिवस

रोज टीव्हीवर वेगवेगळया पक्षातील नेत्यांच्या मुलाखती, चर्चासत्रे यांचे आयोजन करून वातावरण तप्त करत असतात. अशा कार्यक्रमांची नावे पण सुंदर असतात … “आपला आवाज”, कौल जनतेचा”, “इलेक्शन अजेंडा” इ. इ. हे असे कार्यक्रम म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यासाठी मिळालेले हक्काचे व्यासपीठच. हे असे कार्यक्रम बघायला मला सॉलिड आवडतं. कुणाचा कुणाशी ताळमेळ नसतो. नुसती बोंबाबोंब.अगदी फुल २ करमणूक. निखिल वागळे सारखा कुशल सूत्रधार तर चर्चासत्रामध्ये सूत्र संचालन कमी आणि ओरडणाऱ्या विविध पक्षाच्या प्रवक्त्यांना गप्प करण्याचं काम जास्त करतो. अश्यावेळी मंचावर पट्टीचे सूत्रधार लागतात. ४-५ बोंबाबोंब करणाऱ्या नेत्यांना थोपवून धरण्याचं काम असं सहजासहजी शक्य नाही …. तिथे पाहिजेत जातीचे.

या सगळ्या धामधुमीत शेवटी तो कसोटीचा दिवस उजाडतो ज्याची प्रत्येक उमेदवार आतुरतेने वाट बघत असतो. इतके दिवस राबणारे कष्टकर्ते ( कार्यकर्ते या शब्दा पेक्षा कष्टकर्ते हाच शब्द इथे जास्त चपखल बसतो नाही का?) झाडून मतदान केंद्रांवर जमा होतात. कुणी गैरप्रकार, बेकायदेशीर काम तर करत नाहीये ना या साठी डोळ्यात तेल घालून पाळत ठेवून असतात. कुणी असं काही करताना आढळलं तर सरळ ती ब्याद मामाच्या हातात. कधी काही संवेदनशील विभागात मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतपेट्या पळवण्याचे प्रकार घडले की त्या केंद्राला रणांगणाचे स्वरूप प्राप्त होते. सगळंच थरारक.

आपल्या मतदारांनी मतदान केले की नाही ते बघणे हे त्या दिवशीचे मुख्य काम. प्रसंगी एखाद्या स्थितप्रज्ञ म्हशीला जसे काठीने ढोसत ढोसत इच्छित स्थळी न्यावे लागते तसच मतदारांना देखील हलवावे लागते. इतकंच काय तर निवडणुकांप्रीत्यर्थ ज्या ज्या महत्वपूर्ण व्ही.आय.पी. लोकांना अर्थपूर्ण भेटवस्तू दिल्या असतात अश्या लोकांची योग्य ती सरबराई  ठेवावी लागते. मुंबई सारखा सुप्त मतदार असेल तर गर्दी झाली नाही म्हणून वरिष्ठांचा रोष होतोच. आता लोकांनी मतदाना सारख्या हक्कावर पाणी सोडले तर कार्यकर्ते काय करणार? आणि कार्यकर्तेसुद्धा अश्या निर्बुद्ध नेत्यांचे झेंडे हातात का धरतात ते विठ्ठलच जाणे. ;).

मतदान केंद्रावर नेते आपला मतदानाचा हक्क बजावायला येतात …. येतात म्हणजे ??? अगदी आपल्या खास व्यक्तीचा जथ्था सोबत घेऊनच. मला एक प्रश्न नेहेमी पडतो की यांना फिरायला बरोबर नेहेमी माणसं लागतातच का?? ….. यांना एकटं फिरायला भीती वाटते का उगाच चारचौघांना बरोबर घेऊन आपली ताकद दाखवायची हौस असते? या सगळ्या घोळक्यात त्या नेत्यांचे हुजरे, चमचे, आतल्या गोटातले कार्यकर्ते, पत्रकार आणि छायाचित्रकार यांची पिलावळ असतेच. मतदान केले की बाहेर येऊन विजयी अविर्भावात मिडीयाला “बाईट” दिल्या जातात. तारवटलेल्या डोळ्यांनी काय ती दोन चार वाक्ये बरळतात. पूर्वी मत दिल्याची खूण म्हणून तर्जनीवर निळी … सुकल्यावर न पुसता येणारी शाई लावली जायची. पण आता नवीन सरकारी नियमा प्रमाणे मधल्या बोटावर शाईचा फराटा मारला जातो. ही बोट बदलण्याची भानगड कुठल्या बेट्याने केली आणि का केली देवा जाणे. हा नियम लागू झाल्यावर जी पहिली निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी काही मठ्ठ नेत्यांचे असे सुंदर फोटो आणि त्या फोटोखाली त्यांचे काढलेले वाभाडे काढले होते की हसून हसून पुरेवाट झाली. काही अडाणी नेत्यांनी सवयी प्रमाणे मतदान करून आल्यावर छायाचित्रकारांना एकदम स्टाईल मध्ये आपल्या हाताची शाई लावलेली मध्यमा वर करून दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी मिडीयाने त्यांचेच बोट त्यांना दाखवले ….. पुराव्यानिशी. ज्यांना सगळी बोटं सारखीच वाटतात त्यांनी मध्यमा दाखवली काय किंवा करांगुली दाखवली काय. त्यावेळी काही मोजक्याच विद्वान लोकांनी मात्र हाताची चारही बोटं एखाद्या योगमुद्रे प्रमाणे दाखवली होती. असे क्षण मिडीयाला चावून चोथा करण्यासाठी पुरेसे असतात.

मतदानाच्या धकाधकीत दिवस सरत असतो आणि कार्यकर्ते हळू हळू विसावत असतात. कधी कधी उमेदवार तिथेच ठाण मांडून बसले तर ती देखील उसंत मिळत नाही. मतदानाची वेळ संपते आणि मतपेट्या उमेदवारांच्या भविष्याचे गुपित पोटात दडवून निपचित पडून असतात. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या टप्प्याचा थरार कलत्या सूर्याच्या साक्षीने संपलेला असतो. रात्री टीव्हीवर बातम्या झळकत असतात त्या मतदार राजाने दिलेल्या प्रतिसादाच्या. नेहेमी प्रमाणे सुशिक्षित पांढरपेश्या मतदारांचा वर्ग निवडणुकीला वाकुल्या दाखवून मिळालेली सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न असतो …. अगदी ड्राय डे असून सुद्धा.

(क्रमशः)

(निवडणुकीचा थरार – भाग ३ इथे वाचा)