खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉
(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)
—————————————————————————————————————————————————————–
फॉर्म भरून एकदा का उमेदवारी निश्चित झाली की यांचा राजेशाही थाट बघण्यासारखा असतो. कधी नव्हे ते ही लोकं सामान्य माणसाशी इतकी गोड बोलतात की क्षणभर असं वाटतं यांच्या तोंडातून मध गळतंय की काय. येता जाता हातवारे काय करतील, थांबून ख्याली खुशाली काय विचारातील आणि सर्वात शेवटी असं ही नमूद करतील “आपलं मत आम्हांलाच मिळालं पाहिजे बरं ….. मग तुमचे सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सोडवून दाखवीन”. यात काही उमेदवार खरंच सामाजिक कार्य करणारे, जनतेसाठी झगडणारे असतात. पण यांची संख्या सध्यातरी नगण्य आहे. पण कधी कधी उमेदवारी हातात आल्यावर त्यांच्या डोक्यात पण हवा जाण्याची शक्यता असते. सगळेच उमेदवार असे फुगे होऊन तरंगत असतात. झुंडीने फिरत अनोखे शक्ती प्रदर्शन करणारे हे तथाकथित नेते आचारसंहिता लागू झाली की गोगलगाय होऊन जातात. या काळात शब्द न शब्द तोलून मापून बोलला जातो. कारण या काळात काही गडबड झाली तर सगळं मुसळ केरात. ;). त्यामुळे या काळात सगळं कसं शांत शांत असतं. कदाचित वादळा पूर्वीची शांतता असू शकते. पण या सगळ्या धकाधकीत कार्यकर्ते मात्र अविरत काम करत असतात. काही ठिकाणी खाण्यापिण्याची चांगलं तर काही ठिकाणी वेळेला पाणी देखील मिळत नाही. अश्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची धडाडी असते. त्यांची निष्ठा पणाला लावून एक दिलाने ते प्रचार करत असतात. कधी मनापासून तर कधी “वरच्या” आदेशाचा मान राखून. उमेदवार जिंकला तर स्तुतिसुमने नाहीतर प्रचार नीट न केल्याचे खापर माथी मारलं जातं. घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदारांच्या याद्या तयार करणे इथपासून ते निकाल लागे पर्यंत अविश्रांत मेहेनत करणे थरारकच नाही का?
निवडणुकीचा दिवस
रोज टीव्हीवर वेगवेगळया पक्षातील नेत्यांच्या मुलाखती, चर्चासत्रे यांचे आयोजन करून वातावरण तप्त करत असतात. अशा कार्यक्रमांची नावे पण सुंदर असतात … “आपला आवाज”, कौल जनतेचा”, “इलेक्शन अजेंडा” इ. इ. हे असे कार्यक्रम म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यासाठी मिळालेले हक्काचे व्यासपीठच. हे असे कार्यक्रम बघायला मला सॉलिड आवडतं. कुणाचा कुणाशी ताळमेळ नसतो. नुसती बोंबाबोंब.अगदी फुल २ करमणूक. निखिल वागळे सारखा कुशल सूत्रधार तर चर्चासत्रामध्ये सूत्र संचालन कमी आणि ओरडणाऱ्या विविध पक्षाच्या प्रवक्त्यांना गप्प करण्याचं काम जास्त करतो. अश्यावेळी मंचावर पट्टीचे सूत्रधार लागतात. ४-५ बोंबाबोंब करणाऱ्या नेत्यांना थोपवून धरण्याचं काम असं सहजासहजी शक्य नाही …. तिथे पाहिजेत जातीचे.
या सगळ्या धामधुमीत शेवटी तो कसोटीचा दिवस उजाडतो ज्याची प्रत्येक उमेदवार आतुरतेने वाट बघत असतो. इतके दिवस राबणारे कष्टकर्ते ( कार्यकर्ते या शब्दा पेक्षा कष्टकर्ते हाच शब्द इथे जास्त चपखल बसतो नाही का?) झाडून मतदान केंद्रांवर जमा होतात. कुणी गैरप्रकार, बेकायदेशीर काम तर करत नाहीये ना या साठी डोळ्यात तेल घालून पाळत ठेवून असतात. कुणी असं काही करताना आढळलं तर सरळ ती ब्याद मामाच्या हातात. कधी काही संवेदनशील विभागात मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतपेट्या पळवण्याचे प्रकार घडले की त्या केंद्राला रणांगणाचे स्वरूप प्राप्त होते. सगळंच थरारक.
आपल्या मतदारांनी मतदान केले की नाही ते बघणे हे त्या दिवशीचे मुख्य काम. प्रसंगी एखाद्या स्थितप्रज्ञ म्हशीला जसे काठीने ढोसत ढोसत इच्छित स्थळी न्यावे लागते तसच मतदारांना देखील हलवावे लागते. इतकंच काय तर निवडणुकांप्रीत्यर्थ ज्या ज्या महत्वपूर्ण व्ही.आय.पी. लोकांना अर्थपूर्ण भेटवस्तू दिल्या असतात अश्या लोकांची योग्य ती सरबराई ठेवावी लागते. मुंबई सारखा सुप्त मतदार असेल तर गर्दी झाली नाही म्हणून वरिष्ठांचा रोष होतोच. आता लोकांनी मतदाना सारख्या हक्कावर पाणी सोडले तर कार्यकर्ते काय करणार? आणि कार्यकर्तेसुद्धा अश्या निर्बुद्ध नेत्यांचे झेंडे हातात का धरतात ते विठ्ठलच जाणे. ;).
मतदान केंद्रावर नेते आपला मतदानाचा हक्क बजावायला येतात …. येतात म्हणजे ??? अगदी आपल्या खास व्यक्तीचा जथ्था सोबत घेऊनच. मला एक प्रश्न नेहेमी पडतो की यांना फिरायला बरोबर नेहेमी माणसं लागतातच का?? ….. यांना एकटं फिरायला भीती वाटते का उगाच चारचौघांना बरोबर घेऊन आपली ताकद दाखवायची हौस असते? या सगळ्या घोळक्यात त्या नेत्यांचे हुजरे, चमचे, आतल्या गोटातले कार्यकर्ते, पत्रकार आणि छायाचित्रकार यांची पिलावळ असतेच. मतदान केले की बाहेर येऊन विजयी अविर्भावात मिडीयाला “बाईट” दिल्या जातात. तारवटलेल्या डोळ्यांनी काय ती दोन चार वाक्ये बरळतात. पूर्वी मत दिल्याची खूण म्हणून तर्जनीवर निळी … सुकल्यावर न पुसता येणारी शाई लावली जायची. पण आता नवीन सरकारी नियमा प्रमाणे मधल्या बोटावर शाईचा फराटा मारला जातो. ही बोट बदलण्याची भानगड कुठल्या बेट्याने केली आणि का केली देवा जाणे. हा नियम लागू झाल्यावर जी पहिली निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी काही मठ्ठ नेत्यांचे असे सुंदर फोटो आणि त्या फोटोखाली त्यांचे काढलेले वाभाडे काढले होते की हसून हसून पुरेवाट झाली. काही अडाणी नेत्यांनी सवयी प्रमाणे मतदान करून आल्यावर छायाचित्रकारांना एकदम स्टाईल मध्ये आपल्या हाताची शाई लावलेली मध्यमा वर करून दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी मिडीयाने त्यांचेच बोट त्यांना दाखवले ….. पुराव्यानिशी. ज्यांना सगळी बोटं सारखीच वाटतात त्यांनी मध्यमा दाखवली काय किंवा करांगुली दाखवली काय. त्यावेळी काही मोजक्याच विद्वान लोकांनी मात्र हाताची चारही बोटं एखाद्या योगमुद्रे प्रमाणे दाखवली होती. असे क्षण मिडीयाला चावून चोथा करण्यासाठी पुरेसे असतात.
मतदानाच्या धकाधकीत दिवस सरत असतो आणि कार्यकर्ते हळू हळू विसावत असतात. कधी कधी उमेदवार तिथेच ठाण मांडून बसले तर ती देखील उसंत मिळत नाही. मतदानाची वेळ संपते आणि मतपेट्या उमेदवारांच्या भविष्याचे गुपित पोटात दडवून निपचित पडून असतात. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या टप्प्याचा थरार कलत्या सूर्याच्या साक्षीने संपलेला असतो. रात्री टीव्हीवर बातम्या झळकत असतात त्या मतदार राजाने दिलेल्या प्रतिसादाच्या. नेहेमी प्रमाणे सुशिक्षित पांढरपेश्या मतदारांचा वर्ग निवडणुकीला वाकुल्या दाखवून मिळालेली सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न असतो …. अगदी ड्राय डे असून सुद्धा.
(क्रमशः)
(निवडणुकीचा थरार – भाग ३ इथे वाचा)