शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०६

माफ करा…आज बरेच दिवसांनी या कथेचा ६वा भाग लिहून पूर्ण झाला. पुढच्या भागात ही कथा संपेल आणि तो भाग पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५

वेदमूर्ती बंडोपंत केळकर गुरुजींच्या सुस्पष्ट मंत्रघोषात गणपतीची प्रतिष्ठापना यथासांग पार पडली. मधू आणि सुलभा पवार दाम्पत्याने यजमान पद भूषवले. धोतर कुर्ता घातलेला मधू आणि नौवारी नेसून सजलेली सुलभा खुपच छान दिसत होते…. अगदी दृष्ट लागण्या जोगे. केसरभाई मात्र पुजेला आवर्जून उपस्थित होता.
——————————————————————————————

सकाळीच पूजा झालेली असल्यामुळे नंतर विशेष काही कार्यक्रम नव्हते. केसरभाई आणि कुटुंबीय संध्याकाळी दर्शनाला आले होते. जाताना बाळू आणि कंपनीला भेटून पूजेचे आयोजन उत्तम झाले असल्याची पावती दिली. रोजच्या तेल पाण्याची, फुले, हार, नैवेद्य आणि प्रसादाची सगळी व्यवस्था केसरभाईंनी केली होती. हे कळताच नानाचं ब्लड प्रेशर शिट्टी वाजवायला लागलं. शेवटी न राहवून आपल्या मोडक्या तोडक्या बंबैय्या हिंदीत तो केसरभाईला म्हणाला “देखो केसरभाई, हमारा गणेशोत्सवका बजेट जो है ना वो थोडा कमीच है. और आप ऐसे बिना पूछे अपने जेबसे ऐसी उधळपट्टी करेंगे तो अपुन के बजेट की तो वाट लाग जायेगी” नानाच्या तोंडातून असे संजय दत्त स्टाईल शब्द ऐकून सगळेच चपापले. केसरभाई नाना कडे बघून मिश्कील हसत होता.
बाळू नानाची री ओढत म्हणाला “तुम्ही ती मिरवणूक, ती वाजंत्रीची सोय केलीत. मोदकांचा प्रसाद पाठवलात पण हे सगळं आमच्या बजेटच्या बाहेर जातंय”
“आणि या सगळ्याचा त्रास नानाला झाला. त्याच्या रक्तान उसळी मारलंनीत. परत काही झाले असते म्हणजे निस्तरावे चाळकरींना लागले असते.” अप्पाने तलवार चालवली.
इतकं सगळे बोलत असून सुद्धा केसरभाई गप्पच होता. २-३ मिनिटे शांततेत गेल्यावर केसरभाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले. “तुमी लोग खर्चाची चिंता कशाला करते? मी हाये ना. काय पण काळजी करू नको. मी बघते सगळा. तुमचा बोलून झाला असेल तर आता मी काय सांगते ते बघ. मी जे काय पण तुम्हांला न विचारता केले त्याचा रोकडा मागितला काय? जो चीज मी आणला त्याचा पैसा मीच देनार. उलट तुमाला पण अजून पैसा लागला तर सांग. मी तुमाला पैसा देते. आप लोग इतने बरसोंसे इस घर में रह रहे हो. ये जगह जब मैने बेच दी तब मुझे मालूम था की कोई टेनंट मुझे किसी बात पार तकलीफ नाही देगा. और आप सब ने मुझे अच्छा कोऑपरेट किया. उसी दिन मै आप सबको बोला की आजसे हम सब एकही लेवल पे है. अब मै मालिक नही. इस चालने मुझे बहुत कुछ दिया. बहुत अच्छी अच्छी यादे जुडी है इसके साथ.” केसरभाई बोलता बोलता खूप भावूक झाला होता. “आपका अपनापन मै कभी भूल नाही पाऊंगा. अगर इस चाल केलिये मै कुच्छ करना चाहता हुं तो वो मेरा हक है. और मुझे बहुत अच्छा लागता है आप सबके साथ. मेरे बर्तावसे अगर आपको कुछ तकलीफ हो गयी है तो मुझे माफ करना”. मधूला वाटलं की आता केसरभाई आसवं गाळणार म्हणून लगेच खिशात हात घालून रुमाल तयार ठेवला होता. तितक्यात केसरभाईनेच स्वतःच्या खिशातून रुमाल काढून न आलेले अश्रू पुसले आणि फरफरून भरलेलं नाक रिते केले. त्याची कृती बघता मध्याने आवंढा गिळला आणि मनातच म्हणाला बरं झालं आपण रुमाल पुढे नाही केला. घसा खाकरून झाल्यावर केसरभाई या पाचही जण काय प्रतिक्रिया देतील या  उत्सुकतेने त्यांच्या चेहेऱ्याकडे आलटून पालटून बघत होता. पण केसरभाईंच्या या अश्या आतडे पिळवटून केलेल्या अनपेक्षित वक्तव्यामुळे हे पाचही जण जणू स्तंभित झाले होते. सगळे एकमेकांकडे पहात होते आणि अप्पा म्हणाला “ठीक आहे. तुमची तशी इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण जे काही करणार असाल ते आम्हाला पण सांगा. आम्हाला पण जमेल तशी मदत करूच.” केसरभाई चालेल म्हणाला आणि आवजो करून निघणार इतक्यात बंडोपंतांनी त्याला थांबवला. “केसरभाई मग उद्या तुम्ही आणि भाभीच सत्यनारायणाची पूजा करा”. बाकीच्यांनी पण बंड्याच्या मताला दुजोरा दिला. केसरभाई खुश झाला आणि म्हणाला “एकदम माजा मनातला बोलला बंडू शेठ. मी आणि बायडी तयार हाय. सकाळी १० ला येतो”. नाना मात्र तटस्थ होता. त्यांनी परत बजेटची शंका काढली कारण सत्यनारायणाची पूजा उत्सवाच्या रुपरेषेत धरली नव्हती. केसरभाई परत हसला आणि म्हणाला “नाना साब, मी आत्ताच सांगितला ना …मी सगळा खर्चा करते म्हणून मग काय प्रॉब्लेम हाय?” “केसरभाई चोपडीचा वसूल आहे. जो पर्यंत रोकडा जमा होत नाही तो पर्यंत खर्चात धरत नाहीत” नाना मिश्कील हसत म्हणाला. बाकीच्यांना काहीच कळले नसले तरी केसरभाईला बरोब्बर समजलं. त्याने सरळ १००० रुपयांच्या पाच नोटा काढून नानाच्या हातावर ठेवल्या. उद्या सकाळी अजून ५ देतो असे सांगून केसरभाई निघून गेला. अप्पा जरा नाराज झाला नाना वर..म्हणाला “काय बोलतस ते तुला तरी कळता का? अरे तो इतकं म्हणाला ना सगळा खर्च तोच करणार तरी पण त्याला पैसे द्यायला भरीस पडलंनीच तू. एका रात्रीत जणू तो पळूनच जाणार होता जसा?” मधुने पण अप्पाला दुजोरा दिला. नाना स्पष्टपणे म्हणाला “व्यवहार हा व्यवहार असतो. रोकडा हातात आला की आपला. मी खर्च करीन असं तो ढीग बोलला पण जोवर पैसे समोर ठेवत नाही तोवर कसा विश्वास ठेवणार? माझे व्यवहार रोखठोक असतात. नाही आले पैसे तर आपलीच लागेल सगळ्यांची. कुणाला हे पटत नसेल तर ही जबाबदारी घ्यावी आणि मला यातून मुक्त करावे”. आधी पासूनच केसरभाई वर विशेष विश्वास नसलेला बाळू मात्र सहमत होता. त्याने आपला लष्करी बाणा दाखवलाच. “बरोबर आहे नाना तुझं. ५ दिवसांचा उत्सव, आपण वापरणार वर्गणीतून आलेले पैसे त्यामुळे हिशोब चोख हवा. जमा किती आहेत त्यावरूनच ठरेल ना खर्च किती करायचा? उगाच हवाल्याच्या टवाल्या हव्यात कशाला? म्हणाला ना खर्च करीन खर्च करीन मग टाकू दे ना जरा दमड्या झोळीत”. बाळूचे विचार ऐकून आता मात्र बाकीचे माना डोलवू लागले.

चाळीत गणपती असल्याने खूप उत्साहाचे वातावरण होते आणि या उत्साहाला केसर रूपी मायेचा मुलामा चढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी केसरभाई मंडपाच्या इथे एका इसमाला घेऊन एक बोर्ड तयार करत होता. मधुने आपल्या चष्म्याची बैठक नीट करून बोर्डावर जे काही लिहिलं होतं त्याची सार्वजनिक घोषणा केली. “उद्या केसरभाई चाळी मध्ये गणेशोत्सवाप्रित्यर्थ सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.” बाजूलाच नाना आणि अप्पा होतेच. “बरे झाले याला मराठी येणारा रंगारी मिळाला. नाहीतर याची मराठी म्हणजे नारायण नारायण म्हणत प्रत्यक्ष विष्णुच अवतरला असता. ” नाना हळूच कुजबुजला आणि त्याचे हे बोलणे ऐकताच मधू खी खी करून हसला. इतक्यात केसरभाई त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला “काय …कसा झालाय बोर्ड? एकदम चोक्कस”. तितक्यात बाळू पण आला आणि त्यने पण बोर्डावर एक नजर टाकली. थोडा चिंताजनक चेहेरा करून म्हणाला “केसरभाई, महाप्रसाद म्हणजे जेवण? उगीच घाट घालताय इतका.चहा कॉफी नास्ता वगैरे ठीक आहे डायरेक्ट जेवण म्हणजे ….” त्याचे बोलणे अर्धवट तोडत केसरभाई म्हणाला, “हे बगा बाळू शेठ, तुमी काय बोलू नका, आमचा महाराज है ने त्याने सगडी अरेंजमेंट केली हाय. चाळी मंदी १० घर म्हणजे जवळपास ४० माणस, बिल्डर आणि आमचा माणस धरून आजून २० जन व्हाढणार. मेनू एकदम सादा, पुरी भाजी पुलाव आणि जिलेबी. मधू शेठ तुमाला सकाळच्या नाश्त्याची ओर्डर द्यायची हाय. पोहा चहा आणि कॉफी. काय होईल बिल ते सांग नंतर पेमेंट करून टाकते. पण आत्ता हे हजार रुपया घेऊन ठेव.” असं म्हणून केसरभाई ने मधूच्या हातात ५०० रुपयांच्या २ नोटा टेकवल्या. मधूला धंदा मिळाला म्हणून मधू खुश आणि एक वेळचं जेवण फुकट मिळणार म्हणून चाळकरी खुश. सगळी कडे तोंडाची वाफ उडत होती….”भाग्य लागतं असा मालक मिळायला” “यात पण काहीतरी गोम असणार त्याचा नाहीतर एकदम पुळका बरा आला चाळीचा.” “एक दिवसाचे भाडे पण कधी सोडले नाही आणि आज हजारो खर्च करायला तयार?” “काळा पैसा खपवायचा असेल म्हणून इतका उदार झालाय.” एक ना अनेक मुद्द्यांवर चर्चा. हे पाच जन मात्र या सगळीकडे दुर्लक्ष्य करून विघ्नहर्तामय झाले होते. केसरभाईंच्या रुपाने त्यांना विघ्नहर्ता पावला होता.

शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५

नानाच्या घरी सकाळी सकाळी बाळू, मधू आणि अप्पाने जाऊन त्याला समजावले. त्यांच्या बोलण्यामुळे नानाला पण चांगला धीर आला. मंडपात गणेश पूजनाची जंगी तयारी चालू होती. सुशीलने फुलांची तर मनोरमाने पूजेची इतर तयारी चोख ठेवली होती. केसरभाई ने ५ किलो मोदक पाठवले. न सांगता सवरता केलेली ही केसरभाईची लुडबुड बाळूला अजिबात आवडली नव्हती. या वर्षी मधू आणि सुलभाचा मान होता पूजा करण्याचा. मधू चक्क धोतर नेसून तर सुलभा छान नऊवारी नेसून तयार होती. सगळे बंडोपंत केळकर भटजींची वाट बघत होते.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४

—————————————————————————————————————————————————————-

बिवलकरांच्या सचिनने केळकर गुरुजी आल्याची वर्दी दिली. भल्या पहाटे बाहेर पडलेले बंडोपंत थकून भागून परत आले होते. त्यात इतक्या पूजा केल्या होत्या त्यांच्या सामानाचे ओझे पाठीवर होतेच. “तासभर उशीर झाला गुरुजींना. कुठेतरी रिद्धी सिद्धींनी बराच वेळ घेतलेला दिसतोय.” नानाच्या अश्या बोलण्याची सगळ्यांनाच सवय झाली होती. शालजोडी घेऊनच बसलेला असायचा नेहेमी.
“आमच्या रिद्धीसिद्धींचे बघतो आम्ही … तुम्ही स्वतःचे प्रेशर सांभाळा नाही तर कधी शिट्टी वाजेल ते कळणार पण नाही” बंडूने वर जाता जाता प्रती टोला हाणत घर गाठले. पाठीमागून लगबगीने अप्पा पण हजर झाला. “बरं झालं अप्प्या आलास ते. त्या खिडकीत पुडी आहे …. मस्त मळती मारून दे. ५ मिनिटात येतोच खाली. सकाळ पासून एकही बार उडालेला नाही” बंड्याने अप्पाला कामाला लावले.
“ते देतो मळून….पण नान्याला काही एक बोलू नकोस. गरज पडलीच तर आम्हांला सांग.” असे म्हणत अप्पाने सकाळपासून घडलेला इति वृत्तांत कथन केला.
“तरी पण वाकडे वळण काही सरळ होतं नाही गाढवाचे” इति बंडोपंत.
“जाऊंदे रे. तू कशाला लक्ष देतोस? तुला त्याचा स्वभाव माहित आहे ना?” असं म्हणत अप्पाने तंबाखु चोळायचे थांबून त्यावर थापडा मारल्या आणि त्याची त्यालाच शिंक आली. “आक् छिंया …..हा बार एकदम कडक झालाय …. मस्त किक बसेल. पण सांभाळून पूजा करायचीये अजून” हातातला ऐवज बंडूच्या तळहातावर ठेवताना अप्पा म्हणाला.
“मधू आणि वहिनी तयार आहेत ना? सगळी तयारी नीट केलिये ना? मी येतोच १० मिनिटात” बंडूने तंबाखूची चिमटी आत सारत अप्पाला विचारले.
“सगळी तयारी आहे. तू ये सावकाश. इतका कडक बार मारल्यावर तुला एकांताची गरज आहे.” १० मिनिटे बंडूला कशासाठी लागणार होती हे अप्पाला पक्के ठाऊक होते.

१० मिनिटे सांगून बरोब्बर १५ मिनिटांनी वे.मू. बंडोपंत केळकर गुरुजी मंडपात आले. नाना ने परत चिमटा काढला. “पगडी झक्कास बसलीये. पण झिरमिळ्या जरा जास्तच झुलताहेत. आज गुरुजी पक्के पुणेकर दिसतात. भिकबाळीची कमी आहे फक्त” बंडू सकट सगळे हसले. बंडोपंत गुरुजींनी पूजेची मांडामांड सुरु केली. विडे, सुपाऱ्या, सुट्टे पैसे, फळे नारळ सगळे मांडून घेतले. आणि इतर तयारी पण आहे की नाही हे एकवार नजरे खालून घातले. शेंडी वरून हात फिरवत मधू ला हाकाटी केली “कुठे आहेत यजमान? चला गणपती जवळ या.” मधू लगेच आला…. आला म्हणजे वाटच बघत होता कधी आपल्याला पूजे साठी बोलावतील. सुलभा मात्र बायकांच्या गराड्यात होती. दोन चार वेळा “सुलभा पवार हाजीर हो” च्या सुरात पुकारा झाला तरी सुलभा पवारांचा कान हलण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी लाऊडस्पीकरवरून “श्री गणेशाय नमः” ऐकल्यावर सुलभा लगबगीने स्टेज वर आली. मधू वैतागून म्हणाला “काय गं? इतका वेळ भटजी बोलावतायत तरी लक्ष नाही? पूजा झाल्यावर गप्पा मारत बसा …कुनी आडवणार नाही.” सुलभा गप्पांमधून अजून बाहेर आली नव्हती. “आहो काय सांगू तुम्हांला. कुलकर्णी आणि बिवलकर वहिनी कित्ती दिवसांनी भेटल्या.बिवलकर वहिनी आत्ताच काही महिन्यांपूर्वी केसरी बरोबर काश्मीरला जाऊन आल्या त्याच्या गमती जमाती संगत होत्या. आपण पण जाऊ या एकदा”
“असूनदे ते नंतर बघू. पूजा झाल्यावर बराच वेळ आहे आपल्याकडे” मधुने सारवासारव केली.
केसरी म्हटल्यावर बंडोपंतांनी कान टवकारले. आणि थोड्या दबक्या आवाजात बंड्या म्हणाला “बिवलकर वहिनी? त्या केसरी बरोबर? अगदी उघड उघड? चायला शिऱ्याचा पत्ता कट बहुतेक. तरीच या वर्षी मालकांचे विशेष लक्ष आहे चाळीवर”
“अहो भाऊजी, तुम्ही पण ना ….काहीही बोलता. केसरी टूर्स तर्फे गेल्या होत्या त्या.” इति सुलभा….तश्याच दबक्या आवाजात.
“याला कुठे माहित केसरी टूर्स पण आहे ते. याला एकच केसरी माहित, आपले मालक केसरी पटेल. हा कसला जातोय टूर्स बरोबर याची उडी कोकणात किंवा फार फार तर गोव्यापर्यंत.” मधुने चान्स मारला.
“मध्या विसरू नकोस मी आत्ता तुझ्या पुढे बंड्या म्हणून नाही तर तुमचा गुरुजी आहे.फुकाची बडबड बंद करा. किती ताटकळत ठेवणार आहात त्या गणरायाला? चला पुजेला सुरुवात करुया. हं. करा आचमन”आपल्या अख्त्यारीचा वापर करून बंडोपंतांनी मधू आणि सुलभाला गप्प केले. मधुच्या मख्ख चेहेऱ्याकडे बघून बंडोपंत म्हणाले “अरे हो तुला सगळे सांगावे लागणार नाही का. तू अंघोळ पण आचमन केल्यासारखी करतोस. त्या भांड्यात जे चमच्यासारखे आहे त्याला पळी म्हणतात. त्यात पाणी भरून ती डाव्या हातात घे. उजवा हात तीर्थ घेताना करतो तसा करायचा. पळीतील पानी उजव्या हातावर घेऊन ते प्राशन करायचे म्हणजे पिऊन टाकायचे. असे ६ वेळा केले की सातव्या वेळेला हातावरून या ताम्हणात सोडून द्यायचे.”
“अहो बंडोपंत, आम्हाला तुमच्या सारखी कृती माहित नसली तरी आमच्या भाव ईश्वर चिंतनात असतो. आम्ही स्वामींचे उपासक. स्वामींची मानसपूजा करतो आणि त्या साठी ही अशी दिखाव्याची गरजच नसते.” मधु वैतागून म्हणाला.
आता हा वाद चिघळणार हे चाळीतल्या पोराने देखील सांगितले असते. बंडोपंत काही बोलणार या आधीच खालून नाना म्हणाला “कोकणात मंगलकार्य सुरु करण्या आधी ताशा वाजंत्री वाजवतात असे ऐकलंय. इथे तर कलगीतुरा जमणार असे दिसतंय. मज्जा आहे बाप्पाची ….एनटरटेनमेंट चा धमाका फ्रॉम मधु आणि बंडू.”

अश्या वाजंत्रीच्या सुरात पुजेला सुरुवात झाली. बंडोपंत सुस्पष्ट आवाजात मंत्र आणि तंत्र समजावून सांगत होते. संकल्प, प्राणप्रतिष्ठा, आवाहन, पंचामृती पूजा, फुले, दुर्वा, आभूषणे, धूप, दीप, नैवेद्य, असे सगळे उपचार यथोचित पार पडले. केसरभाई यांनी आणलेले मोदक तसेच चाळकरींनी बाप्पा करीता आणलेले नैवेद्य पण दाखवण्यात आले. “चला रे सगळ्यांनी आरती करू या” असे म्हणताच बालगोपाळांची एकदम धावपळ सुरु झाली. आरती संग्रहाची शोधाशोध, झांजा – टाळ यांचे वाटप, त्यात लहानमुलांची झोंबाझोंबी असा सगळा गोंधळ आरतीचे ताम्हण तयार होई पर्यंत चालू होता. नानाने माईकचा ताबा घेतला तर अप्पाने तबला पुढे ओढून घेत एकदम कसलेल्या तबलजी प्रमाणे थाप मारली. नानाच्या मते “अप्पा म्हणजे निव्वळ धिंत धिन धिनाक तिंत तिन तिनाक असा एकमेव ठेका वाजवू शकणारा पट्टीचा भजन स्पेशालिस्ट तबलजी आहे. त्यामुळे आरती, भजन वगैरे असले की तो आवर्जून चामडे बडवायला बसतो. बरोबरच आहे म्हणा रत्नागिरीच्या जवळच्या खेड्यात अजून काय काय शिकणार. थोडेसे छंद जपायचे झालं”.

या दरम्यान केसरभाई कधी मागच्या येऊन बसला होता ते कुणालाच कळल नाही. सुखकर्ता दुखहर्ता आरती चालू झाली आणि गुजराथी पठडीतला आवाज कुणाचा हे बघण्यासाठी बाळू आणि नानाने मागे वळून बघितले तर चक्क आरतीला मालकांची उपस्थिती. पंधरा कुर्ता आणि गुजराथी पद्धतीचं धोतर नेसून जोरजोरात टाळ्या वाजवून आरत्या म्हणत होता. देवीच्या आरतीच्या वेळी तर सॉलिड जोरात होता म्हणे. एकंदरीतच वर्षातून एकदा येणारा हा सण आणि त्यात म्हणायला मिळणाऱ्या आरत्या यामुळे लहान थोरांमध्ये जोश, उत्साह ओसंडून वहात असतो. केसरभाई चाळ मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात देखील अशीच आरत्यांची रांग लागली होती. सगळ्या नेहेमीच्या आरत्या क्रमाने झाल्यावर ज्ञानदेव, तुकाराम, साईबाबा यांचा नंबर लागतो. सगळ्यांची आवडती आरती म्हणजे विठ्ठलाची “येई ओ विठ्ठले”. या आरतीच्या वेळी सगळेच “आरती गायन सम्राट” होतात. बरोबर आहे इतकी खुलेआम सुरमयी बोंबाबोंब करण्याची सुट कुठे मिळणार? निढळावरी करssssssssssssss चा ‘र’ ताणण्यात भलतीच चढाओढ लागली होती. काही जण तर मधली आरती म्हणताच नव्हते डायरेक्ट शेवटचा सूर ताणायचे, मध्येच श्वास तुटला की परत छातीत हवा भरून सूर ताणायला सुरुवात व्हायची. “पंढरपुरी नाना” या शब्दांवर मात्र सगळे खी खी करून हसले. अश्या १०-१५ जोमदार आरत्या झाल्यावर शेवटी नानाने लोटांगण घालायला सुरुवात केली तशी सगळे जण स्वतः भोवती प्रदक्षिणा घालू लागले. मग परत सगळ्यांनी मंत्रपुष्पांजलीच्या वेळी ओरडण्याची हौस भागवून घेतली. त्यांच्या इतकी शुद्ध मंत्रपुष्पांजली म्हणता येण्याची तिळमात्र शक्यता नसल्याने बंडोपंत केळकर गुरुजी समोर चालू असलेली रेकावली संपे पर्यंत शांत उभे होते …..त्यांचं कडे बघून गणपतीला देखील खात्री पटली असती की बंडोपंत श्रद्धांजलीसाठी उभे आहेत. “सभा सदयति” म्हणत शेवटी एकदाची ही स्वार आरती मैफल संपली.

बंडोपंतांनी मधू आणि सुलभाच्या हातात अक्षता आणि फुले दिली आणि डोळे मिटून गणरायाची मनोमन प्रार्थना करण्यास सांगितले. “हे देवाधिदेवा गणराया, प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील केसरभाई चाळीतील आपल्या भक्त मंडळींनी आपला उत्सव साजरा जरत आहेत. तरी आपल्या उत्सवा दरम्यान मंत्रांमध्ये, तंत्रामध्ये तसेच साहित्यामध्ये काही कमतरता उणीव राहिली असेल तर आंम्हा सर्व भक्तांना क्षमा करा. नेहेमीप्रमाणेच या सगळ्या भक्तांवर आपली अनंतकाळ कृपादृष्टी राहू द्यावी. जे विद्यार्थी असतील त्यांना उत्तमोत्तम ज्ञान मिळून दे. जे विवाहेच्छू असतील त्यांना योग्य अनुरूप जोडीदार मिळो. जे नोकरी व्यवसायात असतील त्यांची उत्तमोत्तम प्रगती होवून दे. वृद्ध मंडळीना चांगले आरोग्य, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभो. सगळ्यांच्या अडचणी विघ्ने हरण कर. जे विद्यार्थी असतील त्यांना उत्तमोत्तम ज्ञान लाभो. जे विवाहेच्छू असतील त्यांना सुयोग्य अनुरूप जोडीदार मिळून दे. जे नोकरी व्यवसायात असतील त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन दे. वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळीना चांगले आरोग्य, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभून दे. हे गणराया या सगळ्या भक्तांच्या अडचणी, विघ्ने आणि चिंतांचे हरण करून अशीच सेवा करण्याची संधी सर्वांना दे ही भक्तांची प्रार्थना स्वीकार करावी. तितक्यात नानाने केसरभाई कडे एक कटाक्ष टाकून आपली इच्छा बोलून दाखवली “आणि पुढील गणेशोत्सव केसर हाइट्स मध्ये साजरा होऊन दे…. गणपती बाप्पा मोरया” सवयी प्रमाणे अप्पा ओरडला “व्हय महाराजा”. अकाल मृत्यू हरणं म्हणत गुरुजींनी यजमानांना तीर्थ प्रसाद दिला. केसरभाईंनी आणलेला प्रसादाचा मोदक खाऊन यजमान तृप्त झाले होते.

गजाननाची प्रतिष्ठापना झाली होती आणि सगळ्यांनी रांगेने दर्शन घेतले. बाळूची शिस्त ना. ;). बच्चेकंपनीने प्रसाद वाटप चालू केला. केसरभाई बाळू जवळ आला आणि म्हणाला “काय बाळूशेठ कसा काय हाये परसाद? मोदक एकदम पेशल हाय पेशल. मला कळल तुम्ही काय ते साखर फुटणे का काय ते देणार म्हणून दिला पाठवून.” मगाशी याच केसरभाईच्या या आतातायीपणावर वैतागलेला बाळू आता मात्र त्या मोदकाच्या गोडव्यात पार विरघळला होता. एकदम आदबीने बाळू म्हणाला “अहो केसरभाई, मोदक पाठवलेत ते उत्तमच झालं. पण आधी थोडी कल्पना द्यायला हवी होती. नशीब आम्ही ऐनवेळी आमचा बेत बदलला नाही ते.” तितक्यात एक पोरगा केसरभाईला प्रसाद द्यायला आला. “थांब जरा दर्सन घेऊन येते” असं म्हणत केसरभाई स्टेजवर गेला. गणपतीला वाकून नमस्कार केला. खुद्द वेदमूर्ती बंडोपंत केळकर गुरुजींच्या हस्ते तीर्थप्रसाद घेतला. खिशातून ५०० रुपयाची नोट काढून दक्षिणा म्हणून पंतांच्या हातावर आणि वाकून नमस्कार केला. सगळ्यांशी गप्पा मारून ख्याली खुशाली विचारून “संध्याकाडी येते” असे सांगून निघून गेला.

हळू हळू सगळे चाळकरी पांगायला लागले. जेवायची वेळ होऊन गेली होती. बाळूने आपल्या यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांना जेवायला धाडले. जेवण झाल्यावर सगळ्यांना परत बोलावले म्हणजे हा जेवायला आणि त्यानंतरची वामकुक्षी घ्यायला मोकळा. मधू जसा सपत्नीक आला तसाच निघून गेला. नेसलेले धोतर हे कितीही आधुनिक पद्धतीचे आणि सोयीचे असले तरी लेंगा किंवा लुंगी वापरणाऱ्या मधूला अडचणीचे जात होते. मंडपात उरले नाना, अप्पा आणि बाळू तिघेच. ५-१० मिनिटांनी मधू आणि बंडू फ्रेश होऊन आपल्या मित्रांच्या सोबतीला खाली आले. मधू बिडी शिलगवणार इतक्यात नाना म्हणाला “अरे आत्ताच पूजा केलीस ना. इथे धूर सोडलास तर बाप्पा तुझ्या मागून धूर काढेल. विसरलास बाळ्याची आज्ञा. जा मंडपा पासून २२.३ फुट लांब किंवा २५ पावले दूर जाऊन बिड्या सिगारेटी फुका”. मधुने निमुटपणे बिडी ओठातून काढून कानाच्या पाळीवर घुसवली.  गणपतीची पूजा, सगळ्यांचा, विशेष करून केसरभाईचा सहभाग आणि सगळ्यांचे नियोजन मनाप्रमाणे झाले असल्याने पाचही जण खूप आनंदात होते. पण हा या इथल्या चाळीतला शेवटचा गणपती उत्सव. या पुढे या जागी उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतीतील बाप्पा कसा असेल कुणास ठावूक. बंडोपंत म्हणाले “अरे चिंता कशाला करताय? उत्सव करणारा तोच आणि करवून घेणारा ही तोच आपण फक्त निमित्त. या वर्षीच्या उत्सवाला त्याने आपल्याला सामावून घेतले हेच आपले भाग्य.”

(क्रमशः)

शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४

गणपतीच्या आगमनाच्या वेळी चाळकरींनी न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद दिला. अगदी ज्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची त्यांनी देखील वेळात वेळ काढून हजेरी लावली होती. सगळ्यांना एकाच गोष्टीचे अप्रूप वाटत होते ते म्हणजे केसरभाई आणि त्याच्या कुटुंबियांचा सहभाग. चाळीतील कुठल्याही सणा-समारंभापासून स्वतःला अलिप्त ठेवणारे केसरभाई आणि कुटुंबीय या शेवटच्या गणपती उत्सवाला मात्र चाळकरींमध्ये मिसळून गेली होती. नुसताच नावाला सहभाग नव्हता तर मालक आणि भाडेकरू हा भेदभाव बाप्पाच्या चरणी अर्पण करून केसरभाई ढोल ताश्यांच्या ठेक्यावर मिरवणुकीत नाचला. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. अवघी केसरभाई चाळ मोरयामय झाली होती. नेहेमी केसरभाई च्या हेतुंवर शंका घेणारा बाळ्या देखील अवाक झाला होता. या सगळ्यात नाना मात्र वाढत चाललेला खर्च आणि त्यात भरीसभर म्हणून ही सत्यनारायणाची पूजा याचा ताळमेळ कसा लावायचा याच चिंतेत होता.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३

—————————————————————————————————————————————————————-

पूजेची तयारी

आदल्या दिवशी सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे अप्पाने कोकणवारी पुढे ढकलली. अप्पा आता ५ दिवसांनी होणारे केसरभाई चाळ मित्रमंडळाच्या गणपतीचे विसर्जन करून मगच जाणार होता. अर्थात आतल्या गोटातली बातमी वेगळीच होती. या वर्षी काही कारणाने दुसऱ्या माळ्यावरील सरखोत बाई त्यांच्या भावाकडे गणपतीला जाणार नव्हत्या म्हणे. असो, चाळकरी काय काय पण उठवतात. 😉

भल्या पहाटे उठून बाळ्याने मंडपाची झाडलोट केली. अप्पाने केलेली लायटिंग नीट चालू आहे ना याची खात्री करून घेतली. इतक्यात मंडपाच्या एका खांबाजवळ एक कुत्रं नैसर्गिक विधीसाठी एक पाय उचलण्याच्या बेतात असतानाच बाळ्याने त्याच्या पेकाटात झाडू मारला “रांडेच्या गणपती बाप्पाच्या खांबाला तरी ओला करू नका. दिसला खांब की उचलला पाय”. असे पहिले सनईचे सूर कुत्र्याने आळवले. आता बाकीच्या मंडळीना उठवावे असा विचार करून प्रथम नानाच्या खोलीजवळ गेला. दरवाजा वाजवणार इतक्यात आतून मनोरमा वहिनींचं बोलणं कानावर पडलं. “अहो कशाला इतकी काळजी करताय खर्चाची? गणरायाच मार्ग काढेल यातून. वर जर काही पैसे लागले तर ते आपण देऊ किंवा तुमच्या मित्रांना सांगा, ते काही नाही म्हणणार नाहीत. …… तुम्ही बोलला नाहीत काही पण काल पासून बघतेय मी तुमचं टेन्शन. आणि काल जेंव्हा तुम्ही लपवून बिपीची गोळी घेतलीत तेंव्हा खात्रीच पटली. काल रात्रभर धड झोपला नाहीत तुम्ही. आता पूजा झाल्यावर दुपारी दोन घटका झोप काढा म्हणजे फ्रेश वाटेल लागलाच तर संध्याकाळी डॉक्टर कडे जाऊ. …… चला आवरून घ्या. उत्सव सगळ्यांचाच आहे जास्तीच्या खर्चाचा भार सगळ्यांनीच उचलू. मी हळू हळू पूजेची तयारी करते.”

नानाने वाढणाऱ्या खर्चाचे इतके मनावर घेतले हे ऐकून बाळूला खूप वाईट वाटलं. दोनचार दिवस नानाचं गप्प राहणं, कुणात जास्त न मिसळणं खर्चाच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेणं आणि या वरून त्याला आलेलं टेन्शन त्याला ठाऊक होतं. पण इतकं? अगदी बिपीची गोळी घेण्या इतकं? या सगळ्या गोष्टी बाळूला अस्वस्थ करत होत्या. रोजचा राबता असून सुद्धा त्याचं हे अनपेक्षित वागण्या मुळे खरं तर बाळू थोडा चिडला पण होता, पण ही वेळ रागावण्याची नसून नानाला आधार देण्याची आहे याची जाणीव होती. झर झर जिने चढून बाळ्या मधू आणि अप्पा कडे गेला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. वेदमूर्ती बंडू गुरुजी पहाटे पहाटेच गणपती पूजे साठी बाहेर पडले होते त्यामुळे त्याला बोलावण्याचा प्रश्नच नव्हता.
“चायला या नानाच्या नानाची टांग. वेडझव्याला इतकं सांगून सुद्धा कळत नाही म्जानाजे काय? मागेच सांगितलं खर्चाची चिंता करू नको आपण सगळे बघून घेऊ म्हणून. आत्ताच जाऊन भोसडतो त्याला. अरे इतकं टेन्शन घेतलं तर खापायचा फोकालीचा.” अप्पाचा तोल सुटला.
“अप्प्या भलतं सलतं बोलू नकोस.त्याला आपल्या आधाराची गरज आहे. असं बोलून अजून त्रास होईल त्याला. तू तिथे काही एक वाकडं तिकडं बोलू नकोस, फक्त आमच्या बरोबर ये.” मधुने खडसावून सांगितले.
तिघेजण नानाच्या दरवाज्याजवळ आले..दरवाजा वाजवला. नानानेच दरवाजा उघडला. रात्रभर डोळ्याला डोळा न लागल्यामुळे नाना तर्राट दिसत होता.
“काय नाना आवरलं का? काय वाहिनी पूजेची तयारी झाली का?” चाचपणीच्या स्वरात मधुने विचारले.
“तुम्ही सगळे आत्ता कसें काय? कश्यासाठी पैसे हवे आहेत का? मी येतो आवरून, तुम्ही व्हा पुढे” नानाचा आवाज पार टेकलेला होता.
“अरे भावोजी, तुम्ही? आज सकाळी सकाळी काय काम काढलात? या ना बसा. चहा घेणार?”
नानाच्या बायकोचे बोलणे अर्धवट तोडत बाळू म्हणाला “टाकला जाऊन भांडे लपवायला मला आवडत नाही वाहिनी. मगाशी मी तुमचं बोलणं बाहेरून ऐकलं …. मुद्दामून नाही पण योगायोगच म्हणा ना. पण त्यामुळे नानाची खरी परिस्थिती कळली.”
“तुम्ही सगळे बसा मी आलेच चहा घेऊन” असे म्हणून मनोरमा आत निघून गेली.
बाळू नानाला म्हणाला “नाना, अरे इतकी काळजी नको करूस… आम्ही आहोत ना सगळे? जो वाढीव खर्च येईल तो सगळ्यांनी मिळून करू. आणि जो जमाखर्च आहे तो तर उघड आहे त्यामुळे वाजवी पेक्षा जास्त खर्च का झाला असे कुणीही तुला विचारणार नाही. कुणीही तुझ्यावर वैयक्तिक टाच आणणार नाही ….आणि आम्ही अनु देणार नाही. अरे, हा सगळ्यांचा उत्सव आहे, विघ्नहर्त्या गणरायाचा सोहळा आहे. तूच जर असं टेन्शन घेतलंस तर कसं चालेल?”
बाळूचे वक्तव्य संपते न संपते तोच मधू पण म्हणाला, “अरे वेळ आलीच तर माझा एक दिवसाचा गल्ला ठेवीन बाप्पाच्या पायाशी. पण नाना तू काळजी करू नकोस. सगळी कडे इतका उत्साह असताना तुझा असा चेहेरा बघवत नाही.”
“पैश्याचे काय घेऊन बसलास नाना? तो विघ्नहर्ता बसलाय ना सोड त्याच्यावर सगळं. त्याचा उत्सव कसा उत्तम रित्या साजरा करून घ्यायचा याची सोय तोच करेल. अरे उत्सव म्हटला की जमाखर्च जरा लोंबकळनारच. पण तुझ्या सारखा बँकवाला असा फाफलला तर कसं व्हायचं? आणि या भानगडीत तुझ्या अती टेन्शन मुळे काही झालें तर…..” मधू डोळे वटारून अप्पा कडे बघत होता म्हणून पुढील शब्द घशातच विरले.
बाळू उठला नानाच्या बाजूला बसला. त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला “आपल्या कडील वर्गणीची शिल्लक संपली की विचार करू ….. सगळ्यांनी मिळून विचार करू. आता हा वेडेपणा सोड आणि आवरायला घे. दाढी वगैरे कर, आपल्याला सगळ्यांना ५ दिवस बरीच कामे आहेत”
“वहिनी, मस्त आलं मारून चहा द्या नानाला. मस्त तरतरी येईल एक दोन घोट घश्यात गेल्यावर. आतला चहा कमी झालं की हा असा विचित्र वागतो. एक कप रिचवलनी की बघा त्याचे प्रेशर कसें नख शिखांत उसळी मारायला लागेल.” अप्पाचा डोळा मिळणाऱ्या चहावर होता.
बाळू चला रे निघूया, बरीच कामे पडली आहेत असे म्हणताच आतून मनोरमा वहिनी म्हणाल्या “भाऊजी थांबा चहा घेऊन जा. तुम्ही मगाशी आलात तेंव्हाच सगळ्यांसाठी चहा ठेवला होता.”
पडत्या फळाची आज्ञा मानून अप्पा लगेच खाली बसला आणि बाकीचे दोघे उभेच आहेत हे बघून म्हणाला “अरे बघताय काय असे माझ्याकडे? बसा वहिनी चहा घेऊन येतात ना. तसेच गेलो तर फुकट जाईल ना सगळा?”
“तू पण ना एक नंबरचा लोचट आहेस अप्प्या” असे म्हणत दोघे परत खाली बसले. यांचा संवाद ऐकून नाना गालातल्या गालात हसत होता. यांच्या येण्याने त्याला खरंच खूप धीर आला होता. आता अजिबात टेन्शन वाटत नव्हतं. सगळ्यांनी चहा घेतला.
“नाना निघतो आम्ही. आवरलं की ये खाली. वहिनी पूजा ११ वाजता आहे आणि बंडू गुरुजींनी ११ वाजताचे टाईम दिले आहे. म्हणजे १२ वाजणार हे नक्की पण आपण तयार पाहिजे. तुमची तयारी झाली की निरोप द्या. कुणाला तरी पाठवतो वर घेऊन यायला” बाळू म्हणाला आणि सगळे बाहेर पडले. जिन्यात चर्चेला ऊत आला…  “बरं झालं आपण गेलो ते …. काय अवस्था झाली होती ….” वगैरे वगैरे….

सगळे चाळकरी हळू हळू मंडपात जमा झाले. पुरुष मंडळी सलवार कुर्ता आणि वर असली तर पांढरी टोपी तर स्त्रिया छान पैकी साडी नेसून सजून सावरून आल्या होत्या. बाळूची यंग ब्रिगेड पण जमा झाली होती. सुशीलने फुलांची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. २ मोठे हार, दुर्वांची कंठी, गणपतीला छानसा मुकुट, गणपतीची आभूषणे या खेरीज जवळ जवळ २ परड्या भरून विविध रंगांची फुले आणली होती. महिला वर्गाच्या खास आग्रहास्तव अजून एक फुलांची परडी निव्वळ रांगोळी आणि सजावटीसाठी मागवली होती. मंडपाचा दर्शनी भाग फुलांच्या रांगोळीने सजवण्याची जबाबदारी महिला मंडळाने घेतली होती. संस्कार भारतीच्या कथित रांगोळी मध्ये रांगोळीची आणि रंगांची प्रचंड नासाडी होते म्हणे. त्यावर अप्पाने टोमणा पण मारला होता ‘फूल’संस्कार रांगोळी म्हणून आणि सरखोत बाईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तोंड बंद झाले (असा नानाचा दावा आहे). सुशीलने ही सगळी तयारी मंडपात आणून ठेवली आणि रु. ३००० मात्र असे लिहिलेले बिल बाळूच्या खिशात कोंबले.

एक माणूस तडक मंडपात आला आणि ५ किलो मिठाईचा बॉक्स स्टेजवर ठेवला. डोक्यावरचा घाम पुसत एक चिठ्ठी बाहेर काढली. “बालू सेठ कौन है?” असं बाळूलाच विचारले. आपण ज्याला विचारले तोच बाळु आहे हे समजल्यावर बाळूच्या हातात ती चिठ्ठी ठेवली आणि तसाच काही न बोलता निघून गेला. बाळूने बॉक्स थोडासा उघडून पहिला. वर केशराच्या काड्या लावलेले ताजे ताजे माव्याचे मोदक होते. बाळूला वाटले दिली असेल नानाने ऑर्डर मोदकांची. पण इतके मागवायची गरज काय? ठरले होते ना साखर फुटाणे द्यायचे म्हणून? असंच काही खुळचटपणा करुन हा खर्च वाढवतो आणि मग लागतं याचं रक्त संप पुकारायला. असा विचार करताना निदान किंमत किती आहे हे बघण्यासाठी बाळूने चिठ्ठी उघडली. आकडा होता रु. २५०० मात्र आणि वर नाव होतं केसरभाई. ती चिठ्ठी त्याने अप्पाला दाखवली आणि म्हणाला “हा केसरभाई काय समजतो काय स्वतःला? आज अचानक चाळीतल्या गणपती बद्दल प्रेम उफाळून आलं. इतका खर्च चाळीच्या नावावर करण्या आधी विचारायचं तरी. आता याचे पैसे कोण देणार? उगीच लुडबुड चालवलीये”. अप्पा म्हणाला “हे बघा बालू सेठ, वो माणूस ने इसका पैसा मांगा क्या? मग झालं तर याचे पैसे केसरभाई ने दिले असतील तर प्रश्नच नाही. आणि अती झाले तर सरळ सांगेन मी त्याला त्याच्याच टोन मधे … शाला ..इतका सामान आणला त्याचा पैसा कोन देनार? पैसा काय झाडाला लागते?” अप्पाने केसरभाईची हुबेहूब नक्कल केली आणि एकच हशा पिकला. प्रसंग हलका करण्यासाठी इतके पुरेसे होते.

१०:३० वाजत आले होते. नाना हातात पूजेचे तबक घेऊन हलकेच जीना उतरत होता. ते बघताच अप्पा पुढे झाला आणि नानाच्या हातातून तबक घेतले. नाना सकाळ पेक्षा खुपच फ्रेश वाटत होता. नाना म्हणाला “अजून तयारी आणायचीये. फळे, नारळ, सुपाऱ्या अजून वरच आहेत. मधूचे आवरलं का? या वर्षी त्याची वर्णी लागली आहे ना?”
अप्पा म्हणाला “तू शांत पणे  बस. किंवा मंडपात खुर्च्या लावून घे त्या पोरांकडून. मी घेऊन येतो बाकीची तयारी.”
नाना म्हणाला “लवकर ये वेळ नको घालवू. …. आणि हो मी पहिल्या मजल्यावरच रहातो, नाहीतर पोहोचशील सवयीने दुसऱ्या मजल्यावर ;)” … नाना ने केलेला विनोद म्हणजे नाना ताळ्यावर आल्याचे लक्षण होते.
“बस्स का नान्या … साल्या तू पण पेटला का आता?” हे उघड पणे आणि ‘चायला याच्यावर प्रेशर होतं तेच बरं होतं आता हैराण करेल फोकलीचा’ हे मनातल्या मनात बडबडत अप्पा तयारी घेऊनच आला. खाली खुर्च्या मांडायचे काम चालू होते इतक्यात धावत पळत मधू आला. बाळ्याने त्याला नखशिखांत निरखले. नेहेमी गल्ल्यावर असताना घातलेला तेलाचे, बेसन पिठाचे डाग पडलेला कळकट शर्ट आणि खाली तितकाच कळकट लेंगा. त्याला पाहून बाळ्या प्रचंड वैतागला. “अजून आवरले नाही तुझे? की असंच बसणार आहेस कळकट शिरोमणी सारखा? निदान धुतलेले स्वच्छ कपडे तरी घालून यायचेस. बरं, सुलभा वहिनींचे कुठपर्यंत आले? त्या कुठे आहेत? तो बंड्या यायच्या आत या रे … आज भटजी आहे ना तो आपल्या साठी म्हणून उगीच मिरवेल शेंडी उडवत”
“बाळ्या उगीच वैतागु नकोस. मी आलोच १० मिनिटात. सुलभा आवरतिये. माझ्या साठीच थांब्लीये. अरे सकाळीच फोन आला आपण नाना कडून गेलो तेंव्हा. शेजारच्या गल्लीतील गणपतीच्या नाश्त्याची ऑर्डर होती. आणि बंड्याचा पण फोन आला होता थोडा उशीर होईल म्हणून. त्याची गाडी अर्धातास लेट धावत आहे ;). त्यामुळे काळजी नाही. मी आलोच कपडे बदलून.” असे म्हणत मधूने काढता पाय घेतला. “शेजारच्या गल्लीतला गणपती वडापावचा ब्रेकफास्ट करतो की काय? इथे आमचे कार्यकर्ते उपाशीच आहेत. मागास पासून वास येत होता वड्यांचा … सगळ्यांचे लक्ष तुझ्या दुकानाकडे. पण तू रिक्त हस्तानेच आलास. ;)” नान्याने शाब्दिक चिमटा काढला. हे ऐकताच मधू हसला आणि म्हणाला “सुटला एकदाचा आपला गणपती. नान्या देवळात आला ना”.

बरोब्बर ११:१५ या वर्षीच्या गणपती पूजेचे मानकरी यजमान मधू पवार यांचे सपत्नीक आगमन झाले. सौ. सुलभा छान नऊवारी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा आणि त्याच्या कडेशी मस्त मोगऱ्याचा गजरा. चाळीतल्या जुन्या वृद्ध मंडळीना काही क्षण का होईना कृष्णधवल जमान्यातील सुलोचना बाईंची आठवण झाल्याशिवाय राहिली नसेल. श्री. मधू पवार तर चक्क पांढरे शुभ्र धोतर, पंधराशुभ्र झब्बा, डोक्यावर टोपी आणि खांद्यावर ओढणी वजा उपरणे घेऊन पूजेसाठी तय्यार होते. या अश्या वेशात मधूला बघायची सवय नसलेल्यांना जरा हे प्रकरण जडच होते. आणि अशी संधी अप्पा थोडीच सोडणार? “अरे व्वा. झक्कासच एकदम. आज कसा पांढराशुभ्र बगळ्यासारखा दिसत आहेस. पण वहिनींना शोभत नाहीस हो. शेवटी बायकांचे नटणे तेच खरे नाहीतर इतर म्हणजे कपडे बदललेले बुजगावणेच की. बरे आता हे कमरेला गुंडाळलेच आहेस तर जरा सांभाळून. काष्टा खोच्लायस ना फुटभर आत नाही तर सुटायचा. उगीच इकडे तिकडे नाचू नकोस गणपती आणताना नाचलास तसा. नाहीतर चुकून उडी मारशील …. तू राहशील हवेत आणि धोतर जमिनीवर … सगळे इथेच आरती करायला लागतील …घालिंग लोटांगण करत” (घालीन लोटांगण तसेच इतरही काही शब्दांचा अपभ्रंश आजकाल सढळहस्ते बऱ्याच आरत्यांमध्ये आढळतो त्याचाच हा एक नमुना)
मधू गालातल्या गालात हसला आणि म्हणाला “छे रे, असे सुटणार नाय काय. स्पेशल धोतर आहे हे. रेडीमेड. लेंगा घालतो तसेच घालायचे…नाडी घट्ट बांधली म्हणजे झाले. काष्टा पण मागून शिवलेला आहे म्हणजे कितीही उड्या मारल्या तरी कुठलेही लोटांगण होणार नाही. अगदी नैसर्गिक आणीबाणीच्या वेळी चैनची पण सोय आहे.”
“अरे वाह … या धोतराची आणि धोतर घातलेल्या माणसाची भलतीच ‘चैन’ आहे म्हणायचे” नानाने पण चान्स मारला. इथे महिला वर्गाची सुलभा वहिनींवरून कुजबुज चालू झाली….साडी मस्तच आहे…खोपा छान आलाय…साडी कुठून आणली….दागिने कुठे घडवले….अगदी हातावरच्या मेंदी पासून ते पायातल्या तोड्यांपर्यंत सगळ्या बद्दल कुजबुज झाली. आणि हळू हळू कुजबुज चर्चेमध्ये रुपांतरीत झाली. आणि इकडे पुरुष मंडळींमध्ये मधूला बेजार करणे चालूच होते.

या सगळ्या धबडग्यात वेळ कसा गेला तेच कळले नाही आणि एकदम अप्पा म्हणाला “काय ११:४५ झाले. भटजी विसरला की काय पूजेचे? वाट बघयला भारीच पडतं बुवा. सुशील अजून ३० मिनिटे वाट बघू नाही तर दुसरा भटजी पकडून आण. नाहीतर नान्या तुझ्या गळ्याला जानवे आहेच. तूच सांग पुस्तकी पूजा. बंड्याला बघू नंतर”

तितक्यात बिवलकरांचा सचिन ओरडत आला “बंडू काका आले…. बंडू काका आले” आणि लगबग सुरु झाली.