सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली असणार हे निश्चित. आमचे कपडे, विविध खायच्या वस्तू, चकणा आयटम्स, निरनिराळी पीठे, आम्ही नसताना घरात फुकट जातील म्हणून उरलेल्या भाज्या, कांदे बटाटे अश्या अनेक गोष्टीनी डिकी सजली होती. डीकीचा दरवाजा लावताना आत काहीतरी तुटल्याचा आवाज आला पण आतले रचून ठेवलेले समान पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल म्हणून उगीच रिस्क नाही घेतली. जाता जाता वाटेमध्येच उसनी आणलेली कर्नाळ्यातील कांदे भज्यांची भूक आणि पळीच्या सोड्याची तहान भागवली. डोंबिवली पासून नागाव मात्र १०० की.मी. असल्याने ३ तासातच इच्छित स्थळी पोचलो. हेमंतानेआधीच सगळी साफसफाई करून ठेवली असल्याने समान लगेच जागच्या जागी लावण्यासाठी शि.प्रि. नी कंबर कसली. दिवसभरात हळू हळू पाव्हणेरावणे जमू लागले. पुण्याहून माधुरी, अभिजीत आणि ओम आले. बोरिवली वरून ताई, मिलिंद आणि कलश आले आणि कोरम पूर्ण झाला. घर कसं फुलून गेलं आणि रात्री गप्पांना ऊत आला. सकाळी सकाळी माझ्या भाच्यांनी आणि मुलीने मला झोपेतून उठवण्याचा चंग बांधला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने खोड्या काढत मला उठवत होता. आणि जसा मी उठलो तसा “आजचा मेनू” अश्या अविर्भावात येत्या ५ दिवसात काय काय धम्माल या बच्चे कंपनीला करायची होती त्याचा पाढाच वाचून दाखवला. अगदी आंबे चिंचा गोळा करणे, बर्फाचा गोळा खाणे, शहाळी पडणे, हौदात डुंबणे, समुद्रावर फिरायला जाणे इथ पासून ते बैलगाडीत बसणे इथपर्यंत. त्यात बर्फाचा गोळा, हौद आणि समुद्र एकदम “अती महत्वाचे आणि अत्यावश्यक” या सदरातील. हे सगळे आणि अजून काही सुचेल ते आपण या सुट्टीत करायचे असे म्हटल्यावर एकच गलका झाला. आता इथे मामाच “राजी” म्हटल्यावर घरातला कुठलाही “काजी” काय बोलणार? तसंही घरातील समस्त महिला वर्गाने ढील दिली असल्याने सगळ्या बालक वर्गाचे पतंग हवेत मस्त बदत होते … आणि मी बदवत होतो.

हौद आधीच साफ करून ठेवला होता आणि पंप लावून हौद भरून घेत होतो. तर ही वानरसेना बोलावण्या अगोदर तयार. माझी मुलगी तर चक्क बिकिनी घालून “मुलांनो मारा उड्या” या आज्ञेची वाट बघत होती. तिघांनी हौदात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १२ वर्षाचा कलश त्याच्या पेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या ७ वर्षाची आर्या आणि ४ वर्षाच्या ओम ची छान काळजी घेत होता. त्यांचा खोडकरपणा बाहेर उभं राहून बघणं जीवावर आलं होतं आणि त्यातच या तिघांनी मला पुरता भिजवला असल्याने मी पण हौदात उतरलो. सकाळी ९ वाजता चालू झालेले हे रासन्हाण १२ वाजता या सगळ्यांची आजी अर्थात माझ्या मातोश्री हातात शिपटी घेउन आली तेंव्हा संपलं. संध्याकाळी समुद्रावर जाऊन धमाल केली. शंख शिंपले जमवले. वाळूचा किल्ला केला, नक्षी काढली, समुद्राच्या लाटांमध्ये सैरावैरा धावलो. समुद्रावरचा गोळेवाला आमच्या गल्लीतूनच जात असल्याने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले आणि बच्चे कंपनीने परत एकदा कल्ला केला “उद्या गोळा खायचा … उद्या गोळा खायचा”. समुद्रावरच इतकं खेळल्यावर अर्थात क्षुधाशमनार्थ भेळ आणि तृषाशमनार्थ थंडगार उसाचा रस ही मागणी देखील पूर्ण केली. दमून भागून माझी तिन्ही पाखरं गाढ झोपी गेली. सगळे इतके दामले असून देखील त्यांच्या चेहेऱ्यावर एक तजेला होता … स्थळ काळाचा परिणाम असेल कदाचित.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोळेवाला घंटानाद करत दरवाज्यात हजर झाला तसा पोरांनी “गोळा गोळा” म्हणत एकच गजर केला. थोरा मोठ्यांनी बर्फ आणि त्यात मिसळलेला गोड रस चुपून चुपून गोळा खाल्ला … इतकंच नव्हे तर सगळ्यांनी वरून रस मागून घेतला. मुलांसाठी चवीपेक्षा रंगाचे आकर्षण अधिक. कुणाला हिरवा, कुणाला गुलाबी लाल, कुणाला कालाखट्टा तर कुणाला मिक्स – अशी रंग आणि चवीची रेलचेल होती. मुलांनी अर्धे खाल्ले आणि अर्धे सांडवले आणि अंगणात सप्तरंगी बर्फाचा सडा पडला. बालगोपाळांचीच काय तर मोठ्यांच्या देखील काही ना काही मागण्या रोज पूर्ण करत होतो…नेम धरून आंबे चिंचा पडणं, शहाळी पिणं, अगदी बैलगाडीची रपेट पण मारून झाली. क्रिकेट, पत्ते याच बरोबर लंगडी, आबादुबी पण खेळलो. डुक्करमुसुंडी, विषामृत, डब्बा ऐसपैस, खांब खांब खांबोळी असे जागे अभावी लोप पावत चाललेले खेळ देखील शिकवले. खेळता खेळता मुलं पडायची धडपडायची पण उठून परत खेळायला सुरुवात…तिथल्या मातीचाच गुणधर्म असावा कदाचित. एक दिवस आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणले. नागावच्या आजूबाजूला बघण्या सारखी बरीच ठिकाणे असल्याने कुठे जायचे हा प्रश्नच नव्हता. सुंदर सुंदर देवालयं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग समुद्राच्या वाळूला खेटून उभी असलेली सुरुची बनं, जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. करमरकर याचं कलादालन, कोर्लईचा किल्ला आणि दीपस्तंभ, शितलादेवी,  नांदगावचा सिद्धिविनायक,  हे सगळं करता करता चौलचा दत्त, कनकेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, सागरगड, वंदरलिंगी, रामधरणेश्वर अशी जरा उंचावर असलेली ठिकाणे मात्र राहून गेली. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ही सगळी मुलं शहरात असताना पायात चप्पल नसेल तर घरच्या बाहेर पडणार नाहीत पण इथे माझ्या बरोबर रानावनात, शेतावर अनवाणी यायला देखील एका पायावर तयार होती. मला मिळालेल्या ४-५ दिवसांमध्ये मी त्यांच्यात गावातील राहणीमाना बद्दलची आस्था जागवत होतो आणि जगत होतो.

हळू हळू तिथले वास्तव्य संपत आले आणि एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली. अजून काही दिवस राहिलो असतो तर अजून मज्जा आली असती असं प्रत्येकाला वाटत होतं. स्वतःच्या रक्ताच्या ३ पिढ्या जेंव्हा अश्या एकत्र येतात तेंव्हा नात्यांमधील रेशमी वीण अशीच घट्ट होत जाते आणि या आठवणी चिरकाल टिकतात. पुढल्या सुट्टीत इथेच येऊ, दिवाळी इथेच साजरी करू, भरपूर फटके वाजवू असे म्हणत आमची पुढची पिढी एकमेकांचा निरोप घेत होती. हे बघून आमच्या मागील पिढीचे डोळे पाणावले नाही तरच नवल. आजी आजोबांनी डोळ्यांच्या कडा पुसत तिन्ही नातवंडांना खाऊ साठी पैसे दिले. घर जसं भरलं तसचं हलक्या फुलक्या आठवणी ठेवत रितं झालं. दरवाज्याला कुलूप लावताना माझी कन्या मला म्हणाली “दिवाळीच्या सुट्टीत आपण इथेच येऊ. अजून बाकीच्यांना पण बोलवू. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा इथेच जाम मज्जा येते”. मुलीला ऋणानुबंधाची गोडी लावण्याचा माझा उद्देश सफल झाला होता.

नागांवच्या गोड आठवणी मनात ठेवून एकदम ताजे तावाने होत आम्ही सगळे एकमेकांच्या घरी पोहोचलो आणि रोजच्या जगरहाटीला सुरुवात झाली. नोकरी, प्रदूषण, ट्रेनचा प्रवास असह्य असलं तरी करणं भाग होतं. पण मुलीला दिवाळीत काश्मीरला नेण्याचा बेत काही डोक्यातून जाईना. एक कल्पना सुचली आणि धडाधड फोन फिरवले. दिवाळीचा काश्मीरचा बेत निश्चित केला …. हो पण फक्त आम्ही तिघं नाही. माणसं सगळी तीच फक्त स्थळ वेगळं. सहकुटुंब सहपरिवार काश्मीर पण दिवाळीचे फटाके नागांवच्या अंगणात फोडून झाल्यावरच.

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ६

आमच्या अश्या शांत आणि मार्मिक संवादामुळे एकंदरीत वर्गातील इतर पालकांची करमणूक मात्र झाली. काही पुरुषांनी नंतर खाजगीत मला हे देखील सांगितले कि पुढील मिटिंग ला तुम्ही येणार असाल तरच आम्ही येऊ. शिक्षिका देखील पहिल्याच पालकांच्या बैठकी दरम्यान मुलांची चौकस बुद्धी आणि त्यांना मिळणारी वागणूक या माझ्या पत्नीने विचारलेल्या प्रश्नांवर खुश होत्या. “आता बघ मी कशी बोलते” असा पवित्रा घेऊन जशी आम्हांला घरी ढकलत ढकलत मुद्द्यावर आणून ठेवते तसाच अविर्भाव इथे पण दाखवला असल्याने बऱ्याच मातांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मुलांची प्रगती त्यांचा पुढील वार्षिक अभ्यासक्रम यावर जुजबी चर्चा होऊन सभा तहकूब झाली. “तुम्ही थांबा बाहेर मी आलेच” याचा अर्थ तुमच्या अपरोक्ष मला टीचर ना काहीतरी विचारायचे आहे हे कळण्या इतपत मी मुरलेला असल्या कारणाने मी आणि मुलगी तिथून बाहेर पडलो.

काही पालक नंतर माझ्याशी सुसंवाद साधत असतानाच हिचे तेथे आगमन झाले. एक वेगळीच लकाकी होती तिच्या चेहेऱ्यावर, अगदी भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर वरील बायकांच्या तोंडावर असते तशीच. कदाचित आमच्या बद्दल (मी चे आदरार्थी बहुवचन) प्रशंसनीय गौरवोद्गार काढले असावेत अशी उगाच शंका मनात येऊन गेली. “काय म्हणत होते बाकीचे पेरेंट्स” – ती. मी म्हटले “त्यांना मी सामुपदेशक वाटलो …. मी पण मग बाण सोडला … आपण इतरांशी जसे वागतो तसच दुसरे कुणी आपल्याशी वागले तर कसे वाटेल हा विचार करून वागा. सर्वसामान्य माणसेच पुढे सर्वमान्य होतात आणि कीर्तन संपवले” पुढे मी जे काही बोललो ते ऐकून घेण्याच्या ही मनस्थितीत दिसत नव्हती. गाडीला किक मारली … आणि अहो आश्चर्यम् … एका किक मध्ये गाडी चालू झाली पण. तिघे जण स्वार होऊन घरा कडे निघालो. मुलगी पुढे उभी राहून नेहेमीपणे अविरत बडबड करत होती. बायको जरा जास्तच जवळीक साधत कानात म्हणाली “मग येणार ना पुढच्या मिटिंगला? टीचर म्हणत होत्या तुमच्या मिस्टरांना आणू नका, खूप बोलतात आणि इतर पालकांचे लक्ष वेधून घेतात. मध्येच हायपर काय होतात. But seems to be a good father, मी पण म्हणाले आहेच तो असा वेगळा वेगळा”. अशी मिश्कील संधी मी थोडीच सोडणार? “छे छे मी येणारच …. मी बघितले, मी बोलत असताना त्यांचा तरुण शिक्षक आणि पालक वर्ग कसा भान हरपून बघत होता माझ्याकडे” – या वेळी कोपर मारायला जागा न मिळाल्याने कमरेवर नाजूक चिमटा मात्र बसला होता.

या पेरेंट्स मिटिंग मुळे एक मात्र झाले, आज कित्येक वर्षांनी परत एकदा त्या बेंच वर बसायचे भाग्य मिळाले. पाय मुडपून बसायला लागत असल्याने आपण मोठे झालो आहोत याचे भान असले तरी वर्गात बसायला मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. तो काळा फळा, त्याच्या चौकटीवर ठेवलेले डस्टर, खडू, पोलिश केलेले टेबल, दोन हात असलेली लाकडी खुर्ची, दोन्ही बाजूला असलेल्या खिडकीतून वाहणारी वाऱ्याची झुळूक मला परत माझ्या शालेय जीवनातील मोर पिसार्याप्रमाणे जपलेल्या आठवणींच्या गावी घेऊन जायला आतुर झाले. बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्या आड गेल्या असल्या तरी एकंदरीत माझे शालेय जीवन माझ्या पालकांसाठी जिकरीचेच होते असे मानायला हरकत नाही. त्या वेळी अश्या मिटींगा असत्या तर केवळ माझ्या सारख्या काही मुलांमुळे दर महिन्याला न घेता दर आठवड्याला भरवल्या गेल्या असत्या आणि आमच्या मातोश्रींनी तिथेच १५ मिनिटे मला उभे केले असते. दर आठवड्याला शाळेत विसरलेल्या वस्तूंमुळे खाल्लेला मार आणि त्या परत आणण्यासाठी पितृपक्षाकडून झालेली बोळवण कसा विसरू शकेन. काही शिक्षकांनी जितका मार दिलाय तितकेच प्रेम आणि संस्कारही दिलेत. रानडे सर, कुलकर्णी सर, भंडारी सर, महाजन सर, शिंपी सर, कुलकर्णी बाई, बर्वे बाई, पळधे बाई, टांकसाळे बाई, अत्रे बाई, गोखले बाई, महाजन बाई, संगीत शिक्षिका दाणी बाई, शिवणकाम शिक्षिका साखरे बाई (यादी बरीच मोठी आहे) यांच्या सारख्या अगणित शिक्षकांनी आमचे जीवन समृद्ध करण्या साठी जि धडपड केली आहे, जे अतोनात कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. त्यावेळी चालू असलेल्या विद्यार्थी दशेमुळे कदाचित ते क्लेशदायक, निरर्थक वाटत असले तरी आता आयुष्यातल्या अनुभवाने उमगले कि सगळे गुरु निष्णात होते, भरभरून ज्ञानदान करत होते पण त्यांच्या कडून आत्मसात करायला कुठे तरी कमी पडलो.

Anuvina-parentsMeet-border

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ५

शाळेची बस निघून गेली आणि तिच्या बरोबर घाईत असणारे पालक पण निघून गेले. आता वर्गात १०-१५ निवडक पालक आणि समोर त्यांच्या शंकांचे निराकरण करणारा शिक्षक वर्ग इतकेच जण होते. एक एक पालक आपापल्या मुलांच्या प्रगतीच्या अनुषंगाने त्यांच्या शंका विचारत होते पण शेवटी सूर तक्रारीचाच असायचा. पालकांचे संदर्भ आणि त्यावर शिक्षकांचे निरुपण उत्तम चालले होते. पालक आणि शिक्षकांचे संवाद ऐकल्यावर वाटलं की सगळी कडे चित्र जवळ जवळ सारखंच आहे. काही पालक विशेषतः “मातृ”खाते चेहेऱ्यावरूनच त्रस्त वाटत होतं आणि “पितृ”खाते पिडीत(मुलांना आणले नव्हते नाहीतर ते निश्चित शोषित वाटले असते). व्यक्ती, प्रकृती हाच काय तो फरक. सगळ्या शिक्षिका एखाद्या मानसोपचार तज्ञ असल्या प्रमाणे समुपदेशन करत होत्या. मुलं खात पीत नाहीत, ऐकत नाहीत, हट्ट करतात, लक्ष देत नाहीत असे सर्वांगीण प्रश्न होते. आता यात त्या गुरुमाउली काय करणार हा माझ्यासाठी एक अभेद्य प्रश्न होता. काही आशयपूर्ण आणि काही निरर्थक प्रश्नांनी माझी मात्र करमणूक होत होती. एकूण काय तर कुटुंबामध्ये कसलाच समन्वय नाही, संवाद नाही. चालू होती ती निव्वळ ओढाताण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीची खेचा खेच. विचारात गढून गेलेल्या माझ्या मेंदूने मझ्यातला युरेका जागवला आणि मी कोण आहे कुठे आहे आजूबाजूला काय चालू आहे याचा विचार न करता दोन्ही हातानी टाळी वाजवली. आरती करताना देखील माझ्या टाळीचा आवाज माझ्या व्यतिरिक्त कोणालाच ऐकायला जात नाही पण नेमका त्या वेळी मात्र जोरदार आवाज झाला आणि परत एकदा उपस्थितांच्या नजरेच्या केंद्रस्थानी मी होतो.

“Do you want to say something? You don’t need to clap, just raise your hand” असं कुठल्या तरी बाई म्हणाल्या. पुढे किती तरी वेळ माझे कान फक्त उघडे होते आणि डोकं खाली करून बसलो होतो. काही असेही होते ज्यांना आपल्या मुलाची प्रगती/अधोगती जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यावर शिक्षकवर्गाचे आभार मानून ते निघून गेले. आता मागे राहिलो आम्ही आणि अजून काही टाळकी. माझ्या बायकोने तिच्या पर्स मधून एक मोठा कागद काढला. त्यावर बरेच प्रश्न लिहिलेले होते.बायको नुसती नट्टापट्टा न करता पूर्ण तयारीनिशी आलेली बघून मी अगदी सदगदित झालो. मी म्हटलं “मी पण दिले असते २-४ प्रश्न”. ठसक्यात उत्तर आले. “मला माहित आहे तुझे प्रश्न काय लेव्हलचे असू शकतील. मी सगळेच यात कव्हर केले आहेत.” मी परत प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने हात वर केला. तितक्यात त्या सायन्सच्या टीचर कोमोली मुखर्जीनी आम्हालाच विचारले “आर्यांचे पेरेंट्स ना?” आणि जो होवू नव्हे तो गोंधळ झाला, बोटांचे चाळे करत असलेल्या आर्यांच्या हातावर बसणारी चापट माझ्या हातावर बसली. दबक्या आवाजात आर्याला दामटवत असताना बायकोचा नेम आणि टार्गेट दोन्ही चुकले होते. आमची ही धडपड बघून वर्गात खस खस पिकली नसती तरच नवल. आणि त्यातच बायकोच्या चेहेर्यावर “नेहेमीचीच शोभा करून घेता (म्हणून मी तुला कुठे नेत नाही)” असे भाव. इतक्यात तिच्या मुख्य वर्गशिक्षिका म्हणाल्या “तुमची मुलगी अतिशय बडबड करते आणि त्यामुळे इतर मुलांचे लक्ष वेधून घेते. एका जागी शांत पण बसत नाही.” मी सॉलिड खुश इतका कि मी माझ्या चेहेर्यावरचे भाव लपवता लपवू शकलो नाही. … चला, निदान हा गुण तरी बापाच्या गुण(सुत्रातून) आलेला आहे. आणि नेमके उलट भाव माझ्या बायकोच्या चेहेर्यावर. ती काही बोलणार इतक्यात मीच विचारले “पण मग अभ्यासाचे विचारल्यावर उत्तरे देते ना?” पलीकडून उत्तर “हो” आले आणि (आम्ही बसलो होतो तिकडच्या) वातावरणात थोडा गारवा आला. “अहो काय सांगू … ती इतकी गोड बोलते ना … आम्ही घरी गप्पच मारत असतो. फुल धुमाकूळ आणि करमणूक असते …. आमच्या घरात आम्ही तिला FM ची बालवाहिनी म्हणतो …. ह्या ह्या ह्या” या माझ्या वक्तव्याची शिक्षा लगेच मिळाली. परत एकदा कोपर लागले आणि परत एकदा तोच दबका आवाज तिच्या अंतरात्म्याकडून आलेला “आता मिटिंग होई पर्यंत तू काहीच बोलायचे नाहीयेस”.  एक भयाण शांतता आणि माझ्या कानात मुलीची कुजबुज “आई जाम भडकली आहे …. बाबा आता तू काहीच बोलू नको”. शक्य तितके करुण भाव चेहेर्यावर आणण्याचा प्रयत्न करत मी पुढील संभाषण ऐकू लागलो.

माझ्या पत्नीने सगळे प्रश्न आणि (कु)शंका एका डायरी मध्ये लिहून आणल्या होत्या त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांचे निराकरण झाले होते. मुलीची एकंदरीत शिक्षण आणि अवांतर विषयांमधील प्रगती विचारली. त्यांच्या उत्तराने बायकोचे समाधान झाले असणार कारण शेवटी निर्वाणीचा प्रश्न आला “तुम्ही जी शाळेत शिस्त लावता किंवा अभ्यास करून घेता या व्यतिरिक्त आम्हीअजून काही करायला हवय का?” टीचर म्हणाल्या “तिला रोज १५ मिनिटे एका जागी न बोलता न हालचाल करता उभं करा. इथे आम्ही इतक्या लहान मुलांना असे करू शकत नाही” आणि माझ्यातला बाप जागा झाला. “चंचलपणा तिचा स्वभावगुण आहे. वयोमानापरत्वे तो कमी होईल. तिची काही चूक झाली असेल तरीही आम्ही उगीच मारझोड न करता तिला योग्य ती शिक्षा करतो. ती शांत बसत नाही म्हणून मी तिला सक्तीने अजिबात उभी करणार नाही आणि ती जितकी चंचल आहे तितकीच समजूतदार देखील. आमचा धाक, आमची जरब हे केवळ नजर आणि आवाजाने ठेवतो. तिच्या अभ्यासात काही कमी असेल तर जरूर सांगा आमच्या कडून आम्ही योग्य तो प्रयत्न करू. मला एक आठवड्याची मुदत द्या ती वर्गात तास चालू असताना कुणाशीही गप्पा मारणार नाही आणि इतर मुलांचे लक्ष पण वेधून घेणार नाही …. पुढच्या मिटिंगच्या वेळी आपण या वर परत चर्चा करू किंवा आढावा घेऊ .. पण आपण सांगत असलेला उपाय मला मान्य नाही” वर वर वेंधळा बावळट अशी माझी प्रतिमा गेल्या अर्ध्या तासात झाली असल्याने कदाचित अश्या परखड, सडेतोड प्रतिक्रियेची अपेक्षा ना बायको ने केली होती आणि ना ही त्या शिक्षक वर्गाने. मुलगी खुश … बापाने आपली बाजू सांभाळून घेतली म्हणून. तरी देखील मी माझ्या बायको कडे बघण्याचे टाळले फक्त एवढेच जाणवले कि ती हात मात्र झटकत होती. (असणारच ना कारण या वेळी कोपर मारता आले नाही, संभाव्य धोक्याच्या जाणीवेने मीच एका हाताने घट्ट पकडून ठेवले होते.) प्रसंगावधान राखून बायकोने पुढील प्रश्न जास्त वेळ न लावता विचारून घेतले आणि मला काही बोलायची वेळच आली नाही.

(क्रमशः)