देवराई

(नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाचे प्रयोजन साधून भूतकाळात निसर्ग सानिध्यात घालवलेले काही हिरवेगार क्षण आठवले … ते आपणांपुढे मांडत आहे.)

१९९८ साली B.N.H.S. डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार “देवराई संवर्धन” या विषयावर काम करण्याचा योग आला. मी, डॉ. उमेश मुंडले आणि डॉ. अजित अणेराव असे तिघे जण या प्रोजेक्ट वर काम करत होतो. तसा “देवराई” हा विषय आमच्या साठी नवीनच होता. काम चालू करण्या आधी पूर्वी या विषयावर कुणी कुणी संशोधन केले होते त्याचे संदर्भ गोळा केले. प्रा. माधव गाडगीळ आणि डॉ. वर्तक हे या विषयातील संशोधनाचे प्रवर्तक मानले जातात. १९७० च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ २५० देवरायांची नोंद केली होती. यातील बहुतांश देवराया या पश्चिम घाट, कोंकण या भागात होत्या. तशी देवराई ही संकल्पना पूर्ण भारतात तसेच जगाच्या काही भागात जिथे जुनी संस्कृती टिकून आहे अश्या भागात आढळते. या व्यतिरिक्त “देवराई” वर विशेष संशोधन झाले नसल्यामुळे किंवा जी माहिती उपलब्ध होती ती कालबाह्यते मुळे परत नव्याने नोंदी करायचे ठरले आणि आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो.

देवराई हा विषय थोडा वेगळा, जुन्या समजुती, जंगलातील देवता, देव देवस्की अशा अनेक समजुतींमुळे कुतूहल जागृत करणारा. अशातच अवघ्या महाराष्ट्रातील देवरायांची नोंद करण्याचे आणि त्यातील काही प्रातिनिधिक देवरायांचा अभ्यास करण्याचे काम आम्हां सगळ्यांसाठी thrilling होते. जुन्या नोंदी आणि सरकारी कागदपत्रे यांची मदत घेउन २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या देवरायांची सूची बनवली आणि त्याचे पडताळणी करण्याचे काम चालू केले. देवराई मधील देवता, त्यांच्या बद्दल असलेल्या रुढी, परंपरा, त्याच्याशी निगडीत असलेल्या श्रद्धा/अंधश्रद्धा खरंच थक्क करणाऱ्या आहेत. अगदी ढोबळ भाषेत सांगायचे झाले तर देवराई म्हणजे देवाची राई, अर्थात देवासाठी राखलेली जमीन, त्या जमिनी वरील झाडे, दगड माती … अगदी कण अन् कण देवाचा, देवाच्या मालकीचा. काही ठिकाणी देवराईला देवबन, देवरहाटी असे देखील म्हणतात. देवराईच्या रुढी, परंपरा अजूनही पिढी दर पिढी जपलेल्या आहेत. या संकल्पनेचे मूळ हे वेदिक संस्कृती पासून असावे असे जाणकारांचे मत आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात, खेड्यात देवस्थानाची, विशेषतः ग्रामदेवतेची लहान मोठी जमीन असते. पण म्हणून या सगळ्याच जमिनींना देवराई म्हणता येणार नाही. एखाद्या जमिनीवर देऊळ बांधून आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणणे हास्यास्पद ठरेल. देवराईच्या अस्तित्वाला, संवर्धनाला आणि ऱ्हासाला देखील कित्येक पिढ्या साक्षी आहेत.

देवरायांचा अभ्यास करता करता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एखाद्या परिपूर्ण अश्या परीसंस्थेतील(ecosystem) जैवविविधता(biodiversity). इथे आढळणारे प्रत्येक वनस्पती अस्सल भारतीय, इथल्याच मातीत उगम असलेली. निबिड घनदाट अश्या वृक्षराजींनी नटलेली एखादी देवराई पहिली की पुराणातील गोष्टींमधील अरण्य कसे असू शकेल याची कल्पना येते. देवराईतील देवळापर्यंत जाणारी एखादी पायवाट सोडली तर इतरत्र सगळी कडे माजलेली अजस्त्र झाडे आणि मस्तवाल वेली दिसून येतात. अंबा, फणस, जांभूळ, ऐन, साग, किंजळ यांचा आकार बघितला तर विश्वास बसत नाही. वड, पिंपळ आपल्या पारंब्यानी अख्खी राई कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पारंब्यांच्या विस्तारामुळे कधी कधी नैसर्गिक मांडव तयार झालेला असतो.एखादे माडाचे झाड सूर्यप्रकाशाच्या ओढीने सरळ वाढण्याचा बाणा सोडून नागमोडी वळणे घेत वाट काढत असतं. Gnetum, Entada सारख्या अजस्त्र वेलींचे झुले झालेले असतात. अश्या धष्टपुष्ट झाडांवर बांडगुळे, ऑर्किड्स दिमाखात वसाहत करून रहात असतात. झाडांच्या खोडांना चिकटलेली दगडफुले तेथे असलेल्या १००% शुद्ध वातावरणाची ग्वाही देतात.

या सगळ्यांमधून कानाला गोड वाटणारे पक्षांचे गुंजारव चालू असते.मधूनच कुठे तरी रातकिड्यांचा कर्कश्य आवाज काळजाचा थरकाप उडवून जातो. विविध आकाराचे कीटक टणाटण उड्या मारत असतात. नाना रंगांची फुलपाखरे फुलांचे माधुर्य चाखण्यात मग्न असतात. कुठेतरी झाडांच्या जाळीमधून राजनर्तकाची जोडी आपले नृत्य कौशल्य दाखवून जाते. एखादा पिंगळा झाडाच्या फांदीवर बसून धीरगंभीर नजरेने बघत असतो. सुतार पक्ष्याची चोच झाडाच्या खोडावर टक टक आवाज करत असते. कुठेतरी एखादी सुगरण आपलं अपूर्ण राहिलेलं घरटं पूर्ण करण्यात मग्न असते. जवळपास जर पाणवठा असेल तर मासेमारी करून दमलेला खंड्या क्षणभर विश्रांतीसाठी येतो.असे एक ना अनेक जीव या परीसंस्थेचा उपभोग घेत असतात. हे सगळं बघताना तेथील समृद्धीचा आणि संपन्नतेचा हेवा वाटल्याशिवाय रहात नाही. सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. अश्या ठिकाणी किती वनसंपदा असू शकते याचा अंदाज येतो. वर्षानुवर्षे राखलेल्या या देवराया म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची निसर्गदत्त स्थाने आहेत.

देवराई: संकल्पना
देवराईचे मूळ वैदिक संस्कृती पासून असल्याचे जाणवते. पुराणकाळापासून असलेले मानव आणि निसर्गाचे नातेसंबंध इथे प्रकर्षाने जाणवतात. देवराई या संकल्पनेचा उगम कसा आणि केंव्हा झाला या बद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभाच हा श्रद्धा या नाजूक विषयावर बेतला असल्याने तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात. अश्मयुगीन माणसाला जेंव्हा शेतीचे महत्व कळू लागले तेंव्हा लागवडी योग्य शेतजमीन निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगल तोड झाली असावी. त्यावेळी सुद्धा तत्कालीन मानव बहुतांशी जंगलावर निर्भर होता. शेती मध्ये कितीही उत्क्रांती झालेली असली तरी लाकूडफाटा, खाद्य, वनस्पतीजन्य ओषधे अश्या अनेक गोष्टींसाठी त्याला जंगलावरच अवलंबून राहणे भाग होते. तसेच मोकळ्या मैदानापेक्षा वास्तव्यासाठी  जंगल जास्त सुरक्षित असावे. आत्ता जसे भूखंड माफिया, बिल्डर नावाची मानवाची वेगळीच प्रजाती निर्माण झाली आहे तसेच त्या काळी “शेती माफिया” असावेत ज्यांनी शेतीसाठी वनसंहाराला हातभार लावला. अश्याच वेळी जंगलाचे महत्व जाणणारे देखील होते याची खात्री या देवरायांच्या अस्तित्वावरून जाणवते. मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला. त्यासाठी गणपती, श्रीराम, कृष्ण यांच्या सारख्या सौम्य देवतांचा वापर न करता देवी किंवा शंकर यांचे कडक आणि जहाल रूप दिले. या देवरायांतील देवतांची नावे पण विचित्र, झोलाई, कालकाई, वाघजाई, सोमजाई, वेतोबा, डुंगोबा, बापदेव, म्हसोबा अशी कधी न ऐकलेली. देवराईतील कुठल्याही साधन संपत्तीचा ह्रास झाला तर त्या देवतेचा कोप होतो. इतकंच काय पण बऱ्याच देवरायांमध्ये प्रवेश देखील निषिद्ध आहे. अश्या अनेक भ्रामक कल्पनांमुळे देवराया आपले अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचा इतका उत्तम आणि वैधानिक उपयोग आजपर्यंत कुठेही बघितला नाही.

अश्या देवरायांवर कित्येक श्रद्धा/अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या दंतकथा यांचा पगडा असल्याने आजही हे हिरवे तारकापुंज शाबूत आहेत. खरा प्रश्न हा आहे की अजून किती दिवस शाबूत राहतील? सध्याच्या आधुनिक विचारसरणी पुढे या पिढीजात रुढींचा टिकाव लागणे जरा कठीणच आहे. या आधुनिकीकरणाचे पडसाद हळू हळू दिसू लागले आहेत … देवरायांचे क्षेत्र, विस्तार कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तिथे आढळणाऱ्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशी जंगले एका दिवसात किंवा एका वर्षात उभी राहू शकत नाहीत तर ती एक मुक्त प्रक्रिया आहे वर्षानुवर्षे चालणारी. सामाजिक वनीकरण हा एक उपाय असला तरी तो जबरदस्तीने लादलेला आहे त्याला नैसर्गिक संवर्धनाची सर नाही. जैवविविधतेने समृद्ध अश्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्याची, देवराया आणि आपली वनसंपदा वाचवण्याची.

(वरील लेख कुठलीही शास्त्रीय माहिती देत नाही याची वाचकांनी नोंद घावी. कुणी जाणकाराने काही मार्गदर्शन केले तर हा लेख अजून चांगला आणि शास्त्रशुद्ध बनवता येईल. या लेखातील माहिती बद्दल कुणास काही आक्षेप असल्यास कृपया coolgrahica at-the-rate gmail dot com वर कळवावे.)

डॉक्टर डॉक्टर

नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले. माझ्या असंख्य मित्रांच्या मते ‘मि बऱ्याच गावचे पाणी प्यायले असल्या कारणाने मला कुठल्याही पाण्याचा त्रास होणे निव्वळ अशक्य आहे’. असो …. या मत मतांतरात न शिरता सद्य परिस्थिती म्हणजे माझा दुखरा घसा आणि त्यामुळे कुठल्याही पट्टीत न बसणारा खर्जातला आवाज.

बायको स्वयंपाक घरातील भांड्यांची अवराआवर (आदळआपट) करता करता तार सप्तकात ओरडली “ती नवीन डॉक्टरीण आलीये ना तिला फोन करा आणि घसा तपासून या”. बायकोची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या नवीन डॉक्टरीणबाईला फोन लावला. या नवीन डॉक्टरीणबाईचा जास्त भर डिस्पेन्सरी मध्ये रांगेत बसलेल्या पेशंटना तपासण्या पेक्षा ”होम विझिट’ वरच जास्त …. फी जास्त मिळते ना, म्हणून असेल कदाचित. चांगला चार पाच वेळा एंगेज लागल्यावर एकदाचा फोन लागला. पलीकडून “हलो, कोण बोलतंय” इतका गोड आवाज ऐकून मि जरा ‘हललोच’ …. मि आपलं माझं नाव गाव सगळं थोडक्यात सांगितलं. “ओह म्हणजे त्या भातखंडे काकुंचे मिस्टर का? काय होतंय??? थ्रोटचा त्रास होतोय का काका तुम्हाला?” हे बहुदा माझ्या खरखरीत आवाजावरून केलेलं निदान असावं. मि म्हटलं “हो, कालपासून जरा घसा दुखतोय आणि गिळताना त्रास होतोय. केंव्हा येऊ तपा….” माझे पुढील वाक्य अर्धवट ठेवत डॉक्टरीणबाई मंजुळ आवाजात म्हणाल्या “नको नको … तुम्ही कशाला त्रास घेताय मीच येते तिथे.” “अहो. माझा घसा दुखतोय. पाय शाबूत आहेत अजून” मि नाराजीनेच म्हणालो. कारण केवळ घसा तपासण्यासाठी या बयेला जास्त फी देण्याची माझी इच्छा नव्हती. डॉक्टरीणबाई कृतज्ञता पूर्वक म्हणाल्या “काका, मि शेजारच्याच बिल्डिंग मध्ये शरद कुलकर्णी कडे आलेली आहे. जाता जाता तुमच्याकडे येते” चायला …. तो कुलकर्ण्या माझ्याच वयाचा आणि मि “काका”. असो, मि या म्हटलं आणि फोन बंद केला. आत मधून बायको त्या डॉक्टरीणबाईची तारीफ करत होती …. गुणाची आहे, घरी येउन तपासून गेली तरी तितकेच पैसे घेते … वगैरे वगैरे. तितकेच पैसे घेते हे वाक्य माझ्यादृष्टीने महत्वाचे.

दहा मिनिटात डॉक्टरीणबाई बाई दारात हजर. आल्या आल्या मला बेड वर झोपण्याची आज्ञा केली. आपल्या ब्यागेतून स्टेथोस्कोप काढून कानाला लावला आणि त्याची ती ठोके ऐकायची चकती छाती वर ठेवली. मग तीच चकती न उचलता सरकवत सरकवत पोटावर ठेवली. पोटावरून सरकवत सरकवत थेट घश्यावर दोन्ही बाजूला लावली. चकतीच्या प्रत्येक हालचाली वर मि चकित होत होतो. आज पर्यंत कुठल्याही डॉक्टरने ती चकती माझ्या हृदयाव्यातिरिक्त कुठल्याही अंगाला टेकवली नव्हती. मि माझ्या कापऱ्या आवाजात म्हटलं “डॉक्टर …. तिथे ती चकती लावून काय कप्पाळ कळणारे …. त्याने हृदयाचे ठोके तपासतात” तसं ती गोड आवाजात म्हणाली “तुम्ही शांत राहा. मि डॉक्टर आहे मला माहित आहे कुठे चेक करायचं ते. आणि हा स्पेशल स्टेथेस्कोप आहे. यातून सगळं कळत” माझी बायको ती डॉक्टर मला कशी तपासत आहे हे बघून बाजूलाच हसत उभी होती. त्यामुळे पाहिजे तिथे ती चकती फिरवून झाली आणि तिने माझे ब्लडप्रेशर चेक करण्या करता वेगळंच काहीतरी उपकरण बाहेर काढले. माझ्या मनगटावर ते ठेवून एका हाताने माझी नाडी हातात धरली. आता या बाईला माझी नाडी तळहातावर कुठे सापडली ते तो धन्वंतरीच जाणे.

कुठलीशी छोटी बाटली बाहेर काढून त्यातले दोन थेंब माझ्या घशात टाकले आणि विचारलं “आता कसं वाटतंय?” परिस्थितीत काहीही फरक पडला नसला तरी “जरा बरं वाटतंय” असं म्हणावं लागतं कधी कधी. परत एकदा तो स्टेथोस्कोप माझ्या घश्यावरून फिरला. स्टेथेस्कोप बाजूला काढून ठेवून ती बया म्हणाली “घसा कापावा लागेल” मि त्या आवाजात देखील किंचाळलो “घसा कापावा लागेल?? अहो काही तरीच काय डॉक्टर??” बायको बाजूला उभी राहून हसतच होती. डॉक्टरीणबाईने हातात एक छोटी कात्री घेतली आणि मला दाखवत म्हणाली “काळजी करू नका. अजिबात दुखणार नाही, रक्त पण येणार नाही” मि म्हटलं “निदान अनेस्थेशिया तरी द्या”. “ते काय असतं?” डॉक्टरच्या या प्रश्नाने मला भूल द्यायची अजिबात गरज पडली नाही. डॉक्टरीणबाईनी घश्याला कात्री लावली. खरंच दुखलं नाही …. “मि म्हणालो रक्त येतंय का बघा जरा” तर त्या बयेने कापसाच्या ऐवजी माझाच कळकट रुमाल जिथे कात्री लावली होती तिथे ठेवला आणि मला म्हणाली “५ मिनिटे धरून ठेवा …. सोडू नका अजिबात … आता झालं … मि जाते” मि म्हटलं “अहो जे कापलं आहे ते निदान शिवा तरी”. डॉक्टर माझ्या पत्नी कडे बघून म्हणाल्या …”तुम्ही मशीन वर शिवता ना? मग यांचा घसा तुम्हीच शिवून टाका. आता माझी फी द्या … १५० रुपीज.”

तिच्या हातावर ते पैसे ठेवले आणि तिला तशीच उचलून मांडीवर घेतलं … बायको बाजूला उभी राहून हसतच बघत होती. मि तिचे दोन चार मस्त पापा घेतले तशी ती माझ्यावर ओरडली “सोड मला…. मम्मा सांग ना बाबाला …. आत्ताच मि त्याला तपासलं आणि त्याच्या घशाचे ऑपरेशन केलं … मग ठरल्या प्रमाणे त्याने मि जाई पर्यंत झोपून राहायला हवं ना? …. याला ‘डॉक्टर डॉक्टर’ खेळताच येत नाही.” असं म्हणून मि आणि माझी बायको, आम्ही दोघे आमच्या अवघ्या ६ वर्षाच्या डॉक्टर लेकीवर प्रचंड हसलो. बायको म्हणाली “चला आता नेहेमी प्रमाणे तुमची मस्ती झाली असेल तर जेवायला बसूया. तिला काय …. तिची सुट्टी चालू झाली आहे तुला ऑफिसला जायचंय उद्या.”

मित्रांनो, अश्या असंख्य गमती जमती या लहान मुलांबरोबर होत असतात. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर अशी द्वाड मुलगी असेल तर शीण कुठल्या कुठे निघून जातो. जसा आमरस कितीही गोड असला तरी चवीपुरता मिठाचा दाणा लागतोच तसंच या गमती जमाती मध्ये देखील चवीपुरते काही काल्पनिक संदर्भ जोडले आहेत ते चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेलेच असतील.

एका पुणेकराची मुलाखत

(या लेखाचा कर्ताकरविता कोण ते अज्ञात आहे. कुणास या संबंधी माहिती असल्यास जरूर कळवावे म्हणजे इथे त्या महान लेखकाचे नाव देता येईल)

मूळ लेखन: http://www.nirankush.in/2010/01/blog-post.html (द्वारा अनिकेत वैद्य)

————————————————————————————————————–

एका पुणेकराची “पुण्यातील वाहतूक” या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

१) तुम्ही कोणते वाहन चालवता ?
पुणेकर – कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे.

२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
पुणेकर – आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास !

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर – आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, “बापाच्या पैशावर मजा मारतात साले”, तरुणी/बाई असेल तर, “या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.”. म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, “या वयात झेपत नसताना गाडी चालवायची कशाला ?” असा शेरा तयार असतो.

४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर – वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात.
करू दे.

५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?
पुणेकर – महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ?

५) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ?
पुणेकर – तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका.

६) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?
पुणेकर – ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात. दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही. पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते.

७) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ?
पुणेकर – पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला कळते.

८) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ?
पुणेकर – पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. “२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात एवढे काय” असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

९) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ?
पुणेकर – आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद  विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील.

१० ) तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ?
पुणेकर – काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच.