हैद्राबाद बॉम्बस्फोट आणि प्रश्न

काल संध्याकाळी घरात पाउल टाकतो न टाकतो तोच माझी चिमुरडी पोरगी धावत आली. “बाबा तुला माहितीये का??? हैद्राबाद मध्ये २ बॉम्बस्फोट झाले. बरीच लोकं देवाघरी गेली”. बॉम्बस्फोट झाल्याच्या बातमीने मी हादरलोच (खरं तर बॉम्बस्फोटाच्या मानसिक संवेदना त्याच दिवशी मेल्या जेंव्हा मुंबई मध्ये दहशतवाद्यांनी अमानुष बॉम्बस्फोट घडवून आणले.) पण जास्त धक्का बसला तो ‘ही बातमी माझ्या ७ वर्ष वयाच्या मुलीने दिली’ याचा. अश्या मुलीने, जीने अजून तरी “देवाघरी जाणे” हे प्रत्यक्षात बघितलेले नाही इतकेच काय तर साधा दिवाळीतला बॉम्ब देखील फोडला नाहीये. या बातमीने तिच्या कोवळ्या मनात नको ते कुतूहल जागं केलं. प्रत्येक घरात जिथे लहान मूल आहे तिथे हे प्रश्न पडले असणार. हा वेगळा बॉम्ब कुठला? हे दहशतवादी कोण? ते कुठे राहतात? पण मग इंडिया मध्येच का बॉम्ब फोडतात. त्यांना हाकलवून का देत नाही? पोलीस काय करतात? फाशी म्हणजे काय? तू का नाही काही करू शकत?(या वयातल्या मुलांसाठी त्यांचा बाप म्हणजे सर्वशक्तिमान व्यक्तिमत्व…पण या सगळ्या प्रश्नांपुढे ती प्रतिमा किती फोल आणि फसवी असते हे कोण सांगणार?)

या बातमीच्या अनुषंगाने आता तिच्या मनात घर करून असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागणार होती. ती दिली … अगदी तिला ज्या पद्धतीने समजेल आणि मला ज्या पातळीवर जाऊन समजावता येईल त्या पद्धतीने. मग Good Boy/Bad Boy, बॉम्ब, या बॉम्ब ने माणसे का मरतात ई.ई. तिला समजेल असं सांगून झालं. तिच्या बौद्धिक स्थितीचे समाधान झाल्यावर ती तिची खेळायला लागली. एखाद्या घटनेचं गांभीर्य ज्या वयात नसावं अशी अपेक्षा असते त्याच वयाची ती माझी पोर. आई बाबांच्या आजी आजोबांच्या कवचात सुरक्षित होती. पण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आणि कोवळ्या वयात पडणाऱ्या तिच्या प्रश्नांमुळे माझं मन मात्र अस्वस्थ होत होतं. बॉम्बस्फोट झाल्याच्या बातमीने नाही पण मुलीच्या प्रश्नांनी. अस्वस्थ करणारे तिचे प्रश्न…. इतक्या कोवळ्या वयात तिला पडलेले प्रश्न….. कधीही माग न सापडणारे प्रश्न….कायम पाठ पुरवणारे प्रश्न.

असे प्रश्न माझ्या बालवयात नव्हते … कधीच नव्हते. बॉम्ब म्हणजे केवळ सुतळी बॉम्ब … दिवाळीत वाजवण्याचा… ज्याने प्राण हानी होण्याचे प्रसंग खुपच कमी. साधा दिवाळीतला बॉम्ब कसा बनवतात हे माहित नाही तर खराखुरा माणसे मारणारा घातकी बॉम्ब कसा बनवतात किंवा का बनवतात याचं उत्तर गुगल महाराजांकडे देखील नसेल.

आमच्या वेळी स्त्री वर अत्याचार या एका शब्दावर बातमी संपायची. पण आता त्याच अत्याचाराला शब्दांचे पाय फुटले. त्याचे वर्गीकरण झालय …. विनयभंग, हुंडाबळी, बलात्कार, चारित्र्यहनन, भृणहत्या ….. अजून भविष्यात देखील होईल. मग यातला फरक काय? काय सांगणार तिला??? आणि कसं सांगणार? त्यासाठी आपल्या स्वतःला त्यातले बऱ्याच शब्दांचे खरे अर्थ माहित असावे लागतात ना. जुन्या चित्रपटातील प्रणय प्रसंग बघताना हक्काचा सीन म्हणजे फुलला फूल टेकणे, मंद संगीत चालू होऊन नायक नायिकेला मिठीत घेणं इतपतच. पण सध्यातर सध्या घरगुती धारावाहीकात देखील चुंबनापासून ते पार बेडरूमच्या बेड वर प्रणयक्रीडा दाखवल्या जातात. आता जो प्रकार समोर चालला आहे तो का? कश्यासाठी? याचे उत्तर काय ते सिरीयलवाले देणार?

कालमानानुसार पडणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप देखील बदललंय. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील माहित आहेत पण खंत याचीच वाटते की प्रश्न विचारणाऱ्याच्या पातळीवर जाऊन त्याची उत्तरे मिळत नसल्याची. भाबडेपणाने त्यांनी विश्वास ठेवावा आणि आपण त्यांचे बालपण वाचवण्यासाठी हातच राखून धादांत खोटं बोलावं. असे प्रश्न तर बरेच आहेत … अनेक अजाणत्या मनांना पडलेले. आणि त्याची उत्तरे म्हणजे रुतलेला काटा निघून गेलातरी आत सलत असलेल्या तुसासारखे, कायम वेदना देणारे.

मातृभाषादिनाचं चिंतन – अप्रतिम लेख

मनोहर राईलकर-railkar.m@gmail.com
Published: Thursday, February 21, 2013


आपापल्या मातृभाषेवर ‘निस्सीम’ प्रेम करणं म्हणजे दुसऱ्याही भाषा शिकणं, पण  प्राथमिक शिक्षणापासून विद्यापिठीय शिक्षणापर्यंत किंवा त्यापुढल्या ज्ञानव्यवहारात मातृभाषेचा उपयोग करणं.. तिच्यासोबत आपणही समृद्ध होणं. मराठीत अशा शिक्षणाची गरज वारंवार प्रतिपादन करणाऱ्या एका विद्वानानं, जगभरातल्या भाषांमधल्या प्रयोगांचा आणि लिखाणाचा आधार घेऊन काढलेलं हे विचार-सार..
पाकिस्तानचे गव्हर्नर  जनरल महमद अली जीनांनी २१ फेब्रुवारी १९४८ रोजी, ‘यापुढे पाकिस्तानात (पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेश धरून) उर्दू ही एकमेव अधिकृत भाषा असेल,’ असा आदेश काढला. खरं तर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील लोकसंख्या जवळजवळ सारखीच होती. आणि बहुसंख्यांची भाषा बंगालीच असलेल्या बांगलादेशातील जेमतेम सात टक्के जनतेला उर्दू येत होती. पश्चिम पाकिस्तानच्या जनतेनं या दंडेलीचा निषेध करून उठाव केला. आणि ढाक्याच्या विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी संप घडवला. सरकारनं संचारबंदी लागू केली. शांततापूर्ण सत्याग्रह चिरडण्याकरिता केल्या गेलेल्या गोळीबारात चार विद्यार्थ्यांचे जीवही गेले. या प्रसंगाच्या स्मृत्यर्थ प्रतिवर्षी २१ फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जावा, असं १९९९ मध्ये युनेस्कोनं अधिकृतपणे घोषित केलं आणि २००० पासून हा दिवस जगभर साजरा होता. पुढे १६ मे २००७ रोजी ठराव करून भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याला, बहुभाषिकतेला, उत्तेजन मिळण्याकरिताही प्रतिवर्षी २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जावा, असं ठरवलं.  बालकांचा शिक्षणाचा अधिकार या दृष्टिकोनातूनही मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित करून सर्वच देशांनी मातृभाषेतून शिकवण्याला उत्तेजन द्यावं, असं आम्ही सांगू इच्छितो, असंही युनेस्कोनं म्हटलं आहे.
बालकांचं प्रारंभीचं शिक्षण मातृभाषेतूनच होणं इष्ट असतं, याबद्दल तज्ज्ञांत कसलेही मतभेद नाहीत. जी भाषा समजतच नाही, तिच्यातून लिहावाचायला लावणं अनिष्ट आहे. उलट, जर आपण एका भाषेवर (आपल्याच) प्रभुत्व मिळवलं असेल तर दुसऱ्या भाषा शिकणं तुलनेनं सोपं जातं, असंही युनेस्कोचं म्हणणं आहे.
या पाश्र्वभूमीवर आपल्या देशात काय अवस्था आहे, हे पाहणंही आवश्यक ठरावं. काहींना वाटतं, आपल्या युवकांना चांगलं इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळं ते मुलाखतीत आपली छाप पाडू शकत नाहीत. काहींना वाटतं, इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही. त्याकरिता आपलं सरकार वनवासींनाही इंग्रजी माध्यमातून शिकवू पाहत आहे. काहींना वाटतं आपल्या भाषा विज्ञानाकरिता अजून सक्षम नाहीत. त्यामुळं माध्यम म्हणून त्यांचा अवलंब करता येणार नाही. स्वातंत्र्याची ६५ र्वष उलटून गेल्यावरसुद्धा आपल्या भाषा सक्षम का झाल्या नाहीत? एखादी भाषा विज्ञानाकरिता सक्षम आहे किंवा नाही हे ठरवण्याची गमकं कोणती? एखादी भाषा सक्षम आहे की नाही, हे कुणाच्या वाटण्यावर ठरतं काय?
एक स्वानुभव. मी एम.एस्सी.च्या वर्गाना अनेक र्वष गणित शिकवलं. वर्गात पुण्याबाहेरीलही विद्यार्थी असत. मुलांना शंकाही येणारच. मुलांनी वर्गात शंका विचारल्याच पाहिजेत. कारण तो त्यांचा अधिकार आहे, असं एक शिक्षक म्हणून माझं स्पष्ट मत आहे. पण, शंका विचारायला ती मुलं बुजत असावीत. म्हणून मी त्यांना सांगत असे, ‘तुम्ही अगदी मराठीत शंका विचारल्यात तरी चालेल.’ मुलांनी याचा लाभ घेतलाही. पदव्युत्तरसुद्धा गणित मराठीत बोलता येतं हे मला जाणवलं. त्यानंतर मी काही पुस्तकांचा मराठीत अनुवादही केला. त्यांपकी एकातलं गणित तर एम.एस्सी.च्याही पलीकडचं आहे. तरीही अनुवादात मला कसलीही अडचण जाणवली नाही.
या संदर्भात आणखीही दोन अनुभव नोंदले पाहिजेत. (अ) माझे एक मित्र डॉ. अरिवद बुचे नागपूर विद्यापीठाचे सांख्यिकी विभागप्रमुख होते, त्यांची पीएच.डी. रशियन विद्यापीठाची! मी त्यांना विचारलं, ‘रशियन शिकायला तुम्हाला किती र्वष लागली?’ ते हसले, ‘र्वष कुठली? सहा आठवडय़ांत शिकलो.’ (आ) १९६०-६१ या वर्षांत मी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम केला. एकूण २६ ते २८ आठवडे. आठवडय़ांत चार तासिका म्हणजे इन मिनतीन तास.  ८० तासच फ्रेंच शिकूनसुद्धा मला त्या भाषेतील गणिताची पुस्तकं वाचता येऊ लागली. फ्रेंचमधील इतर विषय मी कशाला वाचावेत? मूळ विषय पक्का असल्यावर आपल्या विषयापुरती नवीन भाषा, प्रौढ वयात समजणं कठीण जात नाही.
इतर साऱ्या देशांत आपापल्या मातृभाषांतूनच सर्व शिक्षण दिलं जात असून आपल्या भाषांना तशी संधीसुद्धा न देता केवळ इंग्रजीलाच वाव देऊन वर मराठी सक्षम नाही असं निर्लज्जपणे म्हणतात! यामुळं आपली प्रगती इतरांच्या जवळपासही जाणार नाही इतकी नगण्य असल्याचं अलीकडेच (४ ऑक्टोबर २०१२ आणि १४ डिसेंबर २०१२ ला) लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतून मी मांडलंही होतं.
मातृभाषेतून शिकवण्याचे काही लाभ होतात किंवा हानी होते, याबद्दलचं कसलंही संशोधन न करता, तथाकथित शिक्षणतज्ज्ञ मंत्री आणि शिक्षित पण अज्ञानी पालक इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करून आपल्याच बालकांचा छळ का करीत आहेत? सगळे अताíकक, अशास्त्रीय आणि निराधार निष्कर्षांचा जोरदार पुरस्कार का करीत आहेत? त्यातून अप्रत्यक्षपणे, एकीकडे आपल्या मातृभाषांची अवहेलना आणि दुसरीकडे मुलांचं, परिणामत: राष्ट्राचं नुकसान का करीत आहेत? पण, संशोधनाला किंमत न देता लोकप्रिय लाटेबरोबर वाहत जाणंच आपण स्वीकारतो, असं दिसतं.
मी आणखी तीन पुरावेही देतो. (अ) १९१६ साली मुंबई विद्यापीठानं इतिहासाची परीक्षा मातृभाषांतून देण्याला अनुमती दिली. १९१९ साली आढावा घेण्यासाठी नेमलेल्या डॉ. म. रा. परांजपेंच्या समितीनं परीक्षकांना प्रश्नावली पाठवली. ‘ज्यांनी मातृभाषेत उत्तरं लिहिली त्यांना विषय कळला होता. आणि इंग्रजीत लिहिलेल्यांनी घोकंपट्टी केली होती,’ असं परीक्षकांनी एकमुखानं सांगितलं. (आ) डॉ. अ. रा. कामत यांनी केलेलं पदवीपूर्व परीक्षांच्या दहा वर्षांच्या परीक्षाफलांचं संशोधन गोखले राज्यअर्थशास्त्र संस्थेनं १९६९ मध्ये ‘वेस्टेज इन कॉलेज एज्युकेशन’ नावानं प्रसिद्ध केलं. पान १८९वरील कोष्टक पाहिलं तर, केवळ अर्थशास्त्र विषय आणि मुलींचा गट वगळता मातृभाषेत उत्तरं लिहिणाऱ्या मुलामुलींची टक्केवारी सर्वत्र अधिक असल्याचं दिसेल. (इ) १९७१ साली मा. शा.परीक्षा मंडळानं व्यवसायपूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या, मागील दोन परीक्षांतील कामगिरीचा शोध घेतला. मातृभाषेत शिकलेली मुलं टक्केवारीत शालान्त परीक्षेत पुढं होती. पदवीपूर्व परीक्षेत मागं पडली.. पण व्यवसायपूर्व परीक्षेत पुन्हा पुढं गेली! उच्च शिक्षणही मातृभाषेत असतं तर ही मुलं सदैव पुढंच राहिली नसती का?
आकलनाच्या मज्जाविज्ञानातील संशोधन पाहता ‘मानवाची लघुस्मृती अधिकतम १२ सेकंदच राहते,’ असं शिक्षणतज्ज्ञ हेलन अब्दाझींनी दाखवलं आहे. म्हणून एखादं व्याकरणदृष्टय़ा संपूर्ण वाक्य समजून घेऊन, त्याचं वर्गीकरण करून ते स्मृतिकोशामध्ये साठवण्यासाठी कुणालाही ते १२ सेकंदांतच वाचता यायला हवं. कार्यक्षम वाचनाकरिता माणसाला एका सेकंदात किंवा फार तर दीड सेकंदात एक शब्द, इतक्या वेगानं वाचता यायलाच हवं, असंही अब्दाझी आपल्या एका अन्य लेखात सांगतात. अधिक वेळ लागला तर, वाक्याच्या शेवटाला पोचेपर्यंत बालकाला आरंभाचाच विसर पडतो.
अपरिचित भाषेतील अक्षरांचा अन्वयार्थ लावण्याकरिता बालकांना कष्ट होतात, ते यामुळे. आवश्यक तितक्या वेगानं वाचता आलं नाही, तर अर्थबोधाऐवजी अक्षरबोध होण्यातच सगळी मानसिक शक्ती वाया जाते. अर्थाचं आकलन राहून जातं.
अब्दाझी झांबियातला अनुभव सांगतात :  पहिलीत मुलांना, स्थानिक भाषेसह इंग्रजीही शिकवलं जाई. काही शाळांनी पहिल्या इयत्तेत तोंडी आणि दुसरीपासून लेखी अशा प्रकारे इंग्रजी शिकवून पाहिलं. निष्कर्ष?
पहिलीची सरासरी, सपाटय़ात ५७५ टक्क्यांनी वर सरकली, दुसरीची २,४१७ टक्क्यांनी आणि तिसरीची ३,३०० टक्के इतकी वर गेली! त्याबरोबरीनं स्थानिक भाषेतील प्रगतीही सुधारल्याचं दिसून आलं. भारताकरिता हा प्रभावी वस्तुपाठ ठरावा.
(म्हणून इंग्रजी येणं महत्त्वाचं वाटलं तरी मातृभाषेत चांगलं वाचन-लेखन येणं त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. विशेषत: स्पेिलग आणि उच्चार या बाबतीत तर्काला पूर्ण फाटा असलेल्या अशास्त्रीय इंग्रजीपेक्षा ध्वनिप्रधान भारतीय भाषा आकलनासाठी शेकडो पटीनं श्रेष्ठ होत. – लेखक)
आशियातील सामाजिक भाषासमूहांमधील अडसर निवारण्याकरिता काम करणारे कर्क पर्सन आणि सेना ली २१ डिसेंबर २०१२च्या ‘बँकॉक-पोस्ट’ मधील लेखात म्हणतात : परिसराचं आकलन सहजपणे होण्याकरिता प्रत्येक बालकाच्या दृष्टीनं मातृभाषेचं महत्त्व अनन्य आहे. आरंभीच्या काळात मुलांना मातृभाषेतून शिकवण्यामुळं त्यांचं विषयाचं आकलन सर्वोत्कृष्ट होतं, असाच जगभरातील अनुभव आहे. तरीही पुष्कळदा, त्यांना माहीत नसणाऱ्या भाषेतून शिकवण्याचाच हट्ट धरल्याचं (आपल्यासारखा?) आढळतं. परकीय असली तरी बालकांनी त्याच भाषेतून शिकावं अशी सक्ती असते. पण, अपेक्षेनुसार गुण मिळू शकणाऱ्या मुलांची संख्या त्या परिस्थितीत, १५ टक्केसुद्धा नसते. बहुसंख्य बालकं, शरीरानं ती शाळेत असली तरी भाषेच्या अडसरामुळं खऱ्या शिक्षणाच्या बाहेरच फेकली जातात.
युनेस्को, युनिसेफ, विकासात सहभागी इतर संस्था, बहुभाषक राष्ट्रांना, शिक्षणात मातृभाषेचाच अवलंब करण्याची जोरदार शिफारस करतात. भाषिक अल्पसंख्याकांच्या बालकांनाही मातृभाषांतूनच शिकवणं ही चन नसून शैक्षणिक सोयीसवलती मिळण्याचा तो त्यांचा मूलभूत अधिकार होय. त्यातही दुसरी आणि आणखी काही भाषा शिकण्याकरिता सुद्धा मातृभाषेवर पुरेसं प्रभुत्व मिळण्याचाही त्यांचा अधिकार आहे. सारांश राष्ट्रभाषेवर (संपर्कभाषेवर) प्रभुत्व मिळवण्याकरितासुद्धा मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणं हाच राजमार्ग होय. इति युनेस्को.
विनंती : स्वतला, राष्ट्राला आणि साऱ्या जगाला मातृभाषेमुळं किती तरी महत्त्वाच्या संधी मिळतात, हे आंतरराष्ट्रीय मातृभाषादिनानिमित्त लक्षात घेऊन आणखीही भाषा शिका. आपल्या भाषांत इतरांना सहभागीही करून घ्या. पण आपापल्या मातृभाषेची महती कधीही विसरू नका. तिची कधीही उपेक्षा करू नका, अनादर वा अवहेलनाही करू नका.
लेखकाचा विरोप-पत्ता:
railkar.m@gmail.com

मूळ लेख

व्हॅलेंटाईनस् डे – उत्तरार्ध

valentines_Diguव्हॅलेंटाईनस् डे – पूर्वार्ध

संत व्हॅलेंटाईनस् च्या कृपेने चिंतातूर झालेला दिगू दुकानातून बाहेर पडला. पण आज घरी बायकोसाठी काहीतरी घेऊन जायचेच हा विचार काही केल्या मनातून जात नव्हता. ड्रेस? छे …चिक्कार झालेत …. कपाट उघडलं की कोसळतील इतके. साडी?? काय समजतं त्यातलं…उगाच काहीबाही घेऊन जायचं घरी आणि दुसऱ्या दिवशी बदली करून घायची. परफ्युम??? नको … महिन्या भरात संपेल. अर्धी बाटली झंपीच वापरेल. ज्वेलरी??? शुद्ध सोन्याची परवडणार नाही 😉 आणि खोटी … (अर्र्र्र्र्र्र्र्र खोटी कसली आर्टिफिशियल म्हण आर्टिफिशियल) ते पण शक्य नाही … कारण त्या साठी स्वतः “ती” असल्याशिवाय जमत नाही. कित्ती पर्यायांचा विचार करून झाला पण दिगुच्या मनातून प्रत्येकाला नकार घंटाच वाजत होती. अंतर्मन सांगत होतं “जा घेऊन काही पण …. बायको खुश होईलच … आजचा दिवसच असा आहे” …. पण नाही असं काहीही घेऊन जाऊन चालणार नाही ….तसं असतं तर ती उशी नसती का घेतली? मला क्यूट म्हणणारी ती ललना देखील खुश झाली असती ना.

नुसत्या विचारांनी थकलेला दिगू घरच्या वाटेला लागला. काहीच मिळालं नाहीतर वाटेत एखादे भेटकार्ड घेऊ … सुवाच्य अक्षरात “प्रिये … केवळ तुझ्यासाठी” वगैरे मजकूर लिहू आणि देऊ तिला. ती घेईल समजून आपल्याला. इतके वर्ष काहीही मिळण्याच्या अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम केलं तिने आपल्यावर. आपल्या वेंधळेपणावर, विसरभोळेपणावर कितीही बोल लावले तरी कुठलीही अवास्तव मागणी केली नाही किंवा त्यासाठी हट्ट पण केला नाही. प्रत्येक नाजूक क्षणी सावली सारखी उभी राहिली माझ्या मागे … वेळ प्रसंगी बायकोची मैत्रीण झाली, कधी आई लहान मुलाला समजावते तशी “माय” झाली. माझी सहचारिणी म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिलेली माझी बायको … तिला माझं प्रेम न बोलताच कळेल … माझी खात्री आहे … खरं तर गिफ्ट देणं वगैरे नंतरचं …. प्रेम तर कसंही व्यक्त करता येतं …. अगदी अव्यक्त रूपात सुद्धा. विचारांचा गुंता वाढत चालला होता पावले जड झाली होती.

Gajara“साहब … मोगरा लोगे. आज व्हॅलेंटाईनस् डे है. गजरा लेलो. आप के लिये १५ रुपया फुट देती हुं.” या एका चिमुरडीच्या बोलण्याने दिगू विचारातून बाहेर आला. त्याने त्या गजरे विकणाऱ्या मुलीकडे बघितलं. गजरे असलेली परडी जवळ जवळ रिकामी झाली होती. जे काही थोडे उरले होते ते विकून घरी जायचं होतं. दिगू काही न बोलताच तिच्याकडे बघत राहिला …. डोक्यात विचारांचे चक्र फिरतच होते. युरेका स्टाईल त्याच्या मनाने “गजरा” म्हटलं आणि डोळ्यात एक चमक आली. किती आवडतो तिला गजरा त्यात सुद्धा मोगऱ्याचा. तिने केसात माळलेल्या गजर्याचा सुगंध बराच काळ रुंजी घालत राहायचा. सकाळी सकाळी ती आरश्या समोर उभी राहून गजरा माळत असायची. तिच्या नकळत पाठीमागून तिला मिठीत घेऊन त्या मोगऱ्याचा गंध त्याच्या रोमारोमात दरवळला होता. हातात गजरा घेऊन त्याचीच अनुभूती दिगू घेत होता….अगदी समाधी लागली होती. साहेब हातात गजरा घेऊन, डोळे मिटून नुसताच उभा आहे … धंद्याची खोटी करत आहे हे बघून त्या मुलीने परत नाराजीनेच त्याला विचारले “साहब लेना है क्या? माल खतम करना है. लेना है तो बोलो.” या वाक्यांनी दिगुला भानावर आणले. “दे … दोन फुट. ताजे आहेत ना? उद्या सकाळ पर्यंत टिकले पाहिजेत” दिगू पाकिटातून पैसे काढत म्हणाला. “होय साहेब…. एकदम ताजे आहेत. टिकतील उद्या सकाळ पर्यंत.” पानाच्या पुडीत गजरा बांधत ती मुलगी म्हणाली. पुडी ब्यागेत टाकण्याच्या आधी मोगऱ्याचा सुवास मनात भरून घेण्याच्या इच्छेने दिगुने ती पुडी नाकाजवळ नेली. मोगऱ्याचा वास त्याच्या शरीरात रुळायला लागला. नकळत त्याचे ओठ त्या पुडीला टेकले. “हेच ते … जे आपण इतका वेळ शोधत होतो. काहीतरी वेगळं.” मनातील सगळं किल्मिष दूर झालं. करड्या रंगाच्या धुक्याची जागा परत गुलाबी रंगाने घेतली आणि आता त्याच्या जोडीला मोगऱ्याचा सुवास देखील होता.

कित्येक वर्षात ही अमुल्य भेट आपण आपल्या बायकोला दिलीच नाही. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कित्ती वेळा आपण तिच्या साठी गजरा घेऊन गेलो होतो. याच मोगऱ्याच्या साक्षीने वसंत फुलवले होते. मी गजरा आणत नाही म्हणून तिनेही घालणे बंद केले. कसं इतकं साधं आपल्या नजरेतून निसटून गेलं. पण गजरा हा नवऱ्यानेच आणून देण्यात वेगळीच मजा आहे. इतके वेंधळे की आपण हे पण विसरलो. असो. या एका पुडीने जुने दिवस जुन्या रात्री निश्चित जाग्या होतील. पण नुसता गजरा नाही घेऊन जायचं. त्या बरोबर कुछ मिठा तो होना ही चाहिये. एका दुकानासमोर थांबून तिला प्रिय असलेली “पर्क” घेतली. पूर्वी हीच पर्क तिने कधी लबाडीने तर कधी दांडगाईने सगळी गट्टम केली होती. आणि मग माझा राग जावा म्हणून दुसरी पर्क एकत्र खाल्ली होती (ओठांना ओठ लावून). या सगळ्या आठवणींवर स्वार होऊन दिगू घरी पोचला.

घरात शिरल्या शिरल्या झंपी येऊन दिगुला चिकटली. आज नेहेमी पेक्षा उशीर होऊन देखील बायकोने जाब विचारला नाही याचे दिगुला आश्चर्य वाटले. महत् प्रयासाने त्याने गजरा आणि पर्क आपल्या मुली पासून लपवून ठेवले. “उशीर झालाय … हात पाय धुवून जेवायला बस” असे बायकोचे मंजुळ शब्द कानावर पडले. कानावर विश्वास ठेवत दिगू सगळं आवरून जेवायला आला. ताटात प्रचंड आवडीचे गुलाबजाम बघून स्वारी एकदम खुश झाली. “तुला आवडतात म्हणून आज मुद्दाम घेऊन आले. बरेच दिवसात गुलाबजाम झाले नव्हते” काहीशी लाजत बायको म्हणाली. ऑफिस मधल्या गप्पांच्या जोडीने आजचे जेवण रंगात आले होते.

दमून भागून झंपी झोपी गेली. ज्या क्षणाची दिगू वाट बघत होता तो आला. बायको स्वयंपाकघरातील आवराआवर करून बेडरूम मध्ये आली. दिगुने हैप्पी व्हॅलेंटाईनस् डे म्हणत तिच्या ओंजळीत गजरा ठेवला. आज नको उद्या सकाळी घालते असं म्हणत असताना केवळ दिगुच्या आग्रहा खातर ती आरश्या समोर उभी राहिली. केसात मोगरा रुळायला लागला. दिगुने तिला पाठीमागून मिठीत घेतले … मोगऱ्याचा वास रोमारोमात भिनला. स्त्रीसुलभ लज्जेने तिने मान खाली करून त्याच्या छातीवर डोकं ठेऊन हळूच म्हणाली “आय लव्ह यु”. दोघांनी मिळून पर्क खाल्ली ….ओठांना ओठांचा स्पर्श करून …. सगळी बेडरूम मोगऱ्याच्या सुवासाने भारून गेली.  मोगऱ्याच्या साक्षीने पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मोगऱ्याचा सुवास, ओठांवरील पर्कचा गोडवा आणि दरवळणाऱ्या आठवणी हाच काय तो व्हॅलेंटाईनस् डे चा उत्तरार्ध ….. बाजारातील लाल बदामाच्या आकाराच्या उशी पेक्षा मुलायम …. नाजूक….चिरकाल आठवणीत राहणारा.