सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली असणार हे निश्चित. आमचे कपडे, विविध खायच्या वस्तू, चकणा आयटम्स, निरनिराळी पीठे, आम्ही नसताना घरात फुकट जातील म्हणून उरलेल्या भाज्या, कांदे बटाटे अश्या अनेक गोष्टीनी डिकी सजली होती. डीकीचा दरवाजा लावताना आत काहीतरी तुटल्याचा आवाज आला पण आतले रचून ठेवलेले समान पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल म्हणून उगीच रिस्क नाही घेतली. जाता जाता वाटेमध्येच उसनी आणलेली कर्नाळ्यातील कांदे भज्यांची भूक आणि पळीच्या सोड्याची तहान भागवली. डोंबिवली पासून नागाव मात्र १०० की.मी. असल्याने ३ तासातच इच्छित स्थळी पोचलो. हेमंतानेआधीच सगळी साफसफाई करून ठेवली असल्याने समान लगेच जागच्या जागी लावण्यासाठी शि.प्रि. नी कंबर कसली. दिवसभरात हळू हळू पाव्हणेरावणे जमू लागले. पुण्याहून माधुरी, अभिजीत आणि ओम आले. बोरिवली वरून ताई, मिलिंद आणि कलश आले आणि कोरम पूर्ण झाला. घर कसं फुलून गेलं आणि रात्री गप्पांना ऊत आला. सकाळी सकाळी माझ्या भाच्यांनी आणि मुलीने मला झोपेतून उठवण्याचा चंग बांधला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने खोड्या काढत मला उठवत होता. आणि जसा मी उठलो तसा “आजचा मेनू” अश्या अविर्भावात येत्या ५ दिवसात काय काय धम्माल या बच्चे कंपनीला करायची होती त्याचा पाढाच वाचून दाखवला. अगदी आंबे चिंचा गोळा करणे, बर्फाचा गोळा खाणे, शहाळी पडणे, हौदात डुंबणे, समुद्रावर फिरायला जाणे इथ पासून ते बैलगाडीत बसणे इथपर्यंत. त्यात बर्फाचा गोळा, हौद आणि समुद्र एकदम “अती महत्वाचे आणि अत्यावश्यक” या सदरातील. हे सगळे आणि अजून काही सुचेल ते आपण या सुट्टीत करायचे असे म्हटल्यावर एकच गलका झाला. आता इथे मामाच “राजी” म्हटल्यावर घरातला कुठलाही “काजी” काय बोलणार? तसंही घरातील समस्त महिला वर्गाने ढील दिली असल्याने सगळ्या बालक वर्गाचे पतंग हवेत मस्त बदत होते … आणि मी बदवत होतो.

हौद आधीच साफ करून ठेवला होता आणि पंप लावून हौद भरून घेत होतो. तर ही वानरसेना बोलावण्या अगोदर तयार. माझी मुलगी तर चक्क बिकिनी घालून “मुलांनो मारा उड्या” या आज्ञेची वाट बघत होती. तिघांनी हौदात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १२ वर्षाचा कलश त्याच्या पेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या ७ वर्षाची आर्या आणि ४ वर्षाच्या ओम ची छान काळजी घेत होता. त्यांचा खोडकरपणा बाहेर उभं राहून बघणं जीवावर आलं होतं आणि त्यातच या तिघांनी मला पुरता भिजवला असल्याने मी पण हौदात उतरलो. सकाळी ९ वाजता चालू झालेले हे रासन्हाण १२ वाजता या सगळ्यांची आजी अर्थात माझ्या मातोश्री हातात शिपटी घेउन आली तेंव्हा संपलं. संध्याकाळी समुद्रावर जाऊन धमाल केली. शंख शिंपले जमवले. वाळूचा किल्ला केला, नक्षी काढली, समुद्राच्या लाटांमध्ये सैरावैरा धावलो. समुद्रावरचा गोळेवाला आमच्या गल्लीतूनच जात असल्याने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले आणि बच्चे कंपनीने परत एकदा कल्ला केला “उद्या गोळा खायचा … उद्या गोळा खायचा”. समुद्रावरच इतकं खेळल्यावर अर्थात क्षुधाशमनार्थ भेळ आणि तृषाशमनार्थ थंडगार उसाचा रस ही मागणी देखील पूर्ण केली. दमून भागून माझी तिन्ही पाखरं गाढ झोपी गेली. सगळे इतके दामले असून देखील त्यांच्या चेहेऱ्यावर एक तजेला होता … स्थळ काळाचा परिणाम असेल कदाचित.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोळेवाला घंटानाद करत दरवाज्यात हजर झाला तसा पोरांनी “गोळा गोळा” म्हणत एकच गजर केला. थोरा मोठ्यांनी बर्फ आणि त्यात मिसळलेला गोड रस चुपून चुपून गोळा खाल्ला … इतकंच नव्हे तर सगळ्यांनी वरून रस मागून घेतला. मुलांसाठी चवीपेक्षा रंगाचे आकर्षण अधिक. कुणाला हिरवा, कुणाला गुलाबी लाल, कुणाला कालाखट्टा तर कुणाला मिक्स – अशी रंग आणि चवीची रेलचेल होती. मुलांनी अर्धे खाल्ले आणि अर्धे सांडवले आणि अंगणात सप्तरंगी बर्फाचा सडा पडला. बालगोपाळांचीच काय तर मोठ्यांच्या देखील काही ना काही मागण्या रोज पूर्ण करत होतो…नेम धरून आंबे चिंचा पडणं, शहाळी पिणं, अगदी बैलगाडीची रपेट पण मारून झाली. क्रिकेट, पत्ते याच बरोबर लंगडी, आबादुबी पण खेळलो. डुक्करमुसुंडी, विषामृत, डब्बा ऐसपैस, खांब खांब खांबोळी असे जागे अभावी लोप पावत चाललेले खेळ देखील शिकवले. खेळता खेळता मुलं पडायची धडपडायची पण उठून परत खेळायला सुरुवात…तिथल्या मातीचाच गुणधर्म असावा कदाचित. एक दिवस आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणले. नागावच्या आजूबाजूला बघण्या सारखी बरीच ठिकाणे असल्याने कुठे जायचे हा प्रश्नच नव्हता. सुंदर सुंदर देवालयं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग समुद्राच्या वाळूला खेटून उभी असलेली सुरुची बनं, जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. करमरकर याचं कलादालन, कोर्लईचा किल्ला आणि दीपस्तंभ, शितलादेवी,  नांदगावचा सिद्धिविनायक,  हे सगळं करता करता चौलचा दत्त, कनकेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, सागरगड, वंदरलिंगी, रामधरणेश्वर अशी जरा उंचावर असलेली ठिकाणे मात्र राहून गेली. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ही सगळी मुलं शहरात असताना पायात चप्पल नसेल तर घरच्या बाहेर पडणार नाहीत पण इथे माझ्या बरोबर रानावनात, शेतावर अनवाणी यायला देखील एका पायावर तयार होती. मला मिळालेल्या ४-५ दिवसांमध्ये मी त्यांच्यात गावातील राहणीमाना बद्दलची आस्था जागवत होतो आणि जगत होतो.

हळू हळू तिथले वास्तव्य संपत आले आणि एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली. अजून काही दिवस राहिलो असतो तर अजून मज्जा आली असती असं प्रत्येकाला वाटत होतं. स्वतःच्या रक्ताच्या ३ पिढ्या जेंव्हा अश्या एकत्र येतात तेंव्हा नात्यांमधील रेशमी वीण अशीच घट्ट होत जाते आणि या आठवणी चिरकाल टिकतात. पुढल्या सुट्टीत इथेच येऊ, दिवाळी इथेच साजरी करू, भरपूर फटके वाजवू असे म्हणत आमची पुढची पिढी एकमेकांचा निरोप घेत होती. हे बघून आमच्या मागील पिढीचे डोळे पाणावले नाही तरच नवल. आजी आजोबांनी डोळ्यांच्या कडा पुसत तिन्ही नातवंडांना खाऊ साठी पैसे दिले. घर जसं भरलं तसचं हलक्या फुलक्या आठवणी ठेवत रितं झालं. दरवाज्याला कुलूप लावताना माझी कन्या मला म्हणाली “दिवाळीच्या सुट्टीत आपण इथेच येऊ. अजून बाकीच्यांना पण बोलवू. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा इथेच जाम मज्जा येते”. मुलीला ऋणानुबंधाची गोडी लावण्याचा माझा उद्देश सफल झाला होता.

नागांवच्या गोड आठवणी मनात ठेवून एकदम ताजे तावाने होत आम्ही सगळे एकमेकांच्या घरी पोहोचलो आणि रोजच्या जगरहाटीला सुरुवात झाली. नोकरी, प्रदूषण, ट्रेनचा प्रवास असह्य असलं तरी करणं भाग होतं. पण मुलीला दिवाळीत काश्मीरला नेण्याचा बेत काही डोक्यातून जाईना. एक कल्पना सुचली आणि धडाधड फोन फिरवले. दिवाळीचा काश्मीरचा बेत निश्चित केला …. हो पण फक्त आम्ही तिघं नाही. माणसं सगळी तीच फक्त स्थळ वेगळं. सहकुटुंब सहपरिवार काश्मीर पण दिवाळीचे फटाके नागांवच्या अंगणात फोडून झाल्यावरच.

सुट्टी आणि मी : भाग ०१

मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे “धिंगाणा” घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते. शनिवारी सकाळचे नित्यकर्म आटपून चहाचा (सकाळ पासूनचा दुसरा) घोट घेत घेत देशात चाललेल्या घोटाळ्यांच्या बातम्या चाळत बसलो होतो. तितक्यात माझे कन्या रत्न झोपेतून उठून डोळे चोळत चोळत माझ्या मांडीवर येऊन पहुडली. या भानगडीत वर्तमानपत्राचा चोळामोळा झालेला आहे, चहाच्या कपाचा फुटबॉल होता होता वाचला होता हे तिच्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी म्हणालो “काय माऊ, आज उठल्या उठल्या लादी गोडी? बोला काय हवं ते बोला” बरयाच मागण्या होत्या परीक्षेच्या आधी पासून तुंबलेल्या त्या सगळ्या एका झटक्यात माझ्यापुढे मांडल्या. बहुतेक स्वप्नात हे सगळं आलं असणार. काय आहे … आपण अगोदर दिलेली आमिष, लालूच, वचनं कालमानापरत्वे विसरून जातो पण ही मुलं मात्र सगळं लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी आपल्याला कोंडीत पकडून आपला बाजीप्रभू करतात. सगळ्यात मोठी मागणी होती फिरायला जायची. सगळं बोलून झाल्यावर तिचा रेटा चालू झाला …. “आपण कुठे तरी फिरायला जाऊ”. मि म्हटलं “हो जाऊ या ना …. आज बागेत जाऊ, उद्या मॉल मध्ये जाऊ, केंव्हातरी मुंबई बघायला जाऊ. “नाही नाही असं फिरायला नाही, कुठे तरी लांब जाऊ … हॉटेलमध्ये राहू, खूप खूप मस्ती करू, शॉपिंग करू” माझ्या कन्येचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या भात्याला गदागदा हलवत होता. मी जरा सारवासारव करत म्हणालो “पण हे प्रॉमिस केलं नव्हतं मी” कन्या माझ्या वरताण “मग काय झालं आत्ता कर ना” अडलेल्या हरीच्या अविर्भावात तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं (म्हणजे तिने ते घेतलं). काम फत्ते होताच टुणकन उडी मारून ही स्वारी आई कडे पळाली. बहुतेक शाळा संपली आहे हे लक्षात न येता माझी शि.प्रि. बायकोने तिला फैलावर घेतले “उठल्या उठल्या चिकटलीस त्याला? जा आधी आवरून घे … तू ही तसलीच आणि तुझा बाबा म्हणजे ….” आताशा माझे कान सवयीने बंद झाले होते आणि मी घोटाळे वाचण्यात रंगून गेलो.

आज्ञाधारक मुलीने सगळे पटापट आवरले आणि कागद पेन घेऊन माझ्या समोर नाचवू लागली. “बाबा चल आपण प्लान करू. काही असेल तर तु लगेच कागद पेन घेऊन बसतोस ना म्हणून मीच घेऊन आले”. माझ्या लेकीने अगदी चंगच बांधलं होता. तिचं पण बरोबरच आहे म्हणा … सगळ्या मैत्रिणी फिरायला कुठे ना कुठे गेल्या आहेत आणि त्या आल्यावर त्यांनी केलेली गम्मत जम्मत सांगणार मग मी त्यांना काय सांगू हा यक्ष प्रश्न. कागद पेन घेऊन बसणार तितक्यात शि.प्रि. ची आज्ञा झाली “कुठेही जायचं नाहीये. आणि आता सगळी कडे बुकिंग फुल असणार. तिला विचारूनच ५ दिवसांच्या उन्हाळी शिबिरात तिचं नाव टाकलंय. नंतर आपण नागांवला जाणार आहोत. तिथे ताई, कलश, माधुरी आणि ओम … सगळे येणार आहेत.” झालं, आमचा प्लान कागदावर येण्या आधीच बारगळला होता. आणि डोळ्यांच्या मागे भरून ठेवलेल्या अश्रूंच्या टाकीची तोटी हळूहळू वाहायला लागली होती. “आपण प्लान तर करू, तु काळजी करू नको … या सुट्टीत नाही तर दिवाळीच्या सुट्टीत जाऊ” माझ्या समजूतदार पोरीला माझे हे सांत्वनपर शब्द एकदम जादूच्या छडी सारखे वाटले. डोळे पुसतच तिने मान डोलवली आणि म्हणाली “आपण दोघंच जायचं … तिला नाही न्यायचं.” आमच्या कुणावर जर माझी पोर नाराज असेल तर ती आमचा उल्लेख तो/ती असाच असतो हे मी जाणून असल्याने तिच्या वाक्यातली “ती” म्हणजे कोण हा प्रश्न मला पडला नाही. मी फक्त बरं म्हटलं. मी कुठे जायचं हे विचारण्याच्या आताच कन्यका म्हणाली “बाबा आपण काश्मीरला जाऊया. मला बर्फात खेळायचंय आणि बोटीत पण बसायचंय त्या देवयानी सारखं.” “माऊ सध्या तु जरा जास्तच सिरियल्स पाहतेस ना? त्या “देवयानी” सिरीयल मध्ये दाखवलं असेल काश्मीर. ” माझा थोडा तक्रारीचा सूर ऐकून कन्या वैतागली. “अरे ती देवयानी नाही माझ्या वर्गातली मैत्रीण. तिने मला दिवाळीच्या सुट्टीतले तिचे काश्मीरचे फोटो दाखवले” मी म्हटलं “अगं आत्ता बर्फ नसतो मग आत्ता गेलं तर तुला बर्फात खेळता येणार नाही.” मग बर्फ आत्ता का नसतो, दिवाळीतच का असतो? …. बाकीच्या वेळी जर तिथे बर्फ नसतो तर तिथे गोळेवाल्यासारखा विकत मिळत नाही का? या अश्या शंका “वितळे” पर्यंत मी बर्फ या विषयावर निरुपण केले आणि तिची जिज्ञासा थंडगार केली. प्लानिंग आत्ताच करायचं पण जाऊया दिवाळीत या वर ती ठाम होती. तिच्या समाधानासाठी एक ढोबळ आराखडा तयार केला आणि लेक खुश. आईला सांगून तिने तो कागद तिच्या डेस्क वर चिकटवला. रात्री शि.प्रि. म्हणाली “कशाला आत्ता पासून सांगून ठेवतोस? आणि आत्ता इतका खर्च करून तिच्या काही लक्षात राहणार आहे का? थोडी मोठी झाल्यावर जाऊ” मी म्हटलं “जाऊ या गं … याच कारणाने गेल्या ३-४ वर्षात कुठेही लांब नेलं नाही तुम्हांला” बायको मनापासून खुश झाली होती. 😉

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ६

आमच्या अश्या शांत आणि मार्मिक संवादामुळे एकंदरीत वर्गातील इतर पालकांची करमणूक मात्र झाली. काही पुरुषांनी नंतर खाजगीत मला हे देखील सांगितले कि पुढील मिटिंग ला तुम्ही येणार असाल तरच आम्ही येऊ. शिक्षिका देखील पहिल्याच पालकांच्या बैठकी दरम्यान मुलांची चौकस बुद्धी आणि त्यांना मिळणारी वागणूक या माझ्या पत्नीने विचारलेल्या प्रश्नांवर खुश होत्या. “आता बघ मी कशी बोलते” असा पवित्रा घेऊन जशी आम्हांला घरी ढकलत ढकलत मुद्द्यावर आणून ठेवते तसाच अविर्भाव इथे पण दाखवला असल्याने बऱ्याच मातांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मुलांची प्रगती त्यांचा पुढील वार्षिक अभ्यासक्रम यावर जुजबी चर्चा होऊन सभा तहकूब झाली. “तुम्ही थांबा बाहेर मी आलेच” याचा अर्थ तुमच्या अपरोक्ष मला टीचर ना काहीतरी विचारायचे आहे हे कळण्या इतपत मी मुरलेला असल्या कारणाने मी आणि मुलगी तिथून बाहेर पडलो.

काही पालक नंतर माझ्याशी सुसंवाद साधत असतानाच हिचे तेथे आगमन झाले. एक वेगळीच लकाकी होती तिच्या चेहेऱ्यावर, अगदी भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर वरील बायकांच्या तोंडावर असते तशीच. कदाचित आमच्या बद्दल (मी चे आदरार्थी बहुवचन) प्रशंसनीय गौरवोद्गार काढले असावेत अशी उगाच शंका मनात येऊन गेली. “काय म्हणत होते बाकीचे पेरेंट्स” – ती. मी म्हटले “त्यांना मी सामुपदेशक वाटलो …. मी पण मग बाण सोडला … आपण इतरांशी जसे वागतो तसच दुसरे कुणी आपल्याशी वागले तर कसे वाटेल हा विचार करून वागा. सर्वसामान्य माणसेच पुढे सर्वमान्य होतात आणि कीर्तन संपवले” पुढे मी जे काही बोललो ते ऐकून घेण्याच्या ही मनस्थितीत दिसत नव्हती. गाडीला किक मारली … आणि अहो आश्चर्यम् … एका किक मध्ये गाडी चालू झाली पण. तिघे जण स्वार होऊन घरा कडे निघालो. मुलगी पुढे उभी राहून नेहेमीपणे अविरत बडबड करत होती. बायको जरा जास्तच जवळीक साधत कानात म्हणाली “मग येणार ना पुढच्या मिटिंगला? टीचर म्हणत होत्या तुमच्या मिस्टरांना आणू नका, खूप बोलतात आणि इतर पालकांचे लक्ष वेधून घेतात. मध्येच हायपर काय होतात. But seems to be a good father, मी पण म्हणाले आहेच तो असा वेगळा वेगळा”. अशी मिश्कील संधी मी थोडीच सोडणार? “छे छे मी येणारच …. मी बघितले, मी बोलत असताना त्यांचा तरुण शिक्षक आणि पालक वर्ग कसा भान हरपून बघत होता माझ्याकडे” – या वेळी कोपर मारायला जागा न मिळाल्याने कमरेवर नाजूक चिमटा मात्र बसला होता.

या पेरेंट्स मिटिंग मुळे एक मात्र झाले, आज कित्येक वर्षांनी परत एकदा त्या बेंच वर बसायचे भाग्य मिळाले. पाय मुडपून बसायला लागत असल्याने आपण मोठे झालो आहोत याचे भान असले तरी वर्गात बसायला मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. तो काळा फळा, त्याच्या चौकटीवर ठेवलेले डस्टर, खडू, पोलिश केलेले टेबल, दोन हात असलेली लाकडी खुर्ची, दोन्ही बाजूला असलेल्या खिडकीतून वाहणारी वाऱ्याची झुळूक मला परत माझ्या शालेय जीवनातील मोर पिसार्याप्रमाणे जपलेल्या आठवणींच्या गावी घेऊन जायला आतुर झाले. बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्या आड गेल्या असल्या तरी एकंदरीत माझे शालेय जीवन माझ्या पालकांसाठी जिकरीचेच होते असे मानायला हरकत नाही. त्या वेळी अश्या मिटींगा असत्या तर केवळ माझ्या सारख्या काही मुलांमुळे दर महिन्याला न घेता दर आठवड्याला भरवल्या गेल्या असत्या आणि आमच्या मातोश्रींनी तिथेच १५ मिनिटे मला उभे केले असते. दर आठवड्याला शाळेत विसरलेल्या वस्तूंमुळे खाल्लेला मार आणि त्या परत आणण्यासाठी पितृपक्षाकडून झालेली बोळवण कसा विसरू शकेन. काही शिक्षकांनी जितका मार दिलाय तितकेच प्रेम आणि संस्कारही दिलेत. रानडे सर, कुलकर्णी सर, भंडारी सर, महाजन सर, शिंपी सर, कुलकर्णी बाई, बर्वे बाई, पळधे बाई, टांकसाळे बाई, अत्रे बाई, गोखले बाई, महाजन बाई, संगीत शिक्षिका दाणी बाई, शिवणकाम शिक्षिका साखरे बाई (यादी बरीच मोठी आहे) यांच्या सारख्या अगणित शिक्षकांनी आमचे जीवन समृद्ध करण्या साठी जि धडपड केली आहे, जे अतोनात कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. त्यावेळी चालू असलेल्या विद्यार्थी दशेमुळे कदाचित ते क्लेशदायक, निरर्थक वाटत असले तरी आता आयुष्यातल्या अनुभवाने उमगले कि सगळे गुरु निष्णात होते, भरभरून ज्ञानदान करत होते पण त्यांच्या कडून आत्मसात करायला कुठे तरी कमी पडलो.

Anuvina-parentsMeet-border