चहाट(वा)ळकी -०८: झाडा(डू)झडती

“साहेब पेढा घ्या” गण्याने पेढ्याचा बॉक्स पुढे करत सुतकी नजरेने माझ्याकडे बघितले. “कसले रे हे पेढे?”बॉक्स मधून पेढा घेत घेत गण्याला प्रयोजन विचारले.  सकाळी सकाळी पेढा समोर आल्यावर कुणाचीतरी गुडन्यूज असेल आणि आपल्या सहकर्मचार्यांचे तोंड गोड करण्याचा कुणाचा उदात्त होतु आहे याचे प्रचंड कुतूहल चेहेऱ्यावर दर्शवत मी गण्याकडे मोठ्या आशेने बघत होतो. पण गण्याची ढिम्म सुतकी नजर, पडलेला चेहेरा आणि एकंदरीत ओठ विलग करताना पडत असलेले कष्ट बघता मला हा विरोधाभास सहन करण्याच्या पलीकडे जात होता. “अहो साहेब दिल्ली मध्ये त्या केजरीवालच्या आप ने सगळ्या बाकीच्या पक्षांची वाट लावली ना त्याचे पेढे आहेत हे. त्या टायवाल्या डीप्सने वाटायला सांगितले ऑफिस भर.” गण्या माहिती पुरवत होता.

“डीप्सने? ओह म्हणजे त्या दिपंकरने का? मागच्या वेळेला पार भारावून गेला होता आपचे विचार ऐकून. पण जेंव्हा केजरीवाल आणि त्याच्या पार्टीने आतातायी पणा केला तेंव्हा वाट चुकलेल्या कोकरा सारखा वाटत होता. मला वाटले कि त्याचे हे आप-प्रेम संपले असेल” – मी मध्येच थांबवून गण्याच्या माहितीमध्ये भर टाकली.

“अहो नाही ना …. तेच तर सांगतोय ना. तुम्ही मोठी माणसे लिंक तोडता आमची. तर त्याला विचारले कश्याचे पेढे तर म्हणतो कसा आपले सरकार आले ना दिल्लीत त्याचे पेढे आहेत हे. मी म्हटले आपले?? अरे तुझे असेल आम्हीतर युतीच्या पालखीचे भोई. तिथेच झटकला त्याला. आता पेढा दिसायला तरी छान होता म्हणून खाल्ला नाहीतर अजून ४-५ वाक्ये ऐकवली असती. ती आप आणि तो केजरीवाल खुळ्याचा बाजार नुसता. मागच्या वेळी हाच केजरीवाल ४९ दिवसात सत्ता सोडून पळून गेला होता. मला पण नवल वाटते दिल्लीकरांचे. इतके होवून देखील त्याच्या मफलरात भरभरून मतांचे दान केले. भोळी जनता याच्या भूलथापांना बळी पडते हो. आता त्यांचे रक्षण केवळ परमेश्वरच करू शकतो. आणि आपल्या इथले शिकला सवरलेला तरुणवर्ग पण त्याच्या मागे पागल होतो. स्टेशनवर उभे राहून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आवाहन करतो. डोक्यावर असलेली ‘मै आम आदमी’ टोपी हीच काय ती यांची ओळख. मागच्या वेळी त्या मफलर मानवाने मस्त टोप्या घातल्या सगळ्यांना.” गण्या थांबतच नव्हता. त्याच्यातला सैनिक जागा होण्या आगोदर त्याला थोपवणे गरजेचे होते.

थोड्या चढ्या आवाजात म्हटले “काय गणू भाऊ आज जबरदस्त फलंदाजी चालू आहे. अग्रलेख वाचून आला आहेस का? तो केजरीवाल हिट झाला तर दोन चार दिवसांनी तू पण टोपी घालून हिंडशील. आपली समाजातली पत काय आपल्याला कोण कोण ऐकतंय याचे भान ठेवून आपली जीभ सैल सोडावी. आता तो दिपंकर आला इथे तर पार्श्वभागाला पाय लावून पळशील. हे आप वाले वादाला कमी नसतात बरे. त्यामुळे जरा हळू. बाबू आला का बघ जरा. नसेल आला तर खाली जाऊन चहा घेऊन ये लवकर”

गण्याला चहा साठी धाडणार तितक्यात “वा कसले हो पेढे?” असे म्हणत बाबू किटली घेऊन हजर. “अरे त्या दिपंकरने आणले आहेत ऑफिस मध्ये वाटायला … आपण मोदी जिंकल्यावर वाटले नव्हते का तसेच त्याने आप जिंकल्यावर वाटले आहेत.” गण्या काही बोलण्याच्या आतच मी स्पष्टीकरण दिले. आता बाबूचे कथन सुरु होणार होते. मुळात बाबूचा ओढ भाजपा कडे, त्यातल्या त्यात अटलजी आणि मोदींकडे जरी असला तरी त्याच्या बोलण्यातून प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण साहेबांचा कॉमन मॅन डोकावायचा. भाजपचेच काय पण मोदींचे अंधानुकरण किंवा समर्थन कधीच केले नाही.

“भाजपाचे काहीतरी गणित चुकलेच हो साहेब. मतांची टक्केवारी वाढली पण जागा भरपूर कमी झाल्या असे कळले. त्यातली आकडेमोड माझ्यासारख्या कमी शिकलेल्या सामान्य माणसाला कळणे खूप कठीण आहे. पण ज्या अर्थी बाकीच्या कुठल्याच पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याने त्यांचा हिस्सा आपच्या वाट्याला गेला असण्याची शक्यता असेल.” बाबूने रास्त शंका मांडली.

“अरे हो तसेच काहीसे झाले असेल. मुळात प्रचाराच्या सुरुवातीलाच त्याने जनतेची जाहीर माफी मागितली आणि परत सत्ता सोडण्याची चूक करणार नाही असे कबुल देखील केले. नुसते बोलून थांबला नाही तर मागच्या वेळी केलेल्या असंख्य चुका सुधारल्या. व्यक्तिगत टिका न करता दिल्लीकरांच्या सामान्य गरजांना हात घातला. तो ४९ दिवस मुख्यमंत्री असताना म्हणे खरच वीज आणि पाणी स्वस्त झाले होते, भ्रष्टाचार कमी झाला होता असे म्हणतात. खरे खोटे दिल्लीकरच जाणो. आता देखील त्यांनी केवळ विकासाचे मुद्दे उचलून धरले. केजरीवाल दिल्लीकरांची नस बरोब्बर जाणतो. दिल्लीकरांच्या भावनांना अगदी नियोजनबद्ध वश केले आणि त्याचेच परिणाम निकालात दिसले. जनतेने कॉंग्रेसला नेस्तनाबूत केलेच पण भाजपाला देखील समज दिली कि सामान्य जनतेला गृहीत धरू नका.” – माझे लक्ष आता बाबू काय बोलतो याच्याकडे लागले होते.

“मुळात भाजपाचे सरकार केंद्रात आल्या आल्या लगेच दिल्लीची निवडणूक ठेवायला हवी होती. ती खूप लांबवली गेली. सामान्य कार्यकर्ता डावलला गेल्याने स्थानिक पातळीवर म्हणावा तितका जोर लागला नाही. मुळात बेदी बाई कितीही चांगल्या असल्या तरी शेवटी त्या आधी केजरीवाल आणि कंपू मधल्याच होत्या. भाजपाचा प्रचार हा पूर्णपणे केजरीवाल केंद्रित होता. भूतकाळ जास्त वेळ उगाळून चालत नाही त्याचे परिणाम उलट होवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची निवडणूक. भाजपाने प्रसारित केलेली व्यंगचित्रे, भाषणे यांचा परिणाम केजरीवालाचा लोकानुनय वाढवण्यात जरी झाला नसला तरी भाजपाच्या शत्रू पक्षांसाठी कोलीत दिल्यासारखे झाले. कदाचित पदद्या मागे या बाकीच्या पक्षांनी भाजपा विरुद्ध आघाडी उघडली असली तर जो निकाल लागला आहे तो अपेक्षितच म्हणता येईल. नगाला नग उभा करुन अरविंदाचा रथ दिल्लीच्या तख्ता पर्यन्त पोचवला. दुसरे कारण म्हणजे दिल्लीतील जनता … दिल्लीतीलच काय पण समस्त भारतातील लोकांना फुकटचे पौष्टिक हे ब्रीद वाक्य आहे. आरक्षण, सबसिडी, रोजगार या सारखे तुकडे फेकले की जनता आंधळी होते. आणि शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचे काही चालत नाही. लाटा येतात, त्सुनाम्या येतात आणि कालांतराने विरुन जातात. पण जनता, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न हे निरंतर तसेच राहतात. पक्ष नेते येतात खुर्चीचा आस्वाद घेऊन निघुन जातात पण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कायम झेंडा हाती घेऊन आदेश झेलत काम करत असतात.” बाबू ने नेहमी प्रमाणे नेत्या पेक्षा कार्यकर्ता किती महत्वाचा आहे ते अधोरेखित केले.

“तुला एक सांगू का बाबू … दिल्ली मधील भाजपाचा पराभव समर्थकांना खुप जिव्हारी लागला आणि भाजपा विरोधी लोकांना उन्माद आला. मग सुरु झाले आरोप, टिका, टिपण्णी. अरे इतकेच काय खुद्द बेदी बाई पण म्हणाल्या हा पराभव माझा नाही भाजपाचा आहे. अहो बाई तुम्ही भाजपाच्या कावडीत बसुनाच मुख्यमंत्री पदाच्या तीर्थयात्रेला निघाला होता ना? मोदींच्या नावाचा जो सुट होता त्याबद्दल अगदी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने देखील जाहिर माफी मागितली होती तरी देखील त्यांच्या त्या कोटाचे भांडवल करुन त्याच्या मुळे भाजपाचा पराभव झाला असा जावईशोध लावला. काळा पैसा हा पण असाच एक मुद्दा ज्याचे चर्वीचरवण झाले. या सगळ्या गदारोळात शांत आणि संयमी होते ते फक्त मोदी. त्यांनी तडक केजरीवाल यांना दूरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या आणि भेट घेण्याची इच्छा प्रकट केली. केजरीवाल देखील खिलाडुवृत्तीने त्यांना भेटायला गेले आणि केंद्र सरकार आप ला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदिनी दिली. हे भारता सारख्या सशक्त लोकशाही मध्येच घडू शकते. शहा मोदींची रणनीति काही राज्यात चालली ती प्रत्येक राज्यात चालेल असे नाही. शत-प्रतिशत भाजपा हे ऐकायला कितीही चांगले असले तरी राज्य पातळीवर स्थानिक पक्षांना नाराज करुन चालणार नाही. इतर पक्षातील नेते फोडून, उसने घेऊन निवडणूक एकदा जिंकता येईल … दर वेळी तोच निकाल लागेल असे खात्रीने सांगू शकत नाही. अश्याने भाजपा मध्ये आंतर्गत बंडाळी माजण्याची शक्यता जास्त आहे. निदान या निवडणुकी वरुन तरी भाजपाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नाहीतर जे कमावले ते ५ वर्षात गमावून बसतील आणि डोक्यावर आप येऊन बसेल.” आज माझे हे विवेचन ऐकून बाबू पण गप्प झाला. एव्हाना सैनिकाचे उसळते रक्त पण जरा शांत झाले होते. गरमागरम चहाचा आस्वाद घेणे चालु होते इतक्यात दिपंकर तिथे आला आणि म्हणाला “बघा मी मागेच म्हटले होते इस आदमी में कुछ ख़ास है. एक ना एक दिवस तो परत येणार आणि जिंकणार. आता खरी कसोटी लागेल ती आश्वासने पूर्ण करण्याची. शपथ विधी च्या वेळी देखील त्याने कुठलेही खाते घेतले नाही. आणि सगळ्या नेत्यांनी संयम बाळगावा अशी सूचना केली. बघू आता काय काय निर्णय घेतोय ते. कारण ही संधी पुन्हा येणार नाही. माझ्या सारखे अनेक तरुण आज त्याच्या कडे आशेने बघतात. त्यांची परत एकदा फसवणूक करू नकोस रे अरविंदा.”

चार भाई

माझा बालपणीचा बराचसा काळ डोंबिवली म्युनिसिपाल्टीच्या (त्या वेळचि डोंबिवली नगर परिषद) समोरच्या गल्ली मधल्या परिसरात गेला. खेळायला भरपूर जागा असल्याने आम्हा पोरा टोरांची दंगामस्ती चालायची.   बिबिकरांचा वाडा, तयशेट्ये यांची शुभांगी दर्शन (नार्वेकर ज्वेलर्स ची बिल्डिंग) वादळ बिल्डिंग, जुवेकरांचा वाडा, बाजुला कुलकर्ण्यांचा वाडा अशी आमची हद्द असायची. शुभांगी दर्शन चाळ स्वरुपाची असल्याने तिथे बिर्हाडकरू मुबलक आणि पर्यायाने बच्चे कंपनी पण भरपूर. प्रत्येक वयोगटाची 10-12 टाळकि असायचिच दंगामस्ती करायला ….त्यात मी आणि  माझे सवंगडी देखिल होते. आम्ही वादळ बिल्डिंगच्या तळ मजल्यावर रहायचो. घरासमोर आम्हाला खेळण्या पुरते आँगन होते. त्यामुळे काय खेळायचे असा प्रश्न कधीच पडला नाही. लंगड़ी, कबड्डी, लपाछपी, डबा ऐसपैस, लगोरी आणि क्वचित कधीतरी क्रिकेट …. अगदी फावल्या वेळात होपिंग करत करत सायकली पण धावडवल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी तर ती गल्ली दणाणुन सोडली आहे.
शुभांगी दर्शन मध्ये दुसर्या मजल्यावर शहा कुटुंब रहायचे. दोन खोल्यांच्या बिर्हाडात शहा पति पत्नी आणि त्यांची ४ मुले ….. चारही मुलगे …. २ -४  वर्षांच्या अंतराने झालेले. सर्वात मोठा विजय उर्फ़ पप्पू (हा माझ्या पेक्षा देखिल 1-2 वर्षानी मोठा होता). क्रमांक दोन चा अश्विन, क्रमांक तिन अतुल, आणि क्रमांक चार विपुल. या चारही भावांमध्ये साम्य एकच ते म्हणजे ते चारही जण त्या काळच्या प्रसिद्ध ग्रीन्स इंग्लिश स्कुल मध्ये शिकायला जायचे. बाकी रंग, रूप, आकार यात कमालीचा फरक. बहुतेक वेळा हे चारही जण कायम एकत्र. खेळता खेळता त्यातला एकाला कुणाला जरी बोलावणे आले तरी चारही जण गायब व्हायचे. संध्याकाळी खेळायला येताना पण चारही जण बरोबर. धाकटा विपुल त्याच्या आई बरोबर असायचा पण नंतर मग तो पण शेपटा सारखा आमच्या मागे.
त्यांच्या आईला आम्ही पप्पुच्याई (पप्पू च्या आई) म्हाणायाचो. तिथे कुणीही बाई एकमेकींना नावाने का हाक मारत नसत हा त्या काळी पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक गहन प्रश्न होता. अमक्याच्याई …. तमक्याच्याई …. ही काही तरी अजब प्रकारची हाक मारायची पद्धत. तर या पप्पुच्याई जाम कडक होत्या. शिडशिडित बांधा आणि टिपिकल गुजराथी. गुजराथी पद्धतीची साडी, लांबसडक केसांची वेणी, तार सप्ताकातिल किरटा आवाज. या चौघांपैकी कुणाला ना कुणाला तरी कायम ओरडत असायची. अर्थात चार दंगेखोर मुलांच्या आईला प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे खुपच कठिण आहे हे अत्ता पटते.
पप्पू आणि मी जवळ जवळ सारख्याच वयाचे त्यामुळे आमच्या दोघांचे सख्य अधिक. पण बाकी सगळ्याच दृष्टीने कुठेच सारखे पणा नव्हता. ते जैन तर आम्ही पक्के कोकणस्थ ब्राह्मण. घरातील भाषाच काय पण शाळेतिल विषयांचे माध्यम देखिल वेगवेगळे. पण लहानपणी ही असली कुठलीही बंधने कधीच आड आली नाहित. पप्पू बरोबर एकदा मी त्यांच्या मंदिरात गेलो होतो …. उत्सुकता म्हणुन. तिथे तो जसे करत होता तसेच मी पण केले. पिवळा टिळा लावून घरी आलो आणि मग परत कधी जायचे धाडस झाले नाही. अश्विन माझ्यापेक्षा वयाने लहान. पप्पू स्वभावाने जितका शांत तितकाच अश्विन मस्तीखोर. मुळात तो आधी अजोळी रहायचा. माझ्याशी गप्पा मारताना तो त्याच्या अजोळच्या गोष्टी सॉलिड रंगवून सांगायचा आणि मी पण गुंग व्हायचो. त्याचे घोड्यावरून फ़िरणे काय …. तलवारी काय…. त्या मारामार्या काय …. जणू हे तिथले जहागीरदार किंवा वतनदारच. हे सगळे धादांत खोटे असणार हे अत्ता पटतय कारण त्याचे अजोळ होते “मरोळ”. अतुल …. तिन नंबर … हा नेहेमी मला कुठल्या ना कुठल्या पिक्चरची स्टोरी सांगायचा. उपकार या चित्रपटातले “मेरे देश की धरती” हे त्याचे फेवरिट गाणे. खेळताना याला आम्ही बरेच वेळा बकरा बनवायचो. धाकट्या विपुलशी कधी विशेष सूत जुळले नाही कारण त्याच्या आईने पदर झटकला की तो आमच्यात यायचा. आणि आम्ही कधी याची खोड काढली की रडत घरी जायचा. त्याचे असे निर्गमन झाले की हे तिघे त्यांच्या आईच्या हाकेकडे लक्ष ठेवून असायचे. वरून आरोळी आली की सगले धूम पसार.
पप्पुच्या घराचा उम्बराठा ओलाण्डायची वेळ कधीच आली नाही. बाहेर खेळायला इतकी मुबलक जागा असल्यावर आम्ही घराच्या चार भिंती मध्ये सामावणे निव्वळ अशक्य. बैठे खेळ देखिल जिन्यात किंवा चाळीच्या संयुक्त बालकनी मध्ये खेळले जायचे. संयुक्त बाल्कनी मध्ये यांच्या घरा समोर कायम काही ना काही तरी वाळवणे टाकलेली असायची. घर एकदम स्वच्छ …. लखलखित असायचे. कधी कुठे पसारा दिसायचा नाही …. एकंदरीत पप्पुच्याई कड़क शिस्तिच्या होत्या. या चार महात्म्यांचा पालनकर्ता बघितल्याचे आठवत नाही कारण त्यावेळी तिन्हीसांजेला आम्ही आपापल्या घरात असायचो. त्यांच्या पोषणकर्ती चा दराराच इतका होता की एकाला हाक मारली की क्रमाक्रमाने चारही बंधू घरी पोचायाचे.
परिक्षेच्या काळात मात्र या चौघांपैकी कुणीच खेळायला यायचे नाही. एकदाच त्याना बोलवायला गेलो होतो. तर हे चारही जण चार कोपर्यात भिंती कडे तोंड करून घोकम्पत्ति करत बसले होते. पप्पुच्याईने नुसते माझ्याकडे बघितले आणि मी तिथून पसार झालो. परीक्षा संपल्यावर मात्र धम्माल चालायची. सकाळचि अन्हिके उरकून सगळे खाली जमयचो मग जेवायला घरी. नंतरचा प्लान असायचा बाल्कनी मधे काहीतरी टाईमपास. 4 वाजले की पप्पुच्याई पप्पूला किंवा अश्विनला बोलवून त्याच्या हातात एक पिशवी आणि काही पैसे द्यायच्या. आणि बाकीचे तिघे हळु हळु घरी जायचे. पप्पू / अश्विन पिशवीतुन विब्स ब्रेड्चा पुडा घेउन यायचा. ब्रेड्च्या स्लाइसची चौघां मध्ये समसमान वाटणी व्हायची. पप्पुच्याई प्रत्येकाला कपात गरमागरम वाफालालेला चहा द्यायच्या. चहात पाव बुडवून खाताना चहा संपला तर परत मिळायचा. बाकीची आमची सेना हे सगळे कुतुहलाने पहात असायचो. कार्यभाग संपला की मग परत हे चौघे खेळायला बाहेर. एखादी गोष्ट भावंडामध्ये काटेकोर रित्या वाटुन खाण्याची अजब पद्धत होती त्यांची. आपापसात एकमेकाना लोळवतिल पण दुसर्या कुणी या पैकी एकाला जरी दमबाजी केली तर सगळे एक होतील. मला त्यांच्या याच एकीचे खुप अप्रूप वाटायचे.
माझ्या वयाच्या 12व्या वर्षी आम्ही ती जागा सोडली आणि चार रस्ता चौकातील डोंगरे यांच्या नविन बिल्डिंग मध्ये रहायला आलो. नविन जागी स्थिरावताना नविन मित्र जोडले गेले आणि हे चारही भाऊ माझ्या पासून कायमचे दुरावले. कालांतराने त्यानी देखिल डोम्बिवली सोडल्याचे ऐकले. या घटनेला आता जवळ जवळ 25 एक वर्षे झाली असतील. पण आजही त्या गल्लीत गेल्यावर बालपणी चा गंध रोमारोमाला स्पर्श करुन जातो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं म्हणताना उगीचच वाटत राहतं … कुठे असतील ते सगळे असेच एकत्र असतील का भरकटले असतील वार्यावर उडालेल्या रांगोळीच्या कणां सारखे?

चहाट(वा)ळकी -०७: भरत भेट

मी सकाळी जागेवर येऊन बसतो न बसतो तोच आमच्या गण्याने राजकीय भूपाळीची नांदी वाजवली.”काय ओ साहेब ….झाली का भरत भेट? …. अहो नरेंद्र आणि बराकची गळाभेट हो. या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पावणे होते ना ते? काय बंदोबस्त होता, काय ती सुरक्षा आणि काय तो थाट  … मज्जा आहे बुवा त्या बराकची. आणि त्याच्या बरोबर तुमच्या मोदीने पण मिरवून घेतले.” “आमचा मोदी?? तू काय घरवापसी केलीस कि काय?? जरा धुरळा उडायला लागला तर लगेच आमचा मोदी झाला काय?” मी जळजळीत कटाक्ष टाकुन त्याचा सकाळी सकाळी समाचार घेतला. “नाय ओ साहेब …. मोदी साहेब आमचे पण आहेत … शेवटी आपली भगवी युती ना.” माझी नाराजी बघून गण्या सारवा-सारवी करत म्हणाला. “ते अमेरिका नरेश आणि त्यांची राणी गेले का त्यांच्या देशी परत …. अमेरिकेला? लक्ष ठेवायला हवे नाहीतर वाटेत श्रमपरिहार म्हणून पाकिस्तानात बिर्याणीच्या दावतीला उतरले असतील.” आज गण्या का सकाळी सकाळी पेटला होता ते काही कळले नाही. तुला आज काही काम नाही का असे म्हणून मी थोडे दुर्लक्ष्य करत सकाळी सकाळी आल्यावर करायची नैमित्तीक कामे उरकत होतो… टेबल सारखे करणे, पिण्याच्या पाण्याची बाटली भरून घेणे, कॉम्पुटर सुरु करणे अश्या छोट्या छोट्या कामात देखील बराच वेळ जातो.

समोरच्या व्यक्तीचे आपल्या बोलण्याकडे विशेष लक्ष्य नाही हे कळत असून देखील चिवटपणाने आणि नेटाने सुसंवाद साधण्याची भारी कला आमच्या गण्याच्या अंगात ठासून भरलेली आहे. त्याचा प्रत्यय अधून मधून येत असतो. आपला मुद्दा न सोडता परत एकदा त्याने आपला मोर्चा ओबामा मोदी आणि भरतभेटी वर आणून ठेवला. ”     नाय … नेहेमी प्रमाणे धुरळा उडालाय त्यामुळे वाटले तो परत गेला असेल. अहो साहेब, आपल्या इथे जसे घरात पाहुणे असताना लहान मुलांनी केलेल्या दंग्याचा ते गेल्या नंतर समाचार घेतात तसेच काहीसे चालू झाले असल्यामुळे ओबामा आणि मिशेश ओबामा गेले असावेत असे वाटले.” “हो गेले असतील .. पण तू का एवढ्या चांभारचौकश्या करतो आहेस? हा बाबू पण आज कुठे उलथलेला होता कुणास ठाऊक. इथे गप्पा मारण्यापेक्षा चहाचे बघ.” मी जरा ठेवणीतल्या साहेबी आवाजात गाण्याला पिटाळले.

पूर्ण ऑफिस मध्ये गण्याला आवरू शकणारा एकमेव आवाज म्हणजे बाबू. कारण त्यांच्यातले नाते मित्रत्वाचे त्यामुळे त्यांच्या संवादामध्ये मैत्रीपूर्ण वादविवाद असायचे. थोड्याच वेळात गण्या आणि बाबूची जोडी समोरून येताना दिसली. काहीतरी चर्चा चालू असल्याचे वाटत होते आणि ती ओबामा मोदी यांच्या भेटीवरच असणार हे कुणीपण पैजेवर सांगितले असते. ते जवळ आले तसे गण्याचे शब्द अर्धवट कानावर पडत होते …”अरे इतका बडेजाव करायची गरज काय म्हणतो मी ??? किती ही उधळपट्टी??” बहुतेक खालून चहा घेऊन येता येताच गण्याने बाबूला गाठले असणार. बाबू समोर जि टकळी सकाळ पासून चालू होती तीच पुढे रेटली असणार आणि बाबू त्याची शाळा घेत असणार. या दोन महान व्यक्तींना बघून एकंदरीत आज आपल्या दिनमानात श्रवणीय-आनंद योगाची पर्वणी आहे याची चाहूल लागली.

कपात चहा ओतताना बाबू म्हणाला “येडा का खुळा तू रे गण्या? फालतू वृत्त वाहिन्या बघून स्वतःचे मत बनवणे बंद कर. अरे देशाला पहिल्यांदा इतका तडफदार पंतप्रधान मिळाला आहे. गेल्या १५ वर्ष केलेला पसारा निस्तरण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याचे पाय खेचा. इतके वर्ष मुकबधीर पंतप्रधान बघितला असल्याने तुम्हाला हा चायवाला कसा पटेल. अरे शिष्टाचार वगैरे गोष्टींचे अवडंबर न करता आमचे पंतप्रधान स्वतः पाहुण्यांना आणायला गेले. आणि तिथेच त्यांची ओबामाशी भरतभेट घडून आली. हापिसात बसून उगाच फोन वर आला का रे … आला का रे करत नाही बसले. मुळात अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण द्यायचे धाडस या आधी कुणाला झाले नाही. एवढा मोठा माणूस येणार … त्याची तशी बडदास्त पण ठेवायची म्हणजे काय खाऊ चे काम आहे. ते सुद्धा एकटा नाही आला तर बायकोला घेऊन आला आणि पुढच्या भेटीला मुलींना पण घेऊन येणार आहे. याचाच अर्थ आपल्या भारताची विविधता, संस्कृती निश्चितच आवडली असणार आणि त्याच बरोबर भारताच्या पंतप्रधानांशी जुळलेले मैत्रीपूर्ण ऋणानुबंध. उगाच नाही त्यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे सांगितले कि प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण म्हणजे माझा सन्मान आहे म्हणून.”

“बघ ना रे बाबू … सकाळपासून हा गण्या कसले डोके खातोय उधळपट्टी केली … उगीच खर्च केला … आज भारताचा तिरंगा अमेरिकेच्या तोडीसतोड उभा राहताना बघून खरे तर अभिमान वाटला पाहिजे. पण आपल्या देशात इतकी पराकोटीची विविधता आहे ना कि काही लोकं हापूस आंब्याचा गर ठेवतील बाजूला आणि कोय चुपत बसतील. तसेच हे पण आपल्या ऑफिस मधले महानुभाव श्री. गणेश दादा. कधी कधी अश्या लोकांचा राग येतो तर कधी कधी हेच लोकं करमणुकीचे साधन ठरतात.” मी सकाळपासून गण्यावर तसा वैतागलोच होतो आणि आता बाबूने आयतीच संधी दिली.

“मग काय??? असाल पंतप्रधान म्हणून काय दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांना २१ तोफांची सलामी? महाराजांच्या काळात केवळ महाराजांना आणि लढाई जिंकून आलेल्या शूर वीर सरदारांना मिळायची. इथे हीच सलामी अश्या देशाच्या अध्यक्षांना देताय ज्यांनी आपल्या शत्रू राष्ट्राला मदत केली आणि अजून करतोय.” गणू दबक्या आवाजात म्हणाला.

“अरे गण्या … अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. पाहुण्यांची पत राखून पाहुणचार केला जातो हे कधी कळणार आपल्याला? मुळात अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या भारतात येणे हे खूप महत्वाचे आणि ते काम जयशंकर यांच्या सारख्या द्रष्ट्या अधिकाऱ्याने यशस्वीपणे केले. गेली कित्येक वर्षे अणुउर्जा क्षेत्रामध्ये अमेरिकेने भारतावर निर्बंध घातले होते. त्यामुळे भारताचे अनेक अणु प्रकल्प कार्यक्रम रखडले होते. ओबामांच्या या भेटी मध्ये बरेच चांगले निर्णय घेण्यात आले जेणे करून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंधाना पुष्टी मिळेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. पाकिस्तानला पण यावरून काही धडा मिळेल अशी आशा आहे. चीनने फुत्कार टाकायला सुरुवात केलीच आहे. ती जरा डोकेदुखी होवू शकते. अमेरिका जास्त जवळ आली कि रशिया जो आपला जुना मित्र आहे तो जरा दूर होण्याची धूसर शक्यता आहे.” – मी

यातले अणुउर्जा, प्रगती हे साधे शब्द सोडले तर बाकीचे सगळे गण्याच्या डोक्यावरून गेल्याचे त्याच्या चेहेऱ्या वरून स्पष्ट जाणवत होते. पण तरी देखील आपले मत ठासून सांगायची सवय गण्याला काही केल्या गप्प बसू देत नव्हती. “पण मग मला एक सांगा … मोदी नेहेमी त्यांच्या पोषाखा विषयी जागरूक असतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला माणूस आहे असे तुम्ही म्हणता. मग तो १३ – १४ लाखांचा कोट घालून मिरवायचे कशाला? वर त्यावर स्वतः चे नाव शिवून घेण्या सारखा आत्मकेंद्रीपणा करायची खरच गरज होती का? भारतात इतके दारिद्र्य, बेकारी, गरिबी आहे. मग अश्यावेळी आपल्याच देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या जनतेच्या कष्टाच्या पैश्याची उधळपट्टी करणे किती योग्य आहे? सगळीकडे मिडीया मध्ये नंतर तुमच्या स्मार्टफोन वर पण या गोष्टी चघळल्या जात आहेत. ….” – गण्या

गण्याचे वाक्य मध्येच तोडत बाबू म्हणाला “गण्या तू म्हणजे ना शेळ्या मेंढ्यांच्या कळपात वावरतोस. एक पळायला लागली कि सगळ्याच पळायला लागतात तशी तुझी गत आहे. कुणी ओरडला साप साप कि तुम्ही काठी घेऊन भुई धोपटत बसता. तरी सांगत होतो स्वतःची अक्कल लावत जा, या मिडीया वर अंधविश्वास ठेवू नकोस आणि जो काम करतोय त्यांचे पाय खेचणे बंद कर.”

“इतका मोठा माणूस आपल्या देशात आलाय ….. आपल्या मोदींची इतकी सलगी झाली आहे कि त्याने सगळ्यां समक्ष चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा बराक असा एकेरी उल्लेख केलाय. आजमितीला चालू असलेल्या व्यावसायिक संबंधांमध्ये ६०% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे भारताचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाउल आहे. कोट्यावधीच्या व्यवसायापुढे १३ – १४ लाखांचा कोट केवळ कोत्या मनाच्या लोकांनाच दिसू शकतो. आणि मोदी भारतासारख्या प्रगतीशील राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे त्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशीच असायला हवी. अरे मावळे झोपडीत राहतात म्हणून राजे झोपडीत नाही राहिले … कारण गडावर वास्तव्य करणे ही राज्यकर्त्याची गरज होती. आणि राहता राहिला प्रश्न त्या कोटाचा …. उद्या त्या कोटाचा लिलाव करून हा चायवाला कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत जमा करेल तेंव्हा बघू कोण काय काय बोलतंय ते. बाकी बाबू काहीही म्हणा, आपला चायवाला भारी हुशार आहे. मला तरी वाटते हे कोट, त्याच्या वर शिवलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, त्याची किंमत, आणि त्यावरून विनाकारण उठलेले धुळीचे लोट यात काहीतरी गेम निश्चित असणार. मिडीयाला काहीतरी चटपटीत चघळायला द्यायचे आणि त्याच्या पडद्या आड काही महत्वाची कामे उरकून मोकळे व्हायचे. ही भरत भेट निश्चित सत्कारणी लागणार” – मी

बाबू हलकेच हसला आणि ग्लास उचलत म्हणाला “अच्छे दिन आणे वाले है”