“साहेब पेढा घ्या” गण्याने पेढ्याचा बॉक्स पुढे करत सुतकी नजरेने माझ्याकडे बघितले. “कसले रे हे पेढे?”बॉक्स मधून पेढा घेत घेत गण्याला प्रयोजन विचारले. सकाळी सकाळी पेढा समोर आल्यावर कुणाचीतरी गुडन्यूज असेल आणि आपल्या सहकर्मचार्यांचे तोंड गोड करण्याचा कुणाचा उदात्त होतु आहे याचे प्रचंड कुतूहल चेहेऱ्यावर दर्शवत मी गण्याकडे मोठ्या आशेने बघत होतो. पण गण्याची ढिम्म सुतकी नजर, पडलेला चेहेरा आणि एकंदरीत ओठ विलग करताना पडत असलेले कष्ट बघता मला हा विरोधाभास सहन करण्याच्या पलीकडे जात होता. “अहो साहेब दिल्ली मध्ये त्या केजरीवालच्या आप ने सगळ्या बाकीच्या पक्षांची वाट लावली ना त्याचे पेढे आहेत हे. त्या टायवाल्या डीप्सने वाटायला सांगितले ऑफिस भर.” गण्या माहिती पुरवत होता.
“डीप्सने? ओह म्हणजे त्या दिपंकरने का? मागच्या वेळेला पार भारावून गेला होता आपचे विचार ऐकून. पण जेंव्हा केजरीवाल आणि त्याच्या पार्टीने आतातायी पणा केला तेंव्हा वाट चुकलेल्या कोकरा सारखा वाटत होता. मला वाटले कि त्याचे हे आप-प्रेम संपले असेल” – मी मध्येच थांबवून गण्याच्या माहितीमध्ये भर टाकली.
“अहो नाही ना …. तेच तर सांगतोय ना. तुम्ही मोठी माणसे लिंक तोडता आमची. तर त्याला विचारले कश्याचे पेढे तर म्हणतो कसा आपले सरकार आले ना दिल्लीत त्याचे पेढे आहेत हे. मी म्हटले आपले?? अरे तुझे असेल आम्हीतर युतीच्या पालखीचे भोई. तिथेच झटकला त्याला. आता पेढा दिसायला तरी छान होता म्हणून खाल्ला नाहीतर अजून ४-५ वाक्ये ऐकवली असती. ती आप आणि तो केजरीवाल खुळ्याचा बाजार नुसता. मागच्या वेळी हाच केजरीवाल ४९ दिवसात सत्ता सोडून पळून गेला होता. मला पण नवल वाटते दिल्लीकरांचे. इतके होवून देखील त्याच्या मफलरात भरभरून मतांचे दान केले. भोळी जनता याच्या भूलथापांना बळी पडते हो. आता त्यांचे रक्षण केवळ परमेश्वरच करू शकतो. आणि आपल्या इथले शिकला सवरलेला तरुणवर्ग पण त्याच्या मागे पागल होतो. स्टेशनवर उभे राहून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आवाहन करतो. डोक्यावर असलेली ‘मै आम आदमी’ टोपी हीच काय ती यांची ओळख. मागच्या वेळी त्या मफलर मानवाने मस्त टोप्या घातल्या सगळ्यांना.” गण्या थांबतच नव्हता. त्याच्यातला सैनिक जागा होण्या आगोदर त्याला थोपवणे गरजेचे होते.
थोड्या चढ्या आवाजात म्हटले “काय गणू भाऊ आज जबरदस्त फलंदाजी चालू आहे. अग्रलेख वाचून आला आहेस का? तो केजरीवाल हिट झाला तर दोन चार दिवसांनी तू पण टोपी घालून हिंडशील. आपली समाजातली पत काय आपल्याला कोण कोण ऐकतंय याचे भान ठेवून आपली जीभ सैल सोडावी. आता तो दिपंकर आला इथे तर पार्श्वभागाला पाय लावून पळशील. हे आप वाले वादाला कमी नसतात बरे. त्यामुळे जरा हळू. बाबू आला का बघ जरा. नसेल आला तर खाली जाऊन चहा घेऊन ये लवकर”
गण्याला चहा साठी धाडणार तितक्यात “वा कसले हो पेढे?” असे म्हणत बाबू किटली घेऊन हजर. “अरे त्या दिपंकरने आणले आहेत ऑफिस मध्ये वाटायला … आपण मोदी जिंकल्यावर वाटले नव्हते का तसेच त्याने आप जिंकल्यावर वाटले आहेत.” गण्या काही बोलण्याच्या आतच मी स्पष्टीकरण दिले. आता बाबूचे कथन सुरु होणार होते. मुळात बाबूचा ओढ भाजपा कडे, त्यातल्या त्यात अटलजी आणि मोदींकडे जरी असला तरी त्याच्या बोलण्यातून प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण साहेबांचा कॉमन मॅन डोकावायचा. भाजपचेच काय पण मोदींचे अंधानुकरण किंवा समर्थन कधीच केले नाही.
“भाजपाचे काहीतरी गणित चुकलेच हो साहेब. मतांची टक्केवारी वाढली पण जागा भरपूर कमी झाल्या असे कळले. त्यातली आकडेमोड माझ्यासारख्या कमी शिकलेल्या सामान्य माणसाला कळणे खूप कठीण आहे. पण ज्या अर्थी बाकीच्या कुठल्याच पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याने त्यांचा हिस्सा आपच्या वाट्याला गेला असण्याची शक्यता असेल.” बाबूने रास्त शंका मांडली.
“अरे हो तसेच काहीसे झाले असेल. मुळात प्रचाराच्या सुरुवातीलाच त्याने जनतेची जाहीर माफी मागितली आणि परत सत्ता सोडण्याची चूक करणार नाही असे कबुल देखील केले. नुसते बोलून थांबला नाही तर मागच्या वेळी केलेल्या असंख्य चुका सुधारल्या. व्यक्तिगत टिका न करता दिल्लीकरांच्या सामान्य गरजांना हात घातला. तो ४९ दिवस मुख्यमंत्री असताना म्हणे खरच वीज आणि पाणी स्वस्त झाले होते, भ्रष्टाचार कमी झाला होता असे म्हणतात. खरे खोटे दिल्लीकरच जाणो. आता देखील त्यांनी केवळ विकासाचे मुद्दे उचलून धरले. केजरीवाल दिल्लीकरांची नस बरोब्बर जाणतो. दिल्लीकरांच्या भावनांना अगदी नियोजनबद्ध वश केले आणि त्याचेच परिणाम निकालात दिसले. जनतेने कॉंग्रेसला नेस्तनाबूत केलेच पण भाजपाला देखील समज दिली कि सामान्य जनतेला गृहीत धरू नका.” – माझे लक्ष आता बाबू काय बोलतो याच्याकडे लागले होते.
“मुळात भाजपाचे सरकार केंद्रात आल्या आल्या लगेच दिल्लीची निवडणूक ठेवायला हवी होती. ती खूप लांबवली गेली. सामान्य कार्यकर्ता डावलला गेल्याने स्थानिक पातळीवर म्हणावा तितका जोर लागला नाही. मुळात बेदी बाई कितीही चांगल्या असल्या तरी शेवटी त्या आधी केजरीवाल आणि कंपू मधल्याच होत्या. भाजपाचा प्रचार हा पूर्णपणे केजरीवाल केंद्रित होता. भूतकाळ जास्त वेळ उगाळून चालत नाही त्याचे परिणाम उलट होवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची निवडणूक. भाजपाने प्रसारित केलेली व्यंगचित्रे, भाषणे यांचा परिणाम केजरीवालाचा लोकानुनय वाढवण्यात जरी झाला नसला तरी भाजपाच्या शत्रू पक्षांसाठी कोलीत दिल्यासारखे झाले. कदाचित पदद्या मागे या बाकीच्या पक्षांनी भाजपा विरुद्ध आघाडी उघडली असली तर जो निकाल लागला आहे तो अपेक्षितच म्हणता येईल. नगाला नग उभा करुन अरविंदाचा रथ दिल्लीच्या तख्ता पर्यन्त पोचवला. दुसरे कारण म्हणजे दिल्लीतील जनता … दिल्लीतीलच काय पण समस्त भारतातील लोकांना फुकटचे पौष्टिक हे ब्रीद वाक्य आहे. आरक्षण, सबसिडी, रोजगार या सारखे तुकडे फेकले की जनता आंधळी होते. आणि शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचे काही चालत नाही. लाटा येतात, त्सुनाम्या येतात आणि कालांतराने विरुन जातात. पण जनता, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न हे निरंतर तसेच राहतात. पक्ष नेते येतात खुर्चीचा आस्वाद घेऊन निघुन जातात पण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कायम झेंडा हाती घेऊन आदेश झेलत काम करत असतात.” बाबू ने नेहमी प्रमाणे नेत्या पेक्षा कार्यकर्ता किती महत्वाचा आहे ते अधोरेखित केले.
“तुला एक सांगू का बाबू … दिल्ली मधील भाजपाचा पराभव समर्थकांना खुप जिव्हारी लागला आणि भाजपा विरोधी लोकांना उन्माद आला. मग सुरु झाले आरोप, टिका, टिपण्णी. अरे इतकेच काय खुद्द बेदी बाई पण म्हणाल्या हा पराभव माझा नाही भाजपाचा आहे. अहो बाई तुम्ही भाजपाच्या कावडीत बसुनाच मुख्यमंत्री पदाच्या तीर्थयात्रेला निघाला होता ना? मोदींच्या नावाचा जो सुट होता त्याबद्दल अगदी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने देखील जाहिर माफी मागितली होती तरी देखील त्यांच्या त्या कोटाचे भांडवल करुन त्याच्या मुळे भाजपाचा पराभव झाला असा जावईशोध लावला. काळा पैसा हा पण असाच एक मुद्दा ज्याचे चर्वीचरवण झाले. या सगळ्या गदारोळात शांत आणि संयमी होते ते फक्त मोदी. त्यांनी तडक केजरीवाल यांना दूरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या आणि भेट घेण्याची इच्छा प्रकट केली. केजरीवाल देखील खिलाडुवृत्तीने त्यांना भेटायला गेले आणि केंद्र सरकार आप ला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदिनी दिली. हे भारता सारख्या सशक्त लोकशाही मध्येच घडू शकते. शहा मोदींची रणनीति काही राज्यात चालली ती प्रत्येक राज्यात चालेल असे नाही. शत-प्रतिशत भाजपा हे ऐकायला कितीही चांगले असले तरी राज्य पातळीवर स्थानिक पक्षांना नाराज करुन चालणार नाही. इतर पक्षातील नेते फोडून, उसने घेऊन निवडणूक एकदा जिंकता येईल … दर वेळी तोच निकाल लागेल असे खात्रीने सांगू शकत नाही. अश्याने भाजपा मध्ये आंतर्गत बंडाळी माजण्याची शक्यता जास्त आहे. निदान या निवडणुकी वरुन तरी भाजपाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नाहीतर जे कमावले ते ५ वर्षात गमावून बसतील आणि डोक्यावर आप येऊन बसेल.” आज माझे हे विवेचन ऐकून बाबू पण गप्प झाला. एव्हाना सैनिकाचे उसळते रक्त पण जरा शांत झाले होते. गरमागरम चहाचा आस्वाद घेणे चालु होते इतक्यात दिपंकर तिथे आला आणि म्हणाला “बघा मी मागेच म्हटले होते इस आदमी में कुछ ख़ास है. एक ना एक दिवस तो परत येणार आणि जिंकणार. आता खरी कसोटी लागेल ती आश्वासने पूर्ण करण्याची. शपथ विधी च्या वेळी देखील त्याने कुठलेही खाते घेतले नाही. आणि सगळ्या नेत्यांनी संयम बाळगावा अशी सूचना केली. बघू आता काय काय निर्णय घेतोय ते. कारण ही संधी पुन्हा येणार नाही. माझ्या सारखे अनेक तरुण आज त्याच्या कडे आशेने बघतात. त्यांची परत एकदा फसवणूक करू नकोस रे अरविंदा.”